(म्हणे) ‘साधूंवर मुळीच विश्‍वास ठेवू नका, त्यांच्यासारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत !’ – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा काँग्रेसचे नेते

  • साधूंविषयी असे वक्तव्य करणारे विजय वडेट्टीवार मौलाना आणि पाद्री  यांच्याविषयी असे बोलण्याचे धाडस करतील का ?
  • ज्यांनी निवडून दिले आहे, त्या जनतेला विचारले असते, तरी ‘नालायक कोण आहे ?’, याचे उत्तर वडेट्टीवार यांना मिळाले असते. स्वत:च्या पक्षाचा इतिहास पाहिला, तरी भ्रष्टाचार करून देशाला लुटणारे आणि अपात्र कोण आहेत ? याची उत्तरे वडेट्टीवार यांना मिळतील. अर्थात् पक्षाचे मिंधे असलेल्या वडेट्टीवार यांच्या डोळ्यांवर पट्टी असली, तरी पात्र कोण आणि अपात्र कोण, हे जनतेला ठाऊक आहे ! हिंदुद्वेषाची कावीळ झालेल्या काँग्रेसवाल्यांना हिंदूंनीच देशातून हद्दपार करायला हवे !
विजय वडेट्टीवार

मुंबई – विषारी विंचूलाही जे वाचवतात ते संत असतात. संत वेगळे आणि साधू वेगळे असतात. साधूंवर मुळीच विश्‍वास ठेवू नका. साधूंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत. संत समाजासाठी समर्पित होऊन काम करतात, तर साधू म्हणजे साधून घेणारे संधीसाधू असतात, असे अकलेचे तारे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अन् काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमाच्या वेळी तोडले. हे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या ‘फेसबूक’ आणि ‘ट्विटर’ या सामाजिक माध्यमांवरूनही प्रसारित केले आहे.

या वक्तव्यावरून भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे. (ईश्‍वराची प्राप्ती करण्यासाठी संसाराचा त्याग करून वैराग्याचा मार्ग स्वीकारणार्‍यांना साधू म्हणतात. साधूंच्या वेशात समाजाला फसवणार्‍यांना ‘भोंदू’ म्हणतात. कलियुगात बहुतांश लोक भोंदूगिरी करून समाजाची फसवणूक करतात; मात्र त्यामुळे ज्यांनी ईश्‍वरप्राप्ती आणि समाजासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे, त्या साधूंना विजय वडेट्टीवार नालायक म्हणत असतील, तर ते कसे चालेल ? समस्त धर्मप्रेमी हिंदूंनी अशा हिंदुद्वेषी व्यक्तीला पदच्युत करण्यासाठी आंदोलन उभारले, तर नवल वाटायला नको ! – संपादक)

साधू-संत यांना मंत्री शिव्या घालत असतील, तर राज्यात साधूंच्या हत्या होणार नाही तर काय ? – तुषार भोसले, अध्यक्ष, आध्यात्मिक आघाडी, भाजप

साधूंना नालायक म्हणणार्‍या विजय वडेट्टीवार यांना मंत्री म्हणवून घेतांना लाज वाटली पाहिजे. मंत्री झालात म्हणून तुम्हाला साधूंना शिव्या घालण्याचा परवाना मिळालेला नाही. माझा उद्धव ठाकरे यांना प्रश्‍न आहे की, हिंदु समाजाला हे दिवस दाखवण्याकरता तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात का ? तुमचे मंत्रीच जर साधू-संतांना शिव्या घालणार असतील, तर राज्यात साधूंच्या हत्या होणार नाहीत तर काय ? सोनिया गांधी यांचा हिंदु धर्मविरोधी अजेंडा राबवण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झालात का ? विजय वडेट्टीवार यांनी साधूंची क्षमा मागावी, अन्यथा परिणामांना सामोरे जावे.