नवीन कृषी कायदे शेतकर्‍यांना समजावेत, यासाठी त्यांचा मराठी अनुवाद लोकांपर्यत पोचवणार !

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव – केंद्र सरकारने आणलेले नवीन कृषी कायदे शेतकर्‍यांना समजावेत, यासाठी त्या कायद्यांचा मराठी अनुवाद लोकांपर्यत पोचवण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ताभाऊ कुलकर्णी, मिलिंद पाटील, खंडेराव चौरे, सतीश दंडणाईक आदी उपस्थित होते.

या वेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की,

१. केंद्र सरकारने केलेले हे कायदे शेतकरी हिताचे असून शेतकर्‍यांची पिळवणूक होऊ नये यासाठी आहेत; मात्र सध्या या कायद्याविषयी भ्रम पसरवण्यात येत आहे, तो भ्रम आणि शंका दूर करण्यासाठीच या तीनही कायद्यांचे मराठीत अनुवाद करणार आहे.

२. करार पद्धतीची शेती शेतकर्‍यांसाठी ऐच्छिक आहे. एखाद्या आस्थापनासमवेत करार करायचा कि नाही, हा अधिकार शेतकर्‍यांना आहे. शेतकर्‍यांच्या भूमीला कुठलाही धक्का या आस्थापनांकडून लागणार नाही.