काश्‍मीरमधून हिदु धर्म नष्‍ट होत असल्‍याची दर्शवणारी दुःस्‍थिती !

आज काश्‍मिरी हिंदु बलीदानदिन आहे. त्‍या निमित्ताने…

१. काश्‍मीरमध्‍ये हिंदूंसाठी सकारात्‍मक कृती करण्‍यास सरकार उदासीन !

१ अ. काश्‍मीरमध्‍ये भारताची राज्‍यघटना मानणारे कुणीही राहू शकले पाहिजे ! : काश्‍मीर एक असे केंद्रशासित राज्‍य व्‍हावे, जेथे देशातील कुणीही व्‍यक्‍ती येऊन राहू शकेल. तेथे एक संतुलित व्‍यवस्‍था असेल. येथे हिंदु, मुसलमान, शीख, ख्रिस्‍ती असे कुणीही येऊन राहू शकतील; पण त्‍यांनी भारताची राज्‍यघटना मानली पाहिजे. ही आमची गेल्‍या २५ वर्षांपासूनची मागणी आहे. गेल्‍या २५ वर्षांत अनेकांनी अशी वक्‍तव्‍ये केली आहेत की, काश्‍मिरी लोकांमध्‍ये हिंदूही आहेत, जे काहीच बोलत नाहीत.

श्री. राहुल कौल

१ आ. परिस्‍थिती पालटण्‍यासाठी राज्‍य बनवणे आवश्‍यक ! : आपल्‍या राज्‍यघटनेत ३६८ वे कलम हे राज्‍य पुनर्रचनेच्‍या समितीविषयीचे आहे. त्‍याप्रमाणे लोकांच्‍या भाषेनुसार राज्‍य देता येते. मिझोराम तर केवळ एका जिल्‍ह्याप्रमाणे आहे; पण तरीही त्‍याला राज्‍य बनवण्‍यात आले. पंजाब प्रांत होता, त्‍यालाही राज्‍य बनवले. तेलंगाणा, उत्तराखंड आणि झारखंड हीसुद्धा राज्‍ये झाली आहेत.

१ इ. वहाबी संस्‍कृतीमुळे हिंदूंना स्‍वीकारले न जाणे : गेल्‍या २२ वर्षांपासून काश्‍मीरमध्‍ये रहाणार्‍या मुलांनी कधी हिंदू, हिंदूंची मंदिरे आणि मंदिराच्‍या घंटा पाहिलेल्‍या नाहीत. तेथे वहाबी संस्‍कृती पाहिलेली मुले हिंदूंना कशी स्‍वीकारतील ? तेथे कुणी दिवाळीत दिवे लावले, तर तेथील मुले त्‍यावर दगड मारतील आणि दिवे लावण्‍यास विरोध करतील. यामध्‍ये सरकार काहीही करू शकत नाही. हे सर्व कसे रोखायचे ? जेव्‍हा तुम्‍ही तुमच्‍या लोकांमध्‍ये असाल आणि तुम्‍ही स्‍वगृही परताल, तेव्‍हा भविष्‍यात बंधुत्‍वाचे वातावरण निर्माण होईल. आता हीच आशा आहे की, काश्‍मीर ही स्‍वभूमी झाली पाहिजे आणि काश्‍मिरी हिंदूंना त्‍यांच्‍या भौगोलिक संबंधांच्‍या आकांक्षेनुसार तेथे स्‍थान मिळाले पाहिजे.

२. काश्‍मीरमधील हिंदूंची तीर्थक्षेत्रे धोक्‍यात !

हिंदूंची प्रमुख मंदिरे असलेल्‍या भागांना हिंदू नावे होती. त्‍यामुळे येथे हिंदु संस्‍कृती असल्‍याची ओळख होत होती; पण आता ही संस्‍कृती उखडून टाकण्‍याचे काम केले जात आहे.

२ अ. शंकराचार्य मंदिराच्‍या डोंगराचे नाव ‘तख्‍त-ए-सुलेमान’ झाले आणि आंदोलन केल्‍यानंतर त्‍या नावाचा फलक हटवला गेला ! : श्रीनगर येथे डोंगरावर जे शंकराचार्य मंदिर आहे, त्‍या डोंगराचे नाव ‘शंकराचार्य डोंगर’ असे आहे; पण धर्मांध त्‍याला आता ‘तख्‍त-ए-सुलेमान’ म्‍हणत आहेत.

शंकराचार्य मंदिरावर चढून पाहिल्‍यास तेथे पीरबाबा करण्‍यात आला आहे. पूर्वी या शंकराचार्य मंदिरात कोणताही पीरबाबा नव्‍हता. तेथील पर्वतावर कोणतेही बांधकाम करण्‍यास अनुमती नव्‍हती; पण तेथे बांधकाम चालू होते. तेथे पुष्‍कळ मोठमोठे ध्‍वज लावले असून त्‍यावर अरबी भाषेत काहीतरी लिहिले आहे. मोठमोठे सापळे लावण्‍यात आले आहेत. शंकराचार्य मंदिर खाली आहे. तेथे जाण्‍यासाठी अनुमती लागते. या मंदिराचे नाव ‘तख्‍त-ए-सुलेमान’ ठेवले जाते.

याविरोधात पुण्‍यात धरणे-आंदोलने करावी लागली. लोकांनीही साथ दिल्‍याने ‘तख्‍त-ए-सुलेमान’चा फलक हटवला गेला. काश्‍मीरला लाभलेला ५ सहस्र वर्षांचा जुना इतिहास नष्‍ट करून त्‍याला नवीन इतिहास जोडण्‍याचाच हा प्रयत्न आहे. त्‍या विरोधात आमचा लढा चालू आहे.

२ आ. ‘हरिपर्वत’ या शक्‍तीपिठाचे नामकरण ‘कोहीमारन’ होणेे : श्रीनगर येथे आमची एक इष्‍टदेवी आहे. ते शक्‍तीपीठ आहे. तेथे आंध्रप्रदेश आणि कोलकाता येथून लोक येतात. त्‍याला आम्‍ही ‘हरिपर्वत’ म्‍हणतो. ते देवीचे पुष्‍कळ मोठे शक्‍तीपीठ आहे. धर्मांधांनी त्‍याचेही नाव पालटून ते ‘कोहीमारन’ असे केले आहे.

२ इ. श्रीनगर नव्‍हे, ‘शहर-ए-खास’ करण्‍याचा घाट घालणे : श्रीनगर हे शहर राजा अशोक याने वसवले आहे. त्‍याचे नामकरण आता त्‍यांनी ‘शहर-ए-खास’ करण्‍याचा घाट घातला आहे. आमची जी प्रमुख मंदिरे होती, त्‍या भागांना हिंदू नावे होती. त्‍यामुळे तेथे हिंदु संस्‍कृती असल्‍याची ओळखही होत होती; पण सध्‍या ही संस्‍कृती उखडून टाकण्‍याचे काम केले जात आहे.

३. कौसरनाग यात्रेसाठी पर्यटकांना अनुमती; मात्र भाविकांना नाही !

प्राचीन कौसरनाग यात्रेत गटाने जात असतांना पुणे आणि देहली येथील लोकांनी मिळून तेथील जिल्‍हाधिकार्‍यांकडे अनुमती मागितली अन् ती मिळालीही; पण तेथील फुटीरतावादी नेता गिलानी याने यात्रेला विरोध केला. त्‍यामुळे राज्‍य सरकारने ही अनुमती रहित केली. ‘तेथील पर्यावरण धोक्‍यात येईल’, असे कारण या वेळी सांगितले गेले. तेथे पर्यटकांना जाऊ दिले जाते; पण भाविकांना अनुमती दिली जात नाही.

३ अ. कौसरनाग यात्रा त्‍वरित चालू करण्‍याची मागणी ! : ‘कौसरनाग यात्रा त्‍वरित चालू केली जावी आणि तेथे मशीद उभारण्‍याची चालू असलेली प्रक्रिया बंद केली जावी. तेथे हिंदूंना यात्रा करण्‍याची अनुमती दिली जावी. तेथील मूळनिवासींना तेथे जाण्‍याचा अधिकार आहे. त्‍यामुळे राज्‍य सरकारने यासाठी अनुमती द्यावी’, अशी आमची मागणी आहे.

४. विष्‍णुपाद तीर्थक्षेत्राच्‍या ठिकाणी मशिदीची रचना केली जाणे

‘विष्‍णुपाद नावाच्‍या तीर्थक्षेत्री भगवान श्रीविष्‍णूंनी आपला तिसरा चरण ठेवला होता’, अशी श्रद्धा आहे. त्‍या प्राचीन मंदिरात जाण्‍याची धर्मनिरपेक्ष भारतात हिंदूंना अनुमती नाही. तेथे एका मशिदीची रचना केली जात आहे. हिंदूंच्‍या या प्राचीन तीर्थक्षेत्राचा उल्लेख ‘नीलमत’ पुराण आणि ‘राजतरंगिणी’ ग्रंथात आहे. असे असतांना येथे मशीद होते. हा तर आमचा धर्मनिरपेक्ष भारत आहे. मग हा अन्‍याय हिंदूंवरच का ? काश्‍मिरी पंडितांवरच का ? याचे काहीतरी उत्तर मिळालेच पाहिजे. जर सर्व हिंदू एकवटले नाहीत, तर तेथे कौसरनाग मशीद उभी राहील. मग ती तोडताही येणार नाही. यासाठी आपण मोदी सरकारवर दबाव आणला पाहिजे, मग मोदी सरकार राज्‍य सरकारवर दबाव आणेल आणि आमची ही तीर्थक्षेत्रे आम्‍हाला परत मिळतील.

५. मंदिरांचे अस्‍तित्‍व नष्‍ट होत असल्‍याचे दर्शवणारी घटना !

एका गावात २ मंदिरे होती; पण आता तेथे मंदिरांचा दगडही शिल्लक नाही. केवळ एक झाड होते. दुसर्‍या दिवशी तेथे गेल्‍यावर झाडही जाळण्‍यात आले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्‍यावर त्‍यांनी चौकशी करणार असल्‍याचे सांगितले.

आणखी एका मंदिराची भूमी शेजार्‍याने कह्यात घेतली. मी त्‍याला विचारले, ‘‘तुम्‍ही येथे कुठून आलात ?’’ तो म्‍हणाला, ‘‘आता तुमचे कुणी नाही.’’ यासाठीच आम्‍ही केंद्रशासनाकडे मंदिरांविषयीचे विधेयक पारित करण्‍याची मागणी करत आहोत; पण ते करत नाहीत. जर मुसलमानांच्‍या संदर्भात काही असते, तर त्‍यावर लगेच कार्यवाही झाली असती; पण हा हिंदूंचा विषय असल्‍याने त्‍याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

६. ‘जो इस्‍लाम मानत नाही, तो काफीर आहे, हिंदूंची मंदिरे तोडणे आणि तेथील भूमी कह्यात घेणे अन् जमेल तेथे हिंदूंना धर्मांतरित करणे’, ही या सर्व प्रक्रियेमागील विचारधारा आहे.

७. सरकारने जागरूकता दाखवणे आवश्‍यक !

आम्‍ही बाबरी मशीद बांधतांना पाहिलेले नाही; पण आम्‍हा सर्वांची ही श्रद्धा आहे की, तेथे राममंदिर होते. आम्‍ही रामजन्‍मभूमीच्‍या एवढ्या प्राचीन सूत्रावरून न्‍यायालयात लढत आहोत, ते हे सांगण्‍यासाठी की, तेथे जी बाबरी मशीद बांधण्‍यात आली, ते चुकीचे होते. येत्‍या ५० किंवा १०० वर्षांत जी पुढची पिढी येईल, ती पिढीही कौसरनागसाठी लढेल. शासनाला आपली जागरूकता दाखवून द्यावी लागेल.

– श्री. राहुल कौल, अध्‍यक्ष, ‘यूथ फॉर पनून कश्‍मीर’, पुणे.