वर्ष २०१८ च्या तुलनेत वर्ष २०१९ मध्ये दंगली, हत्या, बलात्कार आदींच्या घटनांत अल्प प्रमाणात घट ! – केंद्र सरकारचा दावा

देशातील गुन्हेगारीत अल्प प्रमाणात घट होण्याऐवजी ते पूर्णपणे रोखणे हेच लक्ष्य असले पाहिजे, तरच समाज सुरक्षित आणि शांततेत जगू शकेल !

नवी देहली – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार वर्ष २०१९ मध्ये देशातील दंगली, हत्या, बलात्कार आदींच्या घटनांमध्ये घट झाली, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत लिखित उत्तरात दिली. तसेच सरकार सर्व गुन्ह्यांच्या नोंदींचे ‘डिजिटलाझेशन’ करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

१. देशात वर्ष २०१८ मध्ये दंगलीचे ५१२ गुन्हे नोंद झाले होते; मात्र वर्ष २०१९ मध्ये ती संख्या ४४० इतकी होती.

२. वर्ष २०१८ मध्ये बलात्काराच्या ३३ सहस्र ३५६, हत्येच्या २९ सहस्र १७, तर अपहरणाच्या १ लाख ५ सहस्र ७३४ घटना घडल्या होत्या. त्या तुलनेत वर्ष २०१९ मध्ये बलात्काराच्या ३२ सहस्र ३३, हत्येच्या २८ सहस्र ९१८ आणि अपहरणाच्या १ लाख ५ सहस्र ३७ इतक्या घटना घडल्या.

३. वर्ष २०१८ ते २०२० या काळात भारतात घुसखोरीच्या घटना घडल्या. त्यात पाकमधून ११६, बांगलादेशातून २ सहस्र ८१२, तर म्यानमारमधून ३२५ लोकांनी घुसखारी केली.