बाबरीचा ढाचा पाडण्यापूर्वीच बांगलादेशात हिंदूंवर चालू झाले होते अनन्वित अत्याचार !

  • २ सहस्र ४०० महिलांवर बलात्कार करून नग्न परेड करण्यात आली !

  • ३ सहस्र ५०० मंदिरे पाडली गेली !

६ डिसेंबर १९९२ हा असा दिनांक आहे, ज्या दिवशी हिंदु संघटना प्रतिवर्षी ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करतात; मात्र या दिवशी हिंदुद्वेषी हे हिंदूंना दुसर्‍या धर्माचे प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त केल्याचे भासवण्याचा प्रयत्न करतात. खरेतर सत्य हे आहे की, ती वास्तू (बाबरी ढाचा) इस्लामी आक्रमकांनी राममंदिर पाडून बांधली होती. राममंदिरासाठी हिंदू संघर्ष करत असतांनाच्या काळात हीच साम्यवादी-उदारमतवादी टोळी बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात काय चालले होते, हे विसरते.

श्री ढाकेश्वरीदेवीच्या मंदिरातील एका मूर्तीची धर्मांधांनी केलेली हानी (छायाचित्र सौजन्य : जयंता कार्माेकेर यांच्या ‘एक्स’ खात्यावरून)

(हे छायाचित्र कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी प्रसिद्ध केलेले नसून हिंदूंवरील अत्याचाराची दाहकता लक्षात येण्यासाठी प्रसिद्ध केलेले आहे. – संपादक)

१. बाबरीचा ढाचा पाडल्याच्या अफवा पसरवून बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार

खरेतर जेव्हा भारतात राममंदिरासाठी संघर्ष चालू होता आणि बाबरीचा ढाचा पाडल्याच्या अफवा पसरत होत्या, तेव्हा बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार करत तेथे हिंसाचार चालू झाला. हिंदू ५ शतके लढले आणि न्यायिक मार्गाने राममंदिराचा अधिकार मिळवला; परंतु इस्लामिक जमाव नियम आणि कायदे पाळत नाही. २ नोव्हेंबर १९८९ हा तो दिवस होता, जेव्हा वादग्रस्त म्हणवणार्‍या जागेवर राममंदिरासाठी प्रतिकात्मकदृष्ट्या पहिला दगड ठेवण्यात आला होता.

ही बातमी बांगलादेशात पोचताच तेथे हिंसाचार चालू झाला. ऑक्टोबर १९९० मध्येच बांगलादेशच्या माध्यमांनी एक अफवा पसरवली होती, ‘बाबरीची इमारत भारतात उद्ध्वस्त झाली आहे.’ तेथील प्रसारमाध्यमांचाही यात मोठा वाटा आहे. वर्ष १९८८ मध्ये तत्कालीन हुकूमशहा अध्यक्ष हुसेन महंमद इर्शाद यांनी ‘इस्लामला बांगलादेशचा अधिकृत धर्म’ म्हणून घोषित केले. यावरून त्या वेळचे बांगलादेशातील वातावरण समजू शकते.

२. बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेली आक्रमणे आणि महिलांवर करण्यात आलेले अनन्वित अत्याचार

आता ३० ऑक्टोबर १९९० चा दिवस आला. इर्शाद त्या दिवशी ‘बंग भवन’ येथे युवा परिषदेला संबोधित करत होते. ते सांगत होते की, ते तिथे असतांना अल्पसंख्यांकांवर आक्रमणे होऊन हिंसाचार होणार नाही. त्याच वेळी कट्टरतावादी मुसलमानांचा जमाव हिंदूंच्या दुकानांवर आक्रमणे करत होता. जमावाने गौरी मठाला लक्ष्य केले. जे ‘बंग भवन’च्या दक्षिणेला होते, म्हणजेच इर्शाद यांच्या कार्यक्रमापासून काही किलोमीटर अंतरावर हिंदूंच्या मालमत्तांना आग लावली जात होती. ‘ह्युमन राईट्स काँग्रेस फॉर बांगलादेश मायनॉरिटीज’ यांनी नंतर प्रसिद्ध केलेल्या अहवालात सांगितले की, हा सर्व प्रकार पोलीस प्रशासनासमोर घडला होता.

वर्ष १९८९-९० मध्ये बांगलादेशात हिंदूंविरुद्ध झालेल्या हिंसाचाराला दंगल म्हणता येणार नाही; कारण ‘ती वर्ष १९६४ मध्ये एकाच पक्षाने घडवून आणलेल्या दंगलीप्रमाणे होती’, असे अहवालात म्हटले आहे. या अत्याचारांमध्ये तत्कालीन सत्ताधारी पक्षांचाही हात होता. वर्ष १९९२ मध्ये सत्ताधारी पक्ष ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’चा सहयोगी असलेला ‘जमात-ए-इस्लामी’ हा पक्ष स्वतः हिंसाचारात सामील होता. अहवालात असे म्हटले आहे की, एकट्या १९८९-९० मध्ये १ सहस्रांहून अधिक महिलांवर बलात्कार करण्यात आले, शेकडो मंदिरे पाडण्यात आली आणि हिंदू अल्पसंख्यांकांची घरे लुटून त्यांना आग लावण्यात आली.

३. इस्लामिक कट्टर पंथियांनी विविध जिल्ह्यांमध्ये केलेला नंगानाच

६ डिसेंबर १९९२ च्या रात्री चितगावमध्ये हिंदूंवर दहशतीचे नग्न नृत्य झाले. कुतुबदिया येथे ३ मुलांना जिवंत जाळण्यात आले. यानंतर राजधानी ढाका आणि बांगलादेशच्या इतर भागात हिंसाचार पसरला. ‘हिंदु, बौद्ध आणि ख्रिस्ती एकता परिषदे’ने (‘एच्.बी.सी.’ने) त्या भागांना भेट देऊन अहवाल सिद्ध करण्यासह हानीचे पंचनामे केले होते.

अ. या अहवालात म्हटले आहे की, २८ सहस्र घरे, ३ सहस्र ५०० हिंदु मंदिरे / धार्मिक संस्था आणि हिंदूंच्या २ सहस्र ५०० व्यावसायिक प्रतिष्ठानांची हानी केली किंवा ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. यांसह १५ जणांची हत्या, तर २ सहस्र ४०० हिंदु महिलांवर बलात्कार करण्यात आले. सरकारने अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी किंवा इस्लामिक कट्टर पंथियांना रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. हिंदूंच्या १४ कोटी ८० लाख रुपयांच्या मालमत्तेची हानी झाल्याचे अनुमान आहे, ज्याचे आजचे मूल्य अनुमाने ३९ कोटी रुपये असेल.

आ. जुन्या ढाक्यातील शांखरी बाजारात एकही हिंदु दुकान शेष राहिले नाही. सिल्हेट जिल्ह्यात अल्पसंख्यांकांना एवढी वाईट वागणूक दिली गेली की, त्यांच्या पुढच्या अनेक पिढ्यांना याची आठवण असेल. भोलाचे तत्कालीन खासदार तौफीद अहमद आणि सर्वपक्षीय आघाडीचे सचिव नरुल इस्लाम नाहिद यांनी वर दिलेली आकडेवारी न्यून असल्याचे मत व्यक्त केले, म्हणजे अत्याचार यापेक्षा अधिक होते. महिलांवर सामूहिक बलात्कार तर झालाच; पण त्यांना रस्त्यावर नग्नावस्थेत फिरायला भाग पाडले. अनेक अल्पवयीन मुलींवरही बलात्कार झाला, ज्यात ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचा समावेश आहे. काही गावांमध्ये ५ ते ७० वर्षे वयोगटातील एकही महिला मागे राहिली नाही.

इ. बांगलादेशच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही त्यांच्या ‘लज्जा’ या कादंबरीत वर्ष १९९२ मध्ये ढाकेश्वरी मंदिरावर कसे आक्रमण झाले, याचा उल्लेख केला आहे. मुख्य मंदिर जाळण्यात आले. देवीदेवतांच्या मनोरंजनासाठी बांधण्यात आलेल्या ‘नटमंदिरा’लाही आग लावली. ‘माधव गुडिया मठ’ही पाडण्यात आला. जयकाली मंदिरही सोडले नाही.

ब्राह्म समाजाच्या आवारात घुसून सर्व काही नष्ट केले. डेमरा येथील शोनी आखाडा मंदिर लुटण्यात आले. बृहभद्र आणि लोकीबाजार येथे दृष्टी जाईल तिथपर्यंत विध्वंस होता. इस्लामपूर रोडवर छत्र्या अन् दागिने विकणारी दुकाने लुटण्यात आली. ३०० आतंकवाद्यांनी २५ घरांना लक्ष्य केले. अनेक हिंदू दुकानांची नावे उर्दू नावांनी पालटण्यात आली.

नोबाबपूर रोडवर असलेले ‘मोरो चांद’ नावाचे मिठाईचे दुकान पाडण्यात आले. नोबाबपूरमध्ये ‘कामधों पोशरी’ आणि ‘शुक्ल मिष्टान भंडार’ ही दुकाने लुटण्यात आली. ‘जतीन अँड कंपनी’च्या कारखान्याला आग लावली. रायर बाजार येथील मां काली मंदिरातील देवीची मूर्ती तोडून भूमीवर फेकण्यात आली. थाथरी बाजारातील बटाली मंदिर फोडून लुटले. सोडरघाट रोडवर असलेला रतन शंकर बाजार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.

ई. लालबाग रोडवरील दुर्गा मंदिर, पुष्पराज साह लेनवर असलेले गिरिगोवर्धन जीतू मंदिर, हरनाथ घोष लेनवर असलेले रघुनाथ जिऊ आखाडा आणि लालबागवरील कमरांगीचार स्मशानभूमी हे सर्व वर्ष १९९० मध्येच नष्ट झाले. ज्या भारताने बांगलादेशला स्वातंत्र्य दिले होते, त्या काळात सूत्रापूरमध्ये १४ मंदिरे पाडण्यात आली आणि त्याच शहरातील बेलटोली लेनमधील १७ हिंदूंवर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले.

४. बाबरी ढाचा पाडल्यावर गदारोळ करणार्‍यांकडून बांगलादेशातील विध्वंसाचा उल्लेख कधी ऐकला आहे का ?

हिंदूंवर करण्यात आलेल्या अत्याचाराविषयी लेखिका तस्लिमा नसरीन लिहितात, ‘ही दंगल नव्हती; कारण दंगलीत दोन्ही बाजू लढतात. हा तर एका समाजाकडून दुसर्‍या समाजावर केलेला अत्याचार होता. बाबरी ढाचा पाडल्यावर गदारोळ करणार्‍यांना या विध्वंसाचा उल्लेख करतांना तुम्ही कधी ऐकले आहे का ? ज्या इस्लामी जमावाने वर्ष १९८९ ते १९९२ मध्ये बांगलादेशात कहर केला आणि हिंदूंवर अत्याचार केले यांविषयी का बोलले जात नाही ?’

(साभार : ‘ऑप इंडिया’चे संकेतस्थळ, ६.१२.२०२३)