भारतीय आणि सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र आहे. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्या वेळी भारतीय सौर चैत्र महिना चालू होतो. चैत्र महिन्यात वसंत ऋतूचा प्रारंभ होतो. नवीन शकसंवत्सर हे चैत्र शुक्ल प्रतिपदेला, गुढीपाडव्याच्या दिवशी चालू होते. भारतीय संस्कृती आणि परंपरेत चार नवरात्र साजरी केली जातात. पैकी पहिले नवरात्र चैत्र महिन्यात येते. चैत्र प्रतिपदेपासून ते रामनवमीपर्यंत नवरात्र साजरे करण्यात येते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतू चालू होत असल्यामुळे या नवरात्राला ‘वासंती नवरात्र’ असेही म्हटले जाते. चैत्र महिना मराठी नववर्षातील पहिला महिना आहे. चैत्रापासून शक संवत्सर बदलते. शालिवाहन शके १९४६ मध्ये क्रोधी नामसंवत्सर होते. शालिवाहन शक १९४७ – ‘विश्वावसु’नाम संवत्सर असणार. चला तर मग जाणून घेऊया चैत्र महिन्याचे महत्त्व आणि चैत्राच्या विविध मान्यतांविषयी…
सृष्टीची निर्मिती
ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली, त्या दिवसापासून जीवनमान चालू झाले. म्हणून चैत्रापासून नववर्ष मानले जाते. चैत्र प्रतिपदेला दुर्गादेवी प्रकट झाली होती आणि दुर्गादेवीच्या सूचनेवरून ब्रह्मदेवांनी या दिवशी सृष्टीची रचना केली, म्हणून चैत्र प्रतिपदेपासून हिंदू नववर्ष साजरे केले जाते, अशी मान्यता आहे. महान गणितज्ञ भास्कराचार्य यांनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत एक दिवस, महिने आणि वर्ष अशी कालगणना करून पंचांग निर्माण केले, असे सांगितले जाते. म्हणूनच गुढीपाडव्याला अधिक महत्त्व आहे.
श्रीराम आणि गुढीपाडवा
भगवान विष्णूंनी सातवा रामावतार चैत्र शुक्ल नवमीला घेतला. याच दिवशी रामनवमी साजरी केली जाते. श्रीराम वनवासात असतांना त्यांची भेट सुग्रीवाशी होते. वानरराज वालीच्या अत्याचाराचे सर्वकथन सुग्रीव श्रीरामांसमोर करतात. अखेर वालीचा वध करण्याचा निर्णय श्रीराम घेतात. वालीचा वध करून श्रीरामांनी दक्षिणेतील प्रजेला अत्याचारापासून मुक्त केले. प्रजाजनांनी विजयाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला. त्या दिवसापासून गुढीपाडवा साजरा करण्याची प्रथा चालू झाली, असे सांगण्यात येते.
आरोग्यकारक गुढीपाडवा
गुढीपाडवा, चैत्र महिना हा हिंदु धर्म, संस्कृती आणि नववर्ष म्हणून साजरा केला जात असला, तरी त्याचे आरोग्याच्या दृष्टीनेही तितकेच महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या अनेक कथा प्रचलित आहेत. आंध्रप्रदेशात या दिवशी विशेष प्रकारचा प्रसाद वाटला जातो. या प्रसादाच्या सेवनाने मानवी शरीर निरोगी रहाण्यास साहाय्य होते. त्वचारोग निवारण्याची क्षमता त्यात असते, असे म्हटले जाते. आंब्याचे सेवन केल्याने मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते, तसेच कडुनिंबाच्या चटणी शरीरासाठी पाचक मानली जाते. उन्हाची काहिली सहन करण्यासाठी शरीर सज्ज व्हावे म्हणून अनेक प्रकारचा विशेष आहार घेतला जातो.
वासंती नवरात्रोत्सव
चैत्र महिन्यात वासंती नवरात्र साजरे केले जाते. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथे नवरात्र मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस देवी व्रत, पूजन आणि भजन केले जाते. पहिल्या दिवशी दैवी शैलपुत्री, दुसर्या दिवशी देवी ब्रह्मचारिणी, तिसर्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंध माता, सहाव्या दिवशी कात्यायणी, सातव्या दिवशी कालरात्री, आठव्या दिवशी महागौरी, तर नवव्या दिवशी सिद्धिदात्री अशा देवींच्या नऊ स्वरुपाचे पूजन केले जाते.
(साभार : ‘ज्योतिषम् वास्तू ज्योतिष केंद्र, हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर)