संपादकीय : हिंदू कधी जागे होणार ?

प्रतिकात्मक छायाचित्र

संपूर्ण जगाला लोकसंख्यावाढीचे दृश्य परिणाम जाणवू लागले आहेत. त्यानुसार प्रत्येक देश लोकसंख्या अल्प करून ती नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानुसार जागतिक लोकसंख्या दिवसही साजरा केला जातो. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यातून १ किंवा २ अपत्ये का असावीत ? त्याचा लाभ काय ? याविषयी माहिती देऊन लोकांमध्ये जनजागृती केली जाते. यंदा नुकताच जागतिक लोकसंख्या दिवस पार पडला. त्या निमित्ताने एके ठिकाणी ज्यांना एकच अपत्य आहे, अशा पालकांचा सत्कार करण्यात आला. थोरामोठ्यांची याप्रसंगी भाषणेही झाली. या भाषणांमध्ये त्यांनी ‘एकच अपत्य कसे योग्य आहे ?’, यावर त्यांचे विचार मांडले. दुसरीकडे आपण वर्तमानपत्र चाळले, तर असे लक्षात येते की, लोकसंख्या नियंत्रित करणे किंवा वाढ होऊ न देणे, हे केवळ हिंदु समाजाला लागू आहे का ? कारण मुसलमान महिलेला होणार्‍या अपत्यांच्या संख्येत अधिक प्रमाणात वाढ होत आहे. शरीफा नावाच्या महिलेला १५ वर्षांत १३ मुले झाली. त्या बातमीच्या खाली लिहिले होते, ‘हिंदूंनो, तुम्ही केवळ आयकर भरा.’ स्वातंत्र्यापासून मागच्या ७५ वर्षांमध्ये हिंदूंची लोकसंख्या ३६ कोटींवरून १०९ कोटी, म्हणजे तिप्पट झाली. मुसलमानांची लोकसंख्या अडीच कोटींवरून २० कोटी झाली, म्हणजे ६ पट झाली. भारतात ख्रिस्त्यांची लोकसंख्या ८० लाखांवरून ३ कोटी, म्हणजे तिपटीहून अधिक झाली.

हिंदुत्वनिष्ठ उमेदवारांना मतदान न करण्याविषयी फतवे निघणे !

आपण शेकडो वर्षे इंग्रजांच्या आधी मोगलांचा काळ पाहिलेला आहे. त्यांचे अत्याचार, धर्मांतर, महिलांवरील अत्याचार हा सर्व इतिहास आपण पाहिला आहे. मोठ्या कष्टाने आम्ही त्यातून कशीबशी सुटका करून घेतली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या म्हणजे हिंदुत्वनिष्ठ उमेदवारांना मतदान न करण्याविषयी फतवे निघाले होते. निवडणुकीत मुसलमानांच्या एकगठ्ठा मतदानाचा फटका अनेक ठिकाणी बसला आहे. कोट्यवधी लोकांचा अशिक्षित समाज अतिशय सुनियोजितपणे हिंदूंच्या विरोधात कटकारस्थान करत आहे. याकडे पाहून हिंदूंनी बोध घेण्याची आवश्यकता आहे. एकीकडे सुनियोजितपणे एकगठ्ठा मतदान करणारा समाज आणि दुसरीकडे जाती-पातीच्या राजकारणामध्ये मग्न झालेला हिंदु समाज, असे चित्र आहे. हे असेच चालू राहिले, तर भविष्यात आम्ही आपला पंतप्रधानसुद्धा स्वतः ठरवू शकणार नाही. निवडणुकीच्या आधी काही राजकीय पक्ष समोर येतील. हिंदूंना पुन्हा एकदा जाती-पातीमध्ये व्यस्त करून टाकतील आणि निवडणूक जिंकून मोकळे होतील. एकीकडे बहुसंख्य होण्याचे स्वप्न पाहिले जात आहे. देहलीवर राज्य करण्याचे स्वप्न पाहिले जात आहे, तर दुसरीकडे एक अपत्य कसे चांगले आहे, याचे गोडवे गायले जात आहेत. हा समाज म्हणून किती मोठा विरोधाभास आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे निसर्ग, पर्यावरण, साधन, सामग्री, अन्नधान्य या सर्वांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, असा तर्क दिला जातो; परंतु केवळ हिंदूंचीच लोकसंख्या वाढल्यामुळे हा तुटवडा निर्माण होईल का ? किंवा हिंदूंची लोकसंख्या वाढली नाही, म्हणून हा तुटवडा निर्माण होणार नाही का ? इतर धर्मियांची लोकसंख्या जर ६ पट होत आहे, तर हा तुटवडा निर्माण होऊ शकतोच !

धर्मांधांची लोकसंख्यावाढ शांततेला धोकादायक !

काही लोक म्हणतील ‘मुसलमान जसे वागतात, तसे आपण वागलेच पाहिजे का ?’ देशात धर्मांध मुसलमानांकडून जातीय दंगली घडवल्या जात आहेत. यामध्ये असंख्य हिंदूंच्या संपत्तीची हानी आणि बर्‍याच ठिकाणी हिंदूंची हत्या करून काही हिंदूंना गंभीर घायाळही करण्यात आले आहे. कट्टरवादी लोकांची संख्या वाढणे, हे जगाच्या शांततेलाच धोकादायक आहे. आपलेही जीवन यामुळे धोक्यात येऊ शकते. आपली मुले, नातवंडे यांना या सर्व गोष्टींचा त्रास सहन करावा लागू शकतो. नुकताच अलाहाबाद उच्च न्यायालयाने याविषयी एक निर्णय दिला आणि त्यावर टिप्पणी करतांना सांगितले की, भारतामध्ये बहुसंख्य समाजाचे धर्मांतर करण्याचे जे प्रयत्न इतर अहिंदु धर्मियांकडून चालू आहेत, त्यामुळे एक दिवस हा बहुसंख्य समाज अल्पसंख्य झाल्याविना रहाणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या प्रयत्नांना थांबवणे आवश्यक आहे. ‘रिलिजियस डेमोग्राफी ऑफ इंडिया’ या सरकारी विभागाने ‘बहुसंख्य समाज भविष्यात अल्पसंख्य होऊ शकतो’, हा धोका वर्तवला आहे. मुसलमान समाज हा मुलांची संख्या केवळ त्यांचे धार्मिक धोरण म्हणून वाढवत आहे. ते समाज म्हणून विचार करत आहेत आणि हिंदू व्यक्ती म्हणून विचार करत आहेत. हा दोघांमधील पुष्कळ मोठा भेद आहे.

हिंदूंनो, मुलांना धर्मशिक्षण द्या !

भारतातील उच्चशिक्षित लोक मुलांविषयी कसा विचार करतात ? याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. ‘झिरोदा’ या आस्थापनाचे मालक निखिल कामत म्हणाले की, मुलांच्या संगोपनासाठी माझ्या जीवनातील १८ ते २० वर्षे मी व्यय करू शकत नाही. मला मूलमुक्त (चाईल्ड फ्री) रहायला आवडेल. मुलांना मोठे करा आणि एके दिवशी ते तुम्हाला सोडून निघून गेले, तर काय करणार ? अशा पद्धतीचे शिकलेले अब्जाधीश लोक जर असे बोलू लागले, तर तरुण पिढीसमोर कोणता संदेश जाईल, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. निखिल कामत यांनी हिंदु धर्माचे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे ४ आश्रम समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यांनी ते समजून घेतले असते, साधना केली असती, तर ‘माझ्या मुलांना धर्मशिक्षण देऊन मी त्यांना संत बनवीन’, असे ते म्हणाले असते.

हिंदूंना जागे करा !

एकीकडे जिहाद म्हणून मुलांची संख्या वाढवणारा मुसलमान समाज, तर दुसरीकडे ‘चाईल्ड फ्री’ जीवन जगायला निघालेले हिंदु लोक ! आम्ही असू, तर आमचा धर्म, संस्कृती, इतिहास हे सर्व टिकेल. ख्रिस्ती आणि मुसलमान यांनी त्यांच्या धर्माचा प्रचार केला. धर्माचा प्रचार होणे, ही तर दूरची गोष्ट आहे; परंतु किमान आमचा धर्म टिकला पाहिजे, यासाठी ‘चाईल्ड फ्री’ किंवा एकच अपत्य मानसिकता टाकून देणे आवश्यक आहे. ‘हिंदूंनी पुष्कळ मुलांना जन्माला घालावे’, असे यातून सांगणे नाही. ज्या हिंदूंना १-२ अपत्ये आहेत, त्यांच्यावर चांगले संस्कार करून, धर्मशिक्षण देऊन त्यांच्याकडून जगात हिंदु धर्माचा प्रचार करण्यासाठी हिंदु माता-पित्यांनी धडपड केली पाहिजे. आज जागे झालो नाही, तर भविष्यात जागे होण्याची संधीही मिळणार नाही. आपल्या हिंदुत्वाविषयी अपराधबोध ठेवण्याची आवश्यकता नाही. ‘फेक नॅरेटिव्ह’ला (खोट्या प्रचाराला) ‘थेट नॅरेटिव्ह’ने उत्तर देण्याची ‘इकोसिस्टीम’ (विरोधकांना शह देण्यासाठी विविध स्तरांवर राबवलेली कार्यप्रणाली) हिंदूंनी सिद्ध करायला हवी. त्यासाठी सर्व हिंदूंनी योगदान देण्याची आवश्यकता आहे.

भारतातील लोकसंख्या नियंत्रित करणे किंवा वाढ होऊ न देणे, यासाठी समान नागरी कायदा करणे आवश्यक !