प्रत्याक्रमण करून भारताची भूमी बळकावणार्‍या लुटारूंना अद्दल घडवणारे आणि गमावलेला भूप्रदेश पुन्हा जिंकून घेणारे पराक्रमी हिंदु राजे !

१ अ. तह आणि संधी तोडण्यासाठीच केल्या जातात, असे नीतीशास्त्राने सांगणे : आपण भारताच्या विभाजनाला आपल्या अंतःकरणातील कोणत्यातरी कोपर्‍यात एक निर्णीत तथ्य (सेटल्ड फॅक्ट) समजून बसलो आहोत. राज्याच्या सीमारेषा मानचिन्हावर तलवारीचे टोक ठेवून आखल्या जातात. त्या स्थायी, सेटल्ड फॅक्ट किंवा शाश्‍वत नसतात. तलवारीच्या टोकाने काढलेल्या राज्याच्या सीमारेषा या राष्ट्रभक्तांद्वारे तलवारीच्या धारेनेच पुसल्या जातात, हे इतिहासाने अनेकदा पाहिले आहे. युद्धात बळकावलेल्या भूमीला युद्ध करूनच मुक्त करण्यात आले, केले आहे आणि यापुढेही केले जाईल. तह आणि संधी यांचे बंधन विजेता किंवा बलवान यांनी पराजित किंवा दुर्बल यांवर थोपलेले असते. अनुकूल संधी मिळताच दुर्बलातील दुर्बल राष्ट्रही ही बंधने तोडण्यास कचरत नाही. नीतीशास्त्रही हेच सांगते की, तह आणि संधी तोडण्यासाठीच केल्या जातात. इतिहासात याची उदाहरणे आहेत.

१ आ. नीतीशास्त्राच्या विधानाला पुष्टी देणारी भारतीय इतिहासातील असंख्य उदाहरणे : वर्ष १९४७ मध्ये जर भारतीय सेनेला जम्मू-काश्मीर मुक्त करू दिले असते, तर चीनला लडाखला बळकावण्याचे धाडसच काय; पण तिबेटमध्ये पाय ठेवण्यापूर्वीही शंभर वेळा विचार करावा लागला असता. महाराज रणजित सिंहांच्या राज्यात हिंदु केवळ १४ टक्के होते; परंतु लाहोरच्या प्रतापापुढे काबूल थरथर कापायचे आणि इंग्रज दबकून वागायचे. जिनांनी भारताचे विभाजन केले; पण डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासारख्या प्रखर देशभक्ताने पंजाब आणि बंगाल हे हिंदूबहुल क्षेत्र विभाजित करून पाकिस्तानचेच विभाजन केले होते अन्यथा पाकिस्तानची सीमा देहलीच्या मस्तकापर्यंत आली असती.

१ इ. प्रत्याक्रमण करून भारताची भूमी बळकावणार्‍या लुटारूंना अद्दल घडवणारे आणि गमावलेला भूप्रदेश पुन्हा जिंकून घेणारे पराक्रमी हिंदु राजे : मागील (सुमारे) १ सहस्र वर्षांच्या पराधिनतेच्या काळात जी भूमी आपल्यापासून कोणा विदेशी किंवा परधर्मी यांनी हिसकावून घेतली, त्यांनी कालांतराने बळकावलेली भूमी स्वत:चीच आहे, अशी समजूत करून घेतली. नाहीतर अफगाणिस्तानाला (जाबुल आणि काबुल या हिंदु राज्यांनी बनलेल्या प्रदेशाला) पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न आपण केला नसता; गझनीत जाऊन महंमद गझनीवर प्रत्याक्रमण केले नसते; पृथ्वीराज चौहानने घोरीला २१ वेळा हरवूनही त्याला चोप देऊन अफगाणिस्तानच्या पार पिटाळून लावले नसते; तिथेपर्यंत शकांना हाकलून राजा विक्रमादित्याच्या अश्‍वांनी वंक्षू नदीच्या शीतल जलाने त्यांची तहान भागवली होती; कुम्मासारख्या पराक्रमी महाराणाने गुजरात आणि माळवा यांच्या सुलतानांना प्रथम एकट्याने अन् नंतर संघटितपणे परास्त करून गुजरात अन् माळवा येथे आपले महामण्डलेश्‍वर अधिष्ठित केले नसते; विजयनगरच्या रायांनी (शासकांनी) बहामनी राज्याचे गोवलकोंडा, अहमदनगर, बीदर, बीजापूर या नगरांवर चढाई करून स्वत:च्या अधिपत्याखाली घेतल्यानंतरही या नगरांना आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले नसते; निजामाला वारंवार हरवूनही पेशव्यांनी स्वत:च्या अधीन केले नसते. इंग्रजांनी त्यांच्या ऐतिहासिक कारकीर्दीत एकच उत्तम कार्य केले, ते म्हणजे टिपू सुलतानला संपवून राज्याचे मूळ अधिकारी वडीयार राजा याला म्हैसूरच्या राज्यगादीवर पुन: बसवले अन्यथा हैद्राबादप्रमाणे म्हैसूरलाही स्वतंत्र भारतात विलीन करण्यासाठी सरदार पटेल यांच्यासारख्या एखाद्या व्यक्तीची आवश्यकता अपरिहार्य होती.

– आनंद मिश्र अभय (संदर्भ : साप्ताहिक हिंदू सभावार्ता, १२ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०१४)