समस्त वारकरी संप्रदायाची पुणे येथील पत्रकार परिषदेत मागणी
पुणे, ३० सप्टेंबर (वार्ता.) – खरेतर समाजातील अंधविश्वास दूर करून ईश्वरभक्ती आणि सदाचरण यांकडे वळवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वारकरी संत-महात्म्यांनी केले आहे; मात्र त्याच साधू-संतांवर आक्षेपार्ह टीका करणार्या नास्तिकतावादी आणि अर्बन नक्षल समर्थकांना तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘जादूटोणाविरोधी कायद्या’च्या शासकीय समितीत घेतले. दुर्दैवाने ती समिती आजही कार्यरत असून या समितीचे सहअध्यक्ष ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे शाम मानव यांना खोटे लिखाण केल्याच्या गुन्ह्यात शिक्षा झाली होती, तर सदस्य अविनाश पाटील, मुक्ता दाभोलकर, माधव बावगे आदी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ या संघटनेचे सदस्य आहेत. या संघटनेने अनेक अपव्यवहार आणि घोटाळे केल्याचे अहवालच साहाय्यक धर्मादाय आयुक्त, सातारा यांनी सादर केले आहेत. महाराष्ट्र अंनिस या संघटनेच्या काही कार्यकत्यांना नक्षलवादी म्हणून अटक झाली होती. अशा घोटाळ्यांचा आरोप असणार्या, नक्षलवादाशी संबंधित आणि गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगलेल्या व्यक्तींचा भरणा असलेली जादूटोणा कायद्याची शासकीय समिती त्वरित विसर्जित करावी आणि वारकरी संप्रदायाच्या साधू-संतांना या समितीमध्ये स्थान द्यावे. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या सर्वांची हकालपट्टी केली नाही, तर ‘प्रत्येक जिल्ह्यात वारकरी संप्रदायाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल’, अशी चेतावणी समस्त वारकरी संप्रदायाच्या विविध संघटनांनी ३० सप्टेंबर या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पुणे पत्रकार संघात झालेल्या या पत्रकार परिषदेला वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. दत्तात्रय महाराज चोरघे, ह.भ.प. नामदेव महाराज वाळके, स्वराज्य संघाचे अध्यक्ष ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर, प्रज्ञापुरी अक्कलकोटचे संस्थापक श्री. प्रसाद पंडित, ‘राष्ट्रीय वारकरी परिषदे’चे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर, वारकरी संप्रदायाचे श्री. संजय शेठ थोरात आणि ‘राष्ट्रीय वारकरी परिषदे’चे प्रवक्ते ह.भ.प. महेंद्र महाराज मस्के हे उपस्थित होते.
वारकरी संप्रदायाच्या श्रद्धास्थानांची विटंबना वारकरी संप्रदाय कदापि सहन करणार नाही ! – ह.भ.प. दत्तात्रय महाराज चोरघे
एकीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची शासकीय पूजा करून त्याचा आशीर्वाद घेतात आणि दुसरीकडे शासकीय समितीवर नियुक्त केलेले शाम मानव हे सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय कार्यक्रमात ‘संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले, हे धादांत खोटे आहे’, अशा प्रकारची आक्षेपार्ह विधाने करतात. वारकरी संप्रदायाच्या श्रद्धास्थानांची विटंबना वारकरी संप्रदाय कदापि सहन करणार नाही.
अनेक प्रकारे घोटाळे करणारी संघटना स्वतःला विवेकवादी म्हणवते ! – ह.भ.प. बापू महाराज रावकर
एफ्.सी.आर्.ए. कायद्यानुसार कोणतेही वृत्तपत्र विदेशांतून पैसे घेऊ शकत नाही. असे असतांना महाराष्ट्र अंनिसने विदेशातून लाखो रुपये गोळा केले. पुस्तके, वृत्तपत्र, दिवाळी अंक आदींच्या माध्यमातून लाखो रुपयांची विज्ञापने गोळा करून त्याची माहिती हिशेबपत्रकात दाखवलीच नाही, आदी अनेक प्रकारे घोटाळे करणारी संघटना स्वतःला विवेकवादी, पुरोगामी म्हणवते. खरेतर अंनिसचे विश्वस्त मंडळ तात्काळ विसर्जित करून त्यावर प्रशासक नेमणे आवश्यक आहे; मात्र अशांना शासकीय समितीमध्ये स्थान कसे काय दिले दिले जाते ?, याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर नोंद घ्यावी.
‘महाराष्ट्र अंनिस’ संघटनेचे काही सदस्य श्रद्धांचे भंजन करणारे विचार जनतेच्या माथी मारत आहेत ! – ह.भ.प. महेंद्र महाराज म्हस्के
या समितीवर असलेले काही सदस्य सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून सरकारी खर्चाने श्रद्धांचे भंजन करणारे विचार जनतेच्या माथी मारत आहेत. त्यामुळे ती समिती तात्काळ विसर्जित झाली पाहिजे.
संतांवर टीका करणारे लोक सरकारवरही टीका करण्यास मागेपुढे पहात नाहीत ! – प्रसाद पंडित, संस्थापक, प्रज्ञापुरी अक्कलकोट
शाम मानव यांचे यु-ट्यूबवर २ व्हिडिओ आहेत. त्यात त्यांनी शेगावचे श्री संत गजानन महाराज आणि स्वामी समर्थ या २ संतांवर टीका केलेली आहे. ‘गजानन महाराज यांना बोलता येत नव्हते, त्यांना लोकांनी बाबा बनवले, तसेच ‘स्वामी समर्थ हे खोटारडे होते’, अशी मुक्ताफळे मानव यांनी उधळली आहेत. असे लोक आज सरकारवरही टीका करण्यास मागेपुढे पहात नाहीत. त्यामुळे त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी.
कायद्याच्या समितीत मानव यांना घेणे अवैध आहे ! – ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर
शाम मानव यांनी ‘कुलकर्ण्यांचे १२ वर्षांचा पोर (संत ज्ञानेश्वर महाराज) भिंत काय चालवणार ? रेड्यामुखी वेद कसे बोलवणार ? हे थोतांड आहे’, ‘कुणब्याचा तुकाराम (संत तुकाराम महाराज) सदेह वैकुंठाला गेला नाही, तर त्याचा खून झाला !’ अशी समस्त वारकर्यांची भावना दुखावणारी जातीयवादी विधाने केली. मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम १९५०च्या कलम ५६ अन्वये फौजदारी गुन्हा सिद्ध झालेल्या व्यक्तीला कोणत्याही सार्वजनिक समिती वा न्यासावर सदस्य म्हणून रहाता येत नाही. तसे असल्यास ते पद आपोआप रहित होते. त्यामुळे कायद्याच्या समितीत मानव यांना घेणे अवैध आहे.
‘समस्त वारकरी संप्रदाय पत्रकार परिषदे’तील काही क्षणचित्रे !
१. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ येत्या ४८ घंट्यांमध्ये विसर्जित करावी, अशी मागणी ह.भ.प. महेंद्र महाराज म्हस्के यांनी केली.
२. ‘समिती विसर्जित केली नाही, तर आम्ही गावोगावी, तालुके आणि जिल्हे येथे जागृती करून मोठे आंदोलन करू’, अशी चेतावणी ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी दिली.
३. समितीतील काही लोकांचे नक्षलवाद्यांशी संपर्क आहेत. याचे पुरावे ‘प्रजापुरी अक्कलकोट’चे संस्थापक श्री. प्रसाद पंडित यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवले.
४. पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मान्यवरांनी सडेतोड उत्तरे दिली.
संपादकीय भूमिकावास्तविक अशी मागणी करण्याची वेळ वारकर्यांवर येऊ नये. सरकारने स्वत!हून ही कृती करणे अपेक्षित आहे ! |