प्रसादाच्या लाडूंमध्ये भेसळ करणार्यांवर तात्काळ गुन्हा नोंद करण्याची मागणी !
भाग्यनगर (तेलंगाणा) – आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जगभरातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र मानल्या जाणार्या श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीपासून बनवलेल्या तुपाचा वापर करण्यात आल्याची अत्यंत गंभीर घटना उघड केल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. हिंदु समाज जगभर पसरला आहे. प्रसादात प्राण्यांच्या चरबीचे तूप मिसळणे ही केवळ भेसळ नाही, तर हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेले आक्रमण आहे. ही घटना हिंदूंच्या विश्वासघाताचे प्रतीक आहे. माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे वडील सॅम्युअल राजशेखर रेड्डी हे मुख्यमंत्री असतांना श्री तिरुपती बालाजी मंदिराचे पवित्र लाडू बनवण्याचे कंत्राट एका ख्रिस्ती संस्थेला देण्यात आले होते आणि मंदिराच्या व्यवस्थापन समितीवर ख्रिस्त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मंदिर परिसरात ख्रिस्ती मिशनर्यांकडून धर्मांतराला प्रोत्साहन देण्यात आले. आता प्रसादाच्या लाडूंमध्ये चरबीयुक्त तूप मिसळून हिंदूंना भ्रष्ट करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे. हे पाप करणार्यांविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक चेतन गडी यांनी येथे केली.
सर्व संघटनांनी एकत्र येऊन हिमायत नगर येथील तिरुमला तिरुपती देवस्थानासमोर निदर्शने केली. त्यानंतर बशीरभाग सर्कलपर्यंत मोर्चा काढण्यात आला.
या आंदोलनामध्ये हिंदु जनजागृती समितीसह, सनातन संस्था, राष्ट्रीय शिवाजी सेना, हिंदु संघटना एकता मंच, हनुमान चालिसा ग्रुप, सनातन हिंदु संघ, ग्लोबल हिंदु ह्युमन राईट्स कलेक्टिव्ह, दलित हिंदु सेना, भाजप, बजरंग सेना आणि ईशा फाऊंडेशन यांच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.