Indian Flag In POK: पाकव्याक्त काश्मीरमध्ये झालेल्या पाकविरोधी निदर्शनात भारताचा राष्ट्रध्वज फडकला !

पाकिस्तानी सैन्याने केला गोळीबार !

पाकव्याप्त काश्मीर निदर्शनांमध्ये भारताचा राष्ट्रध्वज

मुझफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीर) – पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिक जनतेने पाकिस्तानच्या अत्याचारांच्या विरोधात उठाव चालू केल्यामुळे तेथे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. १० आणि ११ मे या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. या वेळी झालेल्या निदर्शनांमध्ये भारताचा राष्ट्रध्वजही फडकला. निदर्शने नियंत्रणात आणण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा दलांनी बळाचा वापर केला. या वेळी पाकिस्तानी सैन्याने लोकांवर गोळीबार केल्याचेही वृत्त आहे.

१. पाकिस्तानने लादलेल्या कर आणि वाढत्या किमती यांच्या निषेधार्थ पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांनी ११ मे या दिवशी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची योजना आखली होती; परंतु एक दिवस आधी, अतिरिक्त सैन्य बोलावण्यात आले आणि लोकांना कह्यात घेण्यास चालू करण्यात आल्यानंतर जनक्षोभ उसळला.

२. पाकिस्तानी सैन्याने पाकव्याप्त काश्मीरच्या मीरपूर जिल्ह्यात ७० हून अधिक कार्यकर्त्यांना कोणत्याही वॉरंटविना निदर्शने थांबवण्यासाठी अटक केली. यानंतर संतप्त जमाव रस्त्यावर आला. अटकेच्या निषेधार्थ, सामान्य जनतेने सुरक्षादलांवर दगडफेक केली आणि अनेक ठिकाणी चकमकी झाल्या. यानंतर परिसरात कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आले.

३. पाकिस्तानी सैन्याने लहान मुलांनाही सोडले नाही. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, जे शाळेच्या आत पडले. यामध्ये अनेक मुली घायाळ झाल्याचे वृत्त आहे.

पाकिस्तानी सैन्याने केला गोळीबार

४. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या कराराचे पालन करण्यासाठी पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्यासाठी जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी कृती समितीने १० मे या दिवशी संप पुकारला होता. यामध्ये वाहतूकदारांच्या संपाचाही समावेश होता. इस्लामाबाद सरकार करारांची पूर्तता करत नसल्याचा आरोप समितीने केला आहे.

५. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने मान्य केले आहे की, तेथे सातत्याने मानवी हक्कांचे उल्लंघन केले जात आहे.

६. गेल्या महिन्यातही लोकांनी वाढत्या महागाईच्या विरोधात निदर्शने केली होती. अनेक ठिकाणी लोकांनी रस्त्यावर उतरून पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तिथे एक किलो पीठ ८०० पाकिस्तानी रुपयांना मिळते, पूर्वी ते २३० रुपयांना मिळत होते.

संपादकीय भूमिका

पाकिस्तान काश्मीरचा प्रश्‍न जागतिक स्तरावर उपस्थित करून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करतो. आता भारतानेही पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेच्या दयनीय स्थितीचे सूत्र जागतिक स्तरावर मांडून पाकला कोंडित पकडणे आवश्यक !