स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्ध अपमानकारक टीका अस्वीकारार्ह !

श्री. हृदयनारायण दीक्षित

१. राहुल गांधी यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी चुकीचे आरोप

‘भारत अखंड सार्वभौमत्व असलेला देश आहे. आपण भारतीय लोक प्राचीन राष्ट्र आहोत. भारत हा खंडांनी मिळून बनलेला नाही; पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना भारत कदाचित् तोडकामोडका दिसत असेल; म्हणून त्यांनी ‘भारत जोडो’ पदयात्रा काढली. त्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी विचारांचे महानायक विनायक दामोदर सावरकर यांच्यावर अभद्र टीका केली. त्यांनी सावरकर यांना इंग्रजी राजवटीतील ‘निवृत्त वेतनधारक’ म्हटले. त्यांनी  आरोप केला की, सावरकर यांनी इंग्रजी सत्तेला साहाय्य केले, तसेच स्वतःच्या सुटकेसाठी त्यांनी कारागृहातून क्षमायाचना केली. राहुल यांना ठाऊक नाही की, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती’चे मंत्री पंडित बाखले यांनी सावरकरांच्या जयंतीनिमित्त तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पत्र लिहिले होते. त्यांच्या पत्राला उत्तर देतांना श्रीमती गांधी म्हणाल्या, ‘‘मला तुमचे उत्तर मिळाले. सावरकर ब्रिटीश सत्तेच्या विरुद्ध अतीसाहसिक आंदोलक होते. स्वातंत्र्य संग्रामात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. मी सावरकरांच्या जयंतीच्या उत्सवाच्या यशस्वीततेची कामना करते.’’ आश्चर्य म्हणजे राहुल गांधी यांनी त्यांची आजी इंदिरा गांधी यांच्या सावरकरांविषयीच्या भावनांनाही नाकारले आहे. निश्चितच प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेता यांना त्यांचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु भारतीय इतिहासाचे नायक आणि हिंदुत्वाचे पोषक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्ध अपमानकारक टीका स्वीकारार्ह नाही.

२. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपमानित करणे ‘सेक्युलर’ राजकारण्यांची ‘फॅशन’ !

एक-दोन घटनांवरून कोणत्याही व्यक्तीचे मूल्यांकन करणे योग्य नाही. सावरकर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तीचे मूल्यांकन करणे तर अजिबातच नाही. गांधी, सावरकर, नेहरू आणि इंदिरा गांधी या भारतीय इतिहासातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. खिलाफत आंदोलनात सहभागी झाल्याच्या आधारे गांधीजींचे मूल्यांकन होणे शक्य आहे का ? चीनशी झालेल्या पराभवावरून नेहरूंचे मूल्यांकन शक्य आहे का ? देशाला आणीबाणीमध्ये झोकून देण्यावरून इंदिरा गांधींचे मूल्यांकन होऊ शकते का ? अशा प्रकारे निकामी पत्राच्या आधारावर राष्ट्रवादी सावरकर यांचे वास्तविक मूल्यांकन शक्य आहे का ?

इतिहासकार डॉ. विक्रम संपत यांनी सावरकर यांचे वास्तविक जीवनचरित्र लिहिले आहे. डॉ. संपत यांनी सावरकर यांचे उदाहरण दिले आहे की, संपूर्ण उमललेल्या गुलाबाची व्याख्या करणे चांगले असते; मात्र त्याच्याशी संबंधित प्रत्येक बाजूच्या अभ्यासाविना ते अपूर्ण राहील. त्या गुलाबाच्या सौंदर्याच्या व्याख्येला तपासण्यासाठी त्याच्या मुळांपासून शेंड्यापर्यंत सर्व बाजूंनी विचार करावा लागेल. ताज्या आणि वाळलेल्या पानांसमवेत काट्यांचेही अवलोकन करणे आवश्यक असते. हाच नियम व्यक्तीच्या मूल्यांकनासाठीही लागू झाला पाहिजे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अनेक सुप्रसिद्ध पुस्तके लिहिली आहेत. प्रथम स्वातंत्र्य आंदोलनावर त्यांची पुस्तके अद्वितीय आहेत. त्यांचे कर्म-तप अद्वितीय आहे. त्यांनी स्वातंत्र्यासाठी ‘अभिनव भारत सोसायटी’ या नावाने भूमिगत संस्थेची स्थापना केली होती. त्यांनी हिंदू आणि हिंदुत्व यांची व्याख्या केली. त्यांना दोन जन्मठेपांची शिक्षा झाली होती. त्यांना बैलासारखे कोलूला जुंपले होते. ते स्वातंत्र्य संग्रामाचे महान नायक आहेत. त्यांना एखाद्या याचिकेच्या आधारे अपमानित करणे, ही कुटील ‘सेक्युलर’ राजकारणाची ‘फॅशन’ आहे.

३. काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर यांनी सेल्युलर कारागृहातील सावरकरांची गौरवोद्गाराची पाटी काढून टाकणे

सावरकर अद्वितीय आहेत. गांधी यांनी ‘यंग इंडिया’ (२६ मे १९२०) मध्ये सावरकर यांची सुटका करण्याविषयी लेख लिहिला होता. त्यात ते म्हणाले होते, ‘‘भारत सरकार आणि प्रांतीय सरकार यांच्यामुळे शिक्षा भोगत असलेल्या अनेकांना शाही माफीचा लाभ मिळालेला आहे; परंतु अद्यापही काही विशेष दोषी आहेत, ज्यांना सोडले नाही. यात मी सावरकर बंधूंचा समावेश करतो.’’ गांधीजींनी याच लेखात म्हटले, ‘‘त्यांनी कोणताही हिंसाचार केला नाही आणि त्यांच्याविरुद्ध कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत. माझे मत आहे की, पुरावा सादर केला नसतांनाही आधीच मोठी शिक्षा भोगत असलेल्या दोन्ही भावांची सुटका देशासाठी धोकादायक सिद्ध होणार नाही. त्यामुळे व्हॉईसराय यांना त्यांची सुटका करावीच लागेल.’’

पोर्ट ब्लेअरच्या कुप्रसिद्ध सेल्युलर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव करणारी पाटी लावली होती. वर्ष २००४ मध्ये काँग्रेसला सत्ता मिळाल्यानंतर तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मणीशंकर अय्यर यांनी ती पाटी काढून फेकली. भाजप आणि तत्कालीन शिवसेना यांनी ती परत लावण्याची मागणी केली; परंतु काँग्रेस सरकारने तसे करण्यास नकार दिला. आता राहुल गांधी हे हिंदु आणि हिंदुत्व यांचे अनुयायी सावरकर यांच्यावर टीका करत आहेत.

४. अल्पसंख्यांकांची मते मिळवण्यासाठी सावरकरांवर टीका करणे, ही काँग्रेसची आवश्यकता !

वीर सावरकर यांचे नाव आणि काम यांच्याविषयी काँग्रेसला एवढी चीड का आहे ? संभवत: राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्या मनात सावरकर यांचा अपमान केल्याने अन्य पंथियांची मते मिळण्याची शक्यता दिसून येते. काँग्रेसने संघ आणि भाजप यांच्या विचारसरणीच्या आधारावर संघर्ष करायला पाहिजे. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामातील सैनिकांना तथ्यहीन आरोपांमध्ये ओढू नये. आणीबाणीच्या काळात (वर्ष १९७५ ते १९७७) ‘मिसा’च्या कैद्यांनाही याचिका करण्याची व्यवस्था होती. आपल्या सुटकेसाठी कायदेशीर मार्ग अवलंबणे क्षमा मागण्याच्या श्रेणीत येत नाही. काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा इतिहासाविषयीचा अभ्यास कच्चा आहे. ते राष्ट्रवादी क्रांतीकारक, नायक आणि महानायक यांच्याविषयी चांगले मत ठेवत नाहीत. ते जोडण्याच्या गोष्टी करतात; पण तोडण्याचे काम करतात.’

– श्री. हृदयनारायण दीक्षित, लेखक तथा उत्तरप्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष