भक्तीसत्संगातील श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चैतन्यमय वाणीमुळे साधकाने अनुभवलेली भावस्थिती !

‘मी लहानपणापासून अनेक प्रवचने ऐकली आहेत. प्रवचन आणि कीर्तन करणारे लोक पुराणांतील तात्त्विक भाग सांगतात; म्हणून ते मला अंतर्मनापर्यंत कधीच अनुभवता आले नाही. भक्तीसत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ मार्गदर्शन करत असतांना ‘त्यांच्या चैतन्यमय वाणीतून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द माझ्यासाठीच आहे’, असे वाटून मला कृतज्ञता वाटते.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या आदिशक्तीस्वरूपच आहेत. त्या भक्तीसत्संगात ‘भक्तांवर गुरूंची कृपा कशी झाली ?’, याविषयी पुराणातील कथा सांगत असतांना ‘मला आताही तशी अनुभूती येत आहे’, असे लक्षात येते.

श्री. विठ्ठल कदम

२. ‘दासबोध जयंती’च्या निमित्ताने झालेल्या विशेष भक्तीसत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ‘कल्याण करी रामराया ।’ हे शब्द उच्चारत असतांना ‘आकाशवाणी होत आहे’, असे वाटणे

‘दासबोध जयंती’च्या निमित्ताने विशेष भक्तीसत्संग झाला. त्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘संपूर्ण राष्ट्रात अराजकता माजली असतांना समर्थ रामदासस्वामी यांनी रामरायाकडे ‘कल्याण करी रामराया’ अशी आर्ततेने प्रार्थना केली होती.’’ भक्तीसत्संगाच्या शेवटच्या सत्रात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ रामरायाला प्रार्थना करत होत्या. तेव्हा त्यांनी ‘कल्याण करी रामराया ।’ हे शब्द उच्चारल्यावर ‘आकाशवाणी होत आहे’, असे वाटून माझी भावजागृती झाली.

३. ‘महाशिवरात्री’च्या निमित्ताने झालेल्या विशेष भक्तीसत्संगात ‘मानस सरोवर आणि कैलास पर्वतावरील दृश्य’ याविषयी सूक्ष्मातून अनुभवण्यास सांगितल्यावर ‘मी कैलास पर्वतावरच आहे आणि शिवाला आळवत आहे’, असे मला जाणवले.

परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे मला ही भावस्थिती अनुभवता आली, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. विठ्ठल रामचंद्र कदम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.२.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक