हिंदूंनो, शस्त्रे आणि शमी यांच्या पूजनामागील धार्मिक पार्श्वभूमी जाणा !

प्रतिकात्मक छायाचित्र

१२ वर्षांचा वनवास संपल्यानंतर पांडवांना १ वर्ष अज्ञातवासात काढायचे होते. त्यांनी आपली शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत लपवली आणि वस्त्रे पालटून ते विराट राजाच्या दरबारी विविध रूपे घेऊन राहू लागले. अर्जुन ‘बृहन्नडा’ (नर्तकी) बनून नृत्यागारात राहू लागला. या कालावधीत अनेक संकटांचे त्यांनी कौशल्याने निवारण केले.

वर्ष संपतांना विराट राजावर परचक्र आले. राजा वृद्ध, तर राजपुत्र बिनकामाचा, अशा परिस्थितीत अज्ञातवासाची मुदत संपताच आश्विन शुक्ल दशमी या दिवशी शमी वृक्षाच्या ढोलीतील शस्त्रे बाहेर काढून आणि त्यांची पूजा करून पांडव युद्धभूमीवर आले. त्यांनी विराट राजाला या दिवशी जय मिळवून दिला; म्हणून दसर्‍याच्या दिवशी आपण शस्त्रपूजा आणि शमीपूजा करण्याची प्रथा पाळतो.

– श्री. चिंतामणी देशपांडे (गुरुजी) (संदर्भ : मासिक ‘शिवमार्ग’, दसरा २०१६)