त्याग आणि चैतन्य यांचे प्रतीक असलेला दत्ताच्या त्रिमुखी मूर्तीच्या हातातील कमंडलू !

१. अर्थ

‘ईश्वराच्या निर्गुण लहरींना सामावून घेणारे, तसेच वाईट शक्तींच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी संपूर्ण त्रैलोक्याला एकाच वेळी एका क्षणात मंडल काढण्याची क्षमता असलेले जल ज्या कुंडात सामावलेले आहे, ते कुंड म्हणजे दत्ताच्या हातातील कमंडलू.’

– एक विद्वान (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या ‘एक विद्वान’ या टोपण नावाने भाष्य करतात, ८.५.२००५)

२. वैशिष्ट्य

‘दत्ताच्या हातातील कमंडलूतील जल हे सर्वांत पवित्र असते.’ – कु. मधुरा भोसले (११.५.२००५)

३. कशाचे प्रतीक ?

कमंडलू आणि दंड या वस्तू संन्याशाच्या समवेत असतात. संन्यासी विरक्त असतो. कमंडलू हा एकप्रकारे त्यागाचे प्रतीक आहे; कारण कमंडलू हेच त्याचे ऐहिक धन होय. ‘दत्ताच्या हातात असलेला कमंडलू हा निर्गुणरूपी सुप्त मारक चैतन्याचे प्रतीक आहे.

४. दिशेनुसार कमंडलूचे कार्य

कमंडलू ज्या ज्या दिशेकडे कलतो, त्या त्या दिशेकडील वाईट शक्तींचा नाश : दत्ताच्या हातातील कमंडलू हा आवश्यकतेनुसार वाईट शक्तींच्या निर्दालनासाठी कलत्या अवस्थेत दाही दिशांना भ्रमण करून त्या त्या ठिकाणी निर्गुणरूपी मारक चैतन्याचा प्रवाही स्रोत प्रक्षेपित करतो. विनाशकालात कमंडलू पूर्णतः पाताळाच्या दिशेने उलटा होऊन पाताळांतील सर्व प्रकारच्या वाईट शक्तींचा संहार करून शिवाच्या लयशक्तीला साहाय्य करतो. कमंडलूची आकाशाच्या दिशेने असलेली स्थिर स्थिती ही ब्रह्मांडाची संतुलन अवस्था दर्शवते.’

– एक विद्वान (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या ‘एक विद्वान’ या टोपण नावाने भाष्य करतात, ८.५.२००५)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) :
काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषि मुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.