केरळच्या कन्नूर विश्‍वविद्यालयामध्ये पू. गोळवलकरगुरुजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुस्तकांतील भाग शिकवला जाणार नाही !

माकप सरकारच्या दबावाचा परिणाम !

माकप सरकारचा हिंदुद्वेष ! केवळ द्वेष भावनेतून राष्ट्रपुरुषांच्या विचारांना नाकारणारे कधीतरी सर्वसमावेशक होऊ शकतात का ? – संपादक

स्वातंत्र्यवीर सावरकर व पू. गोळवलकरगुरुजी

कन्नूर (केरळ) – पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना तिसर्‍या सत्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक पू. गोळवलकरगुरुजी आणि हिंदु महासभेचे नेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुस्तकांतील भाग शिकवला जाणार नाही, अशी माहिती कन्नूर विश्‍वविद्यालयाचे कुलपती गोपीनाथ रवींद्रन् यांनी दिली. तिसर्‍या सत्राच्या अभ्यासक्रमामध्ये पू. गोळवलकरगुरुजी यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘हिंदुत्व : हू इज अ हिंदू ?’, या पुस्तकांतील काही भाग अंतर्भूत करण्यात आला होता.

१. कुलपती रवींद्रन् यांनी सांगितले की, अभ्यासक्रमामध्ये पालट करून तो विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या २ सदस्यीय विशेष समितीने विश्‍वविद्यालयातील अभ्यासक्रम पालटण्याची सूचना केली होती. आता हा पालट करून अभ्यासक्रम विवरण समितीकडे तो पाठवण्यात येईल.

२. काही विद्यार्थी संघटनांनी नवीन अभ्यासक्रमाला विरोध केला होता. हा भगवेकरणाचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला होता. (या विद्यार्थी संघटना साम्यवाद्यांच्या आहेत, हे वेगळे सांगायला नको ! – संपादक) यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनीही याविषयी मत मांडतांना ‘ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून दूर रहाण्याचा प्रयत्न केला, अशा नेत्यांचा आणि त्यांच्या विचारांचा उदो उदो होणार नाही’, असे म्हटले होते. (स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांचे संपूर्ण जीवन राष्ट्रकार्यासाठी समर्पित केले, तर पू. गोळवलकरगुरुजी यांनीही राष्ट्रोत्थानाचे कार्य केले. असे असतांना अशी विधाने करणार्‍यांनी ‘स्वातंत्र्य चळवळीत साम्यवाद्यांनी काय योगदान दिले ?’, याचे उत्तर द्यावे ! – संपादक) त्यामुळेच हा पालट करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

३. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी साम्यवादी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. ते म्हणाले, ‘‘एका राजकीय पक्षाच्या राजकारणासाठी बौद्धिक स्वातंत्र्याचा बळी चढवला जाऊ नये. मी माझ्या पुस्तकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पू. गोळवलकर यांच्या विषयीची माहिती अन् त्यांचे खंडणही केले आहे.’’ काही दिवसांपूर्वी थरूर यांनी फेसबूक पोस्ट करून म्हटले होते की, आपण सावरकर आणि गोळवलकर यांचे विचार जाणूनच घेतले नाही, तर त्यांचे खंडण कसे करणार ? (थरूर यांच्यासारख्या हिंदुद्वेष्ट्यांचा प्रतिवाद करण्यासाठी हिंदु धर्मप्रेमींमध्ये वैचारिक सुस्पष्टता निर्माण होण्याची आवश्यकता आहे. हिंदु धर्माच्या जाज्वल्य विचारांनीच थरूर आणि त्यांच्या निधर्मी चमूकडून प्रसृत वैचारिक आतंकवादावर मात करणे शक्य आहे, हे जाणा ! – संपादक)