ध्यानमंदिरात पू. संदीप आळशी यांना नामजप करतांना पाहून ‘आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी नामजपादी उपाय किती गांभीर्याने करायला हवेत’, याची जाणीव होणे 

पू. संदीप आळशी

१. नामजपादी उपाय करतांना साधिकेला पुष्कळ अस्वस्थ वाटणे आणि पू. संदीप आळशी यांच्याकडे पाहून भावपूर्ण नामजप करू लागल्यावर त्रासदायक शक्ती शरिराबाहेर पडून मन शांत होणे 

‘१८.९.२०२३ या दिवशी रात्री ८ वाजता मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपादी उपायांना बसले होते. त्या वेळी मला पुष्कळ अस्वस्थ वाटत होते. ध्यानमंदिरात माझ्या समोरच्या आसंदीवर सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी हेही नामजपासाठी बसले होते. त्यांच्याकडे बघून मी भावपूर्ण रितीने नामजपादी उपाय करू लागले. तेव्हा मला पुष्कळ जांभया येऊन त्याद्वारे माझ्यातील त्रासदायक शक्ती बाहेर पडू लागली. नंतर १० मिनिटांनी माझी अस्वस्थता नाहीशी झाली आणि मला शांत अन् हलके वाटू लागले.

२. नामजपादी उपाय गांभीर्याने करणार्‍या पू. संदीपदादांकडे पाहून ‘आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी स्वतःही किती कठोर प्रयत्न करायला हवेत’, याची जाणीव होणे  

पू. संदीपदादांना ध्यानमंदिरात नामजप करतांना पाहून आणि त्यांचे गांभीर्य बघून ‘नामजपादी उपाय किती गांभीर्याने करायला हवेत’, हे मला शिकायला मिळाले. इतर वेळी मी नामजप गांभीर्याने करत नाही आणि त्यामुळे मला आध्यात्मिक त्रासांतून लवकर बाहेर पडता येत नाही. पू. संदीपदादा संत असूनही एवढ्या गांभीर्याने आणि तळमळीने नामजपादी उपाय करतात, तर ‘आम्ही साधकांनी किती कठोर प्रयत्न करायला हवेत’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली. ‘असे केल्यानेच आध्यात्मिक त्रास लवकर न्यून होणार आहे’, हेही माझ्या लक्षात आले.

सौ. स्‍वाती शिंदे

३. पू. संदीपदादांच्या दर्शनाने मन शांत होणे  

पू. संदीपदादा नेहमीच अत्यंत नम्रपणे, शांतपणे आणि हळूवारपणाने बोलतात. ते सर्व साधकांकडे अत्यंत प्रेमाने पाहून हसतात आणि बोलतात. त्यांचे दर्शन झाले की, मनाला छान वाटते आणि मन शांत होते.

कृतज्ञता : प.पू. गुरुमाऊली, आपल्या अपार कृपेमुळे मी पू. संदीपदादांविषयी लिहू शकले. यासाठी आपल्या आणि पू. संदीपदादांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. स्वाती शिंदे (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.९.२०२३)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे
निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.