‘स्कूल ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’चे प्राध्यापक डॉ. संजय सक्सेना अन् ‘काशी विश्व हिंदु विद्यापिठा’च्या प्राध्यापिका डॉ. पौर्णिमा सक्सेना यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ‘स्कूल ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’चे प्राध्यापक डॉ. संजय सक्सेना आणि ‘काशी विश्व हिंदु विद्यापिठा’च्या मानसशास्त्र शाखेच्या प्राध्यापिका डॉ. पौर्णिमा सक्सेना यांनी वाराणसी येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांना आश्रमातील राष्ट्र आणि धर्म यांविषयी चाललेल्या कार्याची माहिती देण्यात आली. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. सद्गुरु सिंगबाळ यांनी उभयता दांपत्यांना ‘मानवजन्माचा खरा उद्देश आणि अध्यात्माची मूलभूत तत्त्वे’ यांविषयी मार्गदर्शन केले. ‘आश्रमामध्ये पुष्कळ सकारात्मक आणि दैवी ऊर्जा आहे. तसेच येथे रहाणारे साधक धन्य आहेत’, असे उद्गार सक्सेना दांपत्याने या वेळी काढले.

सक्सेना दांपत्याच्या भेटीच्या वेळी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. ‘वाराणसी आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच अद्भुत शांतता आणि मानसिक समाधान अनुभवले’, असे सक्सेना दांपत्याने सांगितले.

२. आश्रम बघतांना त्यांनी आश्रमात प्रतिदिन करण्यात येत असलेल्या ‘अग्निहोत्र पात्रा’मधील विभूती लावली.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेली सनातनची ग्रंथसंपदा पाहून डॉ. सक्सेना म्हणाले, ‘‘जीवनाचे असे कोणतेही क्षेत्र शिल्लक नाही, ज्याला गुरुदेवजींनी स्पर्श केला नाही.’’

४. अध्यात्मावर केलेल्या संशोधन कार्याची माहिती घेतल्यानंतर त्यांना श्रीगुरूंच्या कार्याविषयी अतिशय कृतज्ञता वाटली.

५. डॉ. पौर्णिमा सक्सेना यांनी आतापर्यंत अध्यात्म आणि मानसशास्त्र यांसंदर्भातील विविध विषयांवर अतिशय उच्च दर्जाचे संशोधन कार्य केले आहे. त्यांच्या मते ‘या जगात अध्यात्माहून श्रेष्ठ काहीही नाही. प्रत्येक प्रकारचा उपाय केवळ अध्यात्मात आहे.’

डॉ. सक्सेना संजय हे विज्ञानाचे प्राध्यापक असूनही त्यांना अध्यात्मात विशेष रूची आहे. त्यांनी ‘पुनर्जन्म’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. ते म्हणाले, ‘‘या जन्मात चुका करून पुढचा जन्म कशाला घ्यायचा ? याच जन्मात पुनर्जन्म घेऊन आपले जीवन आदर्श का बनवू नये ?’’