श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या छायाचित्रांद्वारे त्यांचा उलगडलेला साधनाप्रवास !

 ‘या लेखामध्ये श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वर्ष २००८ ते वर्ष २०२२ या कालावधीतील छायाचित्रे दिली आहेत. (छायाचित्रे ओळीने पहावीत) यांवरून त्यांच्या साधनाप्रवासात त्यांच्यामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या कसे पालट झाले आहेत ? याचा अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला आहे.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. भाव, अंतर्मनातील साधना, साधनेसाठीची तळमळ, अहं, वाईट शक्तींचा त्रास आणि त्रिगुण हे साधनेतील घटक

व्यक्तीमध्ये भाव, अंतर्मनातील साधना, साधनेसाठीची तळमळ आणि अहं या साधनेतील घटकांवरून तिच्या चालू असलेल्या साधनेची परीक्षा होते. साधना न करणार्‍या सर्वसामान्य व्यक्तीमध्ये भाव, अंतर्मनातील साधना आणि साधनेसाठीची तळमळ हे घटक ० टक्के असतात, म्हणजे नसतातच, तसेच अहं अधिक, म्हणजे ३० टक्के असतो. सध्या कलियुगात साधना करणार्‍या व्यक्तीमधील भाव, अंतर्मनातील साधना आणि साधनेसाठीची तळमळ या घटकांचे प्रमाण अधिकाधिक ३० टक्के असू शकते. यावरून सामान्य व्यक्तीने साधना करून हे तीन घटक ३० टक्क्यांपर्यंत वाढवणे आणि अहं ३० टक्क्यांवरून अल्प करत जाणे, हे साध्य करायचे असते. एखाद्या व्यक्तीला वाईट शक्तींचा जो त्रास असतो, तो प्रारब्धानुसार असतो. वाईट शक्तींचा त्रास अधिक असेल, तर आपली साधना तो त्रास दूर करण्यासाठी व्यय (खर्च) होते. व्यक्तीने साधना केल्यास तिच्यातील त्रिगुणांपैकी सत्त्वगुण वाढत जातो आणि रज, तसेच तम हे गुण अल्प होत जातात.

२. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वर्ष २००८ ते वर्ष २०२२ या कालावधीतील छायाचित्रांवरून त्यांच्यामधील साधनेतील घटकांमध्ये जाणवलेले पालट

३. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामधील साधनेतील घटकांमध्ये झालेल्या पालटांचे विश्लेषण

३ अ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची ६० टक्क्यांहून अल्प आध्यात्मिक पातळी असणे (वर्ष २००८ चे छायाचित्र)

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची ६० टक्क्यांहून अल्प आध्यात्मिक पातळी असतांनाही त्यांच्यामध्ये भाव, अंतर्मनातील साधना आणि साधनेची तळमळ हे घटक चांगल्या प्रमाणात होते, हे वर दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

‘अंतर्मनातील साधना’ हा घटक व्यक्तीचे ईश्वराशी अनुसंधान किती आहे, हे दर्शवतो, तर ‘साधनेची तळमळ’, हा घटक गुरुकार्य करण्याची, म्हणजे समष्टी साधनेची ओढ किती आहे, हे दर्शवतो.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी वर्ष २००० मध्ये साधनेला आरंभ केला. त्यांना वाईट शक्तींचा तीव्र त्रास होता. वर्ष २००८ पर्यंतच्या साधनेच्या ८ वर्षांमध्ये त्यांची साधना भाव, अंतर्मनातील साधना आणि साधनेची तळमळ या घटकांमुळे चांगल्या प्रकारे चालू होती; पण ती त्यांना असलेला वाईट शक्तींचा त्रास अल्प करण्यामध्ये व्यय (खर्च) झाली. वर्ष २००८ मध्ये त्यांच्यामध्ये अहं आणि रज-तम गुण यांचे प्रमाण अधिक होते.

३ आ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘६१ टक्के आध्यात्मिक पातळी’ गाठणे (वर्ष २०११ चे छायाचित्र)

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी जेव्हा वर्ष २०११ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, तेव्हा त्यांच्यामधील भाव, अंतर्मनातील साधना आणि साधनेची तळमळ या घटकांमध्ये वृद्धी झाली, तसेच त्यांच्यामधील अहं आणि वाईट शक्तींचा त्रास यांचे प्रमाण अल्प झाले. त्या वेळी त्यांच्यातील सत्त्वगुण वाढला; पण तरीही तो रज-तम गुणांच्या एकूण प्रमाणापेक्षा अल्प होता. या टप्प्यापर्यंत श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ या अधिकतर सनातनच्या ग्रंथांसाठी ईश्वरी ज्ञान मिळवण्याची सेवा करायच्या.

३ इ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘संतपद’ गाठणे (वर्ष २०१३ चे छायाचित्र)

वर्ष २०१२ पासून श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची समष्टी साधना आरंभ झाली. त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये फिरून मठ, मंदिरे, तीर्थक्षेत्रे इत्यादी ठिकाणचा हिंदु संस्कृतीचा ठेवा अभ्यासणे, तो जतन करणे, त्याचे चित्रीकरण करणे, तेथील मान्यवरांच्या मुलाखती घेणे, या सेवा आरंभ केल्या, तसेच तेव्हा त्यांची सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याची सेवाही चालू होती. समष्टी सेवेमुळे त्यांच्यातील ‘मान्यवर आणि संत यांच्याशी जवळीक करणे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य लोकांपर्यंत पोचवणे, त्या कार्यामध्ये लोकांचे साहाय्य मिळवणे, अध्यात्मप्रसार करणे’, या गुणांना वाव मिळाला. त्यामुळे त्यांची २ वर्षांतच जलद आध्यात्मिक उन्नती होऊन त्या वर्ष २०१३ मध्ये ‘संतपदी’ विराजमान झाल्या. तेव्हा त्यांच्यातील ‘साधनेची तळमळ’ या घटकामध्ये एकदम १५ टक्क्यांनी वृद्धी होऊन ती आधीच्या २५ टक्क्यांवरून ४० टक्के झाली. हे त्यांना समष्टी साधनेमुळे साध्य झाले, तसेच त्यांच्यामधील अहं आणि वाईट शक्तींचा त्रास यांचे प्रमाण आणखी अल्प झाले. या टप्प्याला त्यांच्यातील सत्त्वगुण रज-तम गुणांच्या एकूण संख्येपेक्षा वरचढ झाला, म्हणजेच त्या सत्त्वगुणी झाल्या.

३ ई. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘सद्गुरुपद’ गाठणे (वर्ष २०१६ चे छायाचित्र)

वर्ष २०१४ पासून श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ हिंदु संस्कृतीचा ठेवा जतन करण्यासाठी भारतभर फिरू लागल्या. त्यामुळे त्यांचे समष्टी कार्य आणखी वाढले. त्या आणखी व्यापक झाल्या. त्यांनी केलेल्या अपार कष्टामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी नाडीपट्टीद्वारे सप्तर्षी यांचे मार्गदर्शन मिळू लागले. या साधनेमुळे त्यांनी वर्ष २०१६ मध्ये ‘सद्गुरुपद’ प्राप्त केले. या टप्प्याला त्यांच्यातील अहं अगदी नगण्य झाला, तसेच त्यांना असलेला वाईट शक्तींचा त्रास पूर्णपणे दूर झाला. या टप्प्याचे त्यांचे छायाचित्र पाहिल्यावर हे सर्वांच्याच लक्षात येईल.

सद्गुरुपदी विराजमान झाल्यावर पुढे निर्गुणातील कार्याचा स्तर आरंभ होत असल्याने त्रिगुणांचे कार्य संपते. त्यामुळे या टप्प्याला आणि पुढे त्रिगुणांची संख्या काढता येत नाही अन् त्यामुळे ते सारणीमध्ये दिलेले नाहीत.

३ उ. सप्तर्षींनी ‘श्रीचित्‌शक्ति’ म्हणून घोषित करणे (वर्ष २०२२ चे छायाचित्र)

वर्ष २०१५ पासून श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा सप्तर्षी सांगतील, त्याप्रमाणे भारतभर, तसेच विदेशातही दैवी दौरा आरंभ झाला. सप्तर्षी सांगतील त्याप्रमाणे खडतर प्रवास करून हिंदु राष्ट्राची स्थापना, साधकांचे रक्षण इत्यादींसाठी देवतांचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद मिळवणे आणि सप्तर्षींचे आज्ञापालन करणे, हे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे कार्य झाले. वर्ष २०२० मध्ये सप्तर्षींनी त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘एक आध्यात्मिक उत्तराधिकारी’, तसेच ‘श्रीचित्‌शक्ति’ म्हणून संबोधले. त्यांच्या या टप्प्याला त्यांच्यामधील भाव, अंतर्मनातील साधना आणि साधनेसाठीची तळमळ या घटकांनी अत्युच्च पातळी गाठल्याचे सारणीतून लक्षात येते. हेच ते त्यांच्यातील देवत्व ! सप्तर्षी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यातील श्री महालक्ष्मीदेवीच्या अंशाचा नेहमी उल्लेख करतात, तसेच त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचे नेहमी कौतुक करतात.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या येथे दिलेल्या छायाचित्रांकडे ओळीने पहात गेल्यास आपल्याला त्यांच्या साधनेमध्ये झालेली वाढ आणि त्यांच्यामध्ये आलेले अवतारत्व सहजतेने लक्षात येते. अवतारत्व व्यक्त झालेल्या, तसेच विकसित झालेल्या त्यांच्या शेवटच्या छायाचित्राकडे आपण आकर्षित होतो आणि खिळले जातो. हेच ते देवत्वाचे लक्षण !

४. कृतज्ञता

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या छायाचित्रांचा अभ्यास करण्याची स्फूर्ती मला गुरुकृपेनेच झाली. यासाठी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या सनातन संस्थेच्या तिन्ही गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (९.१२.२०२३)

एकाच वेळी अनेक सेवा  परिपूर्ण  करणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ‘एका वेळी अनेक सेवा कशा करू शकतो ?’, याचा विचार आणि त्याप्रमाणे कृती करतात. त्या गोव्यातील मंदिरांमध्ये सूक्ष्म परीक्षणासाठी जात असत. तेव्हा त्यांच्या भ्रमणसंगणकाच्या समवेत त्या सनातनची सात्त्विक उत्पादनेही नेत असत. मंदिराबाहेर एक सतरंजी अंथरून त्यावर उत्पादनांचा वितरण कक्ष लावत आणि त्याच वेळी भ्रमणसंगणकावर सूक्ष्म परीक्षणही करत असत.

त्या जेव्हा स्वयंपाकघरात सेवा करत होत्या, तेव्हा सेवेला प्रारंभ करण्या पूर्वी  देवाला पुढील  प्रार्थना  करत असत, ‘हे श्रीकृष्णा, माझ्याकडून अष्टावधानी सेवा करून घे.’ या प्रार्थनेप्रमाणे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ मोजक्या साधकसंख्येत अनेक सेवा परिपूर्ण  करत असत.’ – एक साधक (२६.६.२०१९)