मुंबई, २७ मार्च (वार्ता.) – मंत्रालय सुरक्षा प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली. दुसर्या टप्प्यात प्रवेशासाठी व्हिजीटर मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी, अभ्यागत यांना कोणत्याही कामासाठी प्रवेश हवा असल्यास त्यांना ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन अॅप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश मिळेल. सर्व अभ्यागतांना दुपारी २ नंतर मंत्रालयात प्रवेश देण्यात येईल.
१. अभ्यांगतांनी दिलेल्या वेळेत आणि अनुज्ञेय असलेल्या मंत्रालयाच्या मजल्यावरच प्रवेश करावा. अनधिकृत मजल्यावर प्रवेश केल्यास अभ्यागत कारवाईस पात्र रहातील.
२. अभ्यागतांनी त्यांचे काम पूर्ण झाल्यावर विहित वेळेत मंत्रालयातून बाहेर पडावे.
३. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग अभ्यागत यांना रांगेत उभे राहिल्याने होणारा त्रास विचारात घेता त्यांना दुपारी १२ वाजता प्रवेश देण्यात येईल. त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग असेल. त्यांनी तत्संबंधीचे वैध प्रमाणपत्रसमवेत ठेवणे आवश्यक आहे.
४. अभ्यागतांनी मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड आदी शासन मान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.