(म्हणे) ‘प्रक्षोभक भाषण करणार्‍या विक्रम पावसकर यांना अटक करा !’

पुरोगामी आणि मुसलमान संघटना यांची मागणी

विक्रम पावसकर (प्रतिकात्मक चित्र)

सातारा, १६ सप्टेंबर (वार्ता.) – पुसेसावळी येथे झालेल्या हिंसाचाराचे मुख्य सूत्रधार कराड येथील विक्रम पावसकर हे आहेत. ते नेहमीच भाषणाद्वारे प्रक्षोभक वक्तव्ये करत असतात. त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी सातारा येथील पुरोगामी आणि मुसलमान संघटना यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. याविषयीचे निवेदन १६ सप्टेंबर या दिवशी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, पुसेसावळी येथे झालेल्या हिंसाचाराविषयी सर्वसमावेशक सत्यशोधन समिती नेमून चौकशी करण्यात यावी, यासह अन्य मागण्या करण्या आल्या. (या हिंसाचारात विक्रम पावसकर यांचा हात आहे, असे जर पुरोगामी आणि मुसलमान संघटना यांनी जाहीर केले आहे, तर पुन्हा सर्वसमावेशक सत्यशोधन समिती कशासाठी नेमायची आहे ? अशी चौकशी समिती नेमून पावसकर यांच्यासमवेत आणखी ४ हिंदुत्वनिष्ठांना गोवण्याचा विचार आहे का ? असे कुणालाही वाटू शकते. – संपादक)

निवेदनातील अन्य मागण्या

या हिंसाचारात बळी पडलेल्या युवकांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपये हानीभरपाई मिळावी. झालेले पंचनामे आणि जबाब हे दबावाच्या वातावरणात झालेले असल्यामुळे फेरपंचनामे करण्यात यावेत. मागील ६ मासांत जिल्ह्यामध्ये सामाजिक माध्यमांवर प्रक्षोभक लिखाण केल्याचे निमित्त होऊन आक्रमण झालेल्या सर्व घटनांची पोलिसांनी चौकशी करावी. यामागे कोणते षड्यंत्र आहे का ? याचा शोध घ्यावा. यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन एकत्रित चौकशी करण्यात यावी. (पोलीस आणि चौकशी समिती यांच्यापेक्षाही अधिक माहिती पुरोगामी आणि मुसलमान संघटनांकडे आहे, तर त्यांनी सातारा पोलिसांना पुसेसावळी हिंसाचाराविषयी अगोदरच माहिती का नाही दिली ? – संपादक)