छत्रपती शिवरायांचे कडवी झुंज देणारे आरमार

आज १० मार्च २०२३ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. त्या निमित्ताने…

अष्टौ गुणा पुरुषं दीपयन्ति प्रज्ञा सुशीलत्वदमौ श्रुतं च ।
पराक्रमश्चाबहुभाषिता च दानं यथाशक्ति कृतज्ञता च ॥

अर्थ : बुद्धी, चांगले चरित्र, आत्म नियंत्रण, शास्त्रांचे अध्ययन, पराक्रम, मितभाषण, यथाशक्ती दान करणे आणि कृतज्ञता हे आठ गुण पुरुषाला मोठेपणा मिळवून देतात.

हा श्लोक वाचल्यानंतर असे वाटते की, सुभाषितकाराने छत्रपती शिवरायांना समोर ठेवून तो रचला असावा. छत्रपती शिवरायांच्या काळात इस्लामिक सत्ता होत्या, त्यांच्या सत्ताधीशांना आरमाराकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नव्हता. ११ व्या शतकात चोल राजा रामराज याने आरमाराकडे लक्ष दिले होते. असे आरमाराकडे लक्ष देणारा तोच अखेरचा हिंदू राजा होता.

छत्रपती शिवरायांचे समर्थ आरमार !

१. बलाढ्य शत्रूच्या विरोधात सामर्थ्याने मात करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी समर्थ आरमार उभारणे

१५ व्या शतकात संगमेश्वरचा जखुराय नावाचा एक जहागीरदार होऊन गेला. तथापि आरमाराचे महत्त्व जाणणारा चोल राजा रामराज याच्यानंतर ६०० वर्षांनी छत्रपती शिवरायांनी आरमाराची स्थापना केली. छत्रपती शिवरायांना सागरावरच्या शत्रूची चाहूल लागली. सागरावर वर्चस्व प्रस्थापित केलेल्या बलाढ्य शत्रूच्या विरोधात तेवढ्याच सामर्थ्याने उभे रहावे लागणार होते. याची छत्रपती शिवरायांना जाणीव होती.

१६ व्या शतकापासून पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आणि डच या सत्ता स्वतःच्या आरमाराच्या बळावर हिंदुस्थानवर स्वारी करून आल्या. त्यांनी कोलकाता, चेन्नई, गोवा, वेंगुर्ला, राजापूर, मुंबई, सूरत अशा विविध ठिकाणी आपल्या वसाहती निर्माण केल्या. हे सर्व पाहून त्या वेळच्या सत्ताधिशांनी आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही. आपले स्वतःचे आरमार असावे, असे त्यांना वाटले नाही. आपले समर्थ आरमार निर्माण करण्यासाठी कुणीही पुढे सरसावले नाही. याला अपवाद केवळ छत्रपती शिवरायांचा होता.

श्री. दुर्गेश परुळकर

२. हिंदवी स्वराज्याचा विस्तार आणि ते टिकवण्यासाठी आरमाराची उभारणी करणे

‘हिंदवी स्वराज्याचा विस्तार करणे’, हे छत्रपती शिवरायांचे ध्येय होते. कोकणात आपल्या राज्याचा विस्तार त्यांना करायचा होता. तिथे आपले राज्य टिकवायचे असेल, तर स्वतःचे सामर्थ्यशाली आरमार हवे. त्यासह बळकट जलदुर्ग असलेच पाहिजेत. हे छत्रपती शिवरायांनी ओळखले. आरमार उभे करायचे, तर बंदर आणि गोद्या हव्यात. वर्ष १६५६-१६५७ पासून छत्रपती शिवरायांनी आरमाराच्या उभारणीला प्रारंभ केला. त्यांनी सिंधुदुर्ग, खांदेरी यांसारखे दुर्ग उभे केले. विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग यांसारखे बळकट किल्ले कोकणच्या किनार्‍यावर उभे करून अशा बळकट दुर्गांची एक माळ निर्माण केली. यापूर्वी कोणत्याही राजाने जलदुर्ग उभारण्याचा विचारही केला नव्हता. वर्ष १६५६ मध्ये कल्याण आणि भिवंडी वर भगवा डौलाने फडकला. त्याच शुभमुहूर्तावर छत्रपती शिवरायांनी कल्याणला लढाऊ नौका बांधण्याच्या कार्याला आरंभ केला. विजयदुर्गाजवळ गड नदीच्या खाडीत जहाज बांधणी आणि त्याच्या दुरुस्तीसाठी गोद्या बांधल्या.

महानायक भंडारी, कान्होजी आंग्रे, धुळप अशी अनेक निष्ठावान मंडळी समर्थपणे आरमाराची धुरा सांभाळत होते. या विरांनी मराठ्यांच्या आरमाराचा वचक शत्रूवर बसवला होता. छत्रपती शिवरायांनी आरमाराची स्थापना केली तो दिवस २४ ऑक्टोबर १६५७ म्हणजे अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे वसुबारस शके १५७९ ! आरमार म्हणजे राज्याचे एक स्वतंत्र अंग आहे. ज्याच्याकडे अश्वबल त्याची पृथ्वी, प्रजा आणि ज्याच्याकडे समर्थ आरमार त्याचा समुद्र ! या उक्तीला अनुसरून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरावरून होणार्‍या आक्रमणाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आपल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली.

३. छत्रपती शिवरायांनी मोठ्या युद्धनौकांना नामोहरम करण्यासाठी छोट्या नौकांची निर्मिती करणे

कोकणचा किनारा हा बहुतांशी उथळ आहे. तिथल्या खाड्यांची पात्रेसुद्धा उथळ आहेत. भरतीच्या वेळी खाड्यांमध्ये पाणी काही मैलांपर्यंत भरते. ओहोटीच्या वेळी ती पात्रे उघडी पडतात. त्यामुळे या खाड्यांमधून वाहतुकीला निमुळत्या बुडाची जहाजे कुचकामी ठरतात. हे ध्यानात घेऊन छत्रपती शिवरायांनी खास सपाट बुडाच्या छोट्या होड्या बांधून घेतल्या. या होड्यांनी खांदेरीच्या युद्धात इंग्रजांच्या तोंडचे पाणी पळवले. इंग्रजांच्या बलाढ्य युद्धनौकांना नामोहरम करण्यात या छोट्या नौका यशस्वी झाल्या.

अत्यंत अल्प काळात छत्रपती शिवरायांनी स्वराज्याच्या आरमारात गुराबा, तरांडी, गलबते, महागिर्‍या खोड्या, मचवे, पगार, तिरकटी, पाल अशा विविध प्रकारच्या नौका समाविष्ट झाल्या. त्यांची एकूण संख्या ७०० पर्यंत पोचली.

४. जंजिरा आणि मुंबई यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘उंदेरी’ अन् ‘खांदेरी’ बेटांची निवड करणे

छत्रपती शिवरायांनी अत्यंत अल्प काळात स्वतःचे आरमार इंग्रजांच्या तोडीस तोड बनवले. जंजिर्‍याचे विशिष्ट भौगोलिक स्थान आणि छोट्या नौका यांमुळे शिवरायांना तो जलदुर्ग जिंकता आला नाही. तथापि सिद्दीच्या ताब्यातील सर्व गड आणि भूभाग यांवर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्यावर आपल्या स्वामित्वाची मोहोर उमटवली. जंजिर्‍याला असलेला सिद्दी, मुंबईमधील इंग्रज आणि चौलला असलेले पोर्तुगीज हे स्वराज्याचे ३ सागरी शत्रू होते. या तिघांचाही छत्रपती शिवरायांना अत्यंत वाईट अनुभव आला होता. जंजिर्‍यावर कोणतीही मात्रा लागू पडत नव्हती. सिद्दीशी असलेले शत्रूत्व संपत नव्हते. इंग्रज त्याला सर्व प्रकारचे साहाय्य करत होते. जेव्हा जेव्हा छत्रपती शिवरायांनी सिद्दीला अडचणीत आणले, तेव्हा इंग्रजांनी त्याला मुंबईतील आपल्या सुरक्षित बंदरात आश्रय दिला.

सिद्दीला आश्रय देणार्‍या इंग्रजांना मुंबईमधून घालवून देण्याचा छत्रपती शिवरायांचा हेतू होता. तथापि मुंबईच्या उत्तरेला पोर्तुगिजांची सत्ता होती. त्याच्या चारही बाजूला समुद्राचा वेढा होता. इंग्रज अडचणीत आले की, ते पोर्तुगीजांकडे आश्रय घेत असत. हा सर्व प्रकार ध्यानात घेऊन छत्रपती शिवरायांनी मुंबई बेटाजवळच्या समुद्रात दुर्ग बांधण्याचे ठरवले. या दुर्गावरून जंजिरा आणि मुंबई यांच्यातील भेटीगाठीला आळा घालता येईल अन् जागता पहारा ठेवता येईल. यादृष्टीने छत्रपती शिवरायांनी सर्वेक्षण करण्यास आरंभ केला. त्यांना मुंबई आणि चौल यांच्या सागरामध्ये २ बेटांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले. ही दोन्ही खडकाळ बेटे. मुंबईच्या दक्षिणेला १५ मैल अंतरावर, तर जंजिराच्या उत्तरेला ३० मैल अंतरावर असलेली ही दोन बेटे ! पूर्वेला असलेल्या बेटाचे नाव ‘उंदेरी’. या बेटाला इंग्रजांनी ‘हेनरी’ हे नाव दिले. पश्चिमेला असलेल्या बेटाचे नाव ‘खांदेरी’. इंग्रजांनी या बेटाला ‘केनरी’ नाव दिले. या २ बेटांमधील अंतर केवळ दीड मैलाचे आहे. मुंबई बेटाच्या दक्षिण टोकाकडून ही दोन्ही बेटे आपल्याला स्पष्ट दिसतात.

थळच्या दक्षिणेला दीड मैलाच्या अंतरावर उंदेरी बेट आहे. पूर्वी अलिबागला एकही दुर्ग नव्हता. तो नंतर बांधण्यात आला. अलिबागच्या दक्षिणेला आत शिरलेली नागावची खाडी असून तिच्यापासून ३ मैल अंतरावर अग्नेय दिशेला नागाव आहे. नागावच्या दक्षिणेला ४ मैल अंतरावर चौल शहर आहे. भरती असते तेव्हाच नागावच्या खाडीतून जलवाहतूक होऊ शकते. ही खाडी मुळातच उथळ आहे. त्यामुळे ओहोटीच्या वेळी मोठी गलबते आत येऊ शकत नाहीत. छोट्या नावा मात्र काही अंतरापर्यंत आत येऊ शकतात. खांदेरी (केनरी) बेट हे मुंबई आणि चौल या दोन ठिकाणांपासून समान अंतरावर आहे.

५. खांदेरी आणि उंदेरी या दोन बेटांमधील महत्त्वाचा भेद

खांदेरी बेट हे उंदेरी बेटापेक्षा मोठे आहे. खांदेरी बेटाच्या मध्यभागी एक टेकडी आहे. या टेकडीच्या दक्षिणेला एक उंचवटा आहे. त्याची एका बाजूची उंची ९० फूट, तर दुसर्‍या बाजूची उंची ३० फूट आहे. हे बेट मुंबईपासून जवळ आहे. त्यामुळे या खडकाळ बेटावरून मुंबईच्या बंदरात शिरणार्‍या आणि तिथून बाहेर पडणार्‍या जहाजांवर टेहळणी करता येते. (आपण तिथे स्वातंत्र्यानंतर त्या जलदुर्गाची पुनर्बांधणी केली असती, तर आपल्याला पुष्कळ लाभ झाला असता. मुंबईकडे येणार्‍या प्रत्येक गोष्टीवर आपले लक्ष राहिले असते. आतंकवादी कसाब मुंबईत उत्पात करू शकला नसता. छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या जलदुर्गांचा आजही आपल्याला देशाच्या संरक्षणासाठी लाभ करून घेता येईल. – संकलक)

उंदेरी बेटाची उंची ३० फूट आहे. या बेटावर पाणी नाही; पण खांदेरी बेटावर पाणी आहे. छत्रपती शिवरायांप्रमाणेच इंग्रजांना आणि पोर्तुगीज यांना ही दोन बेटे दिसली होती. तथापि या दोघांनी या बेटांकडे लक्ष दिले नाही. २८ नोव्हेंबर १६७० या दिवशी छत्रपती शिवरायांनी आपल्या मनातील योजनेला मूर्त रूप देण्याच्या हेतूने खांदेरी बेटाला भेट दिली. त्या वेळी त्यांच्या समवेत भूजलाचा शोध घेणार्‍या तज्ञांचे पथक होते. त्यांना तिथे पाण्याचे झरे असल्याचे आढळले; पण छत्रपती शिवरायांना पुढची ८ वर्षे तिथे काम करता आले नाही; कारण याच कालखंडामध्ये आदिलशहा आणि मोगल यांच्याशी त्यांना लढा द्यावा लागला. त्या लढाईत ते व्यस्त होते.

६. खांदेरी बेटावरील बांधकामास प्रारंभ करणे

कर्नाटकाच्या मोहिमेवरून परत आल्यावर छत्रपती शिवरायांना थोडी उसंत मिळाली. १६ ऑगस्ट १६७८ या दिवशी खांदेरी आणि उंदेरी या दोन्ही बेटांवर बांधकाम करण्याच्या दृष्टीने त्यांनी लक्ष दिले. वर्ष १६७९ मध्ये साधारणपणे ऑगस्ट मासात खांदेरी बेटावरचे झरे खोदून पाण्याच्या विहिरी बांधल्या. त्या विहिरींना गोड पाणी होते. थळचा प्रांत छत्रपती शिवरायांच्या कह्यात होता. बांधकामाच्या साहित्याची जमवाजमव थळजवळ करण्यात आली. महाराजांनी चौल भागाच्या उत्पन्नातील १ लाख रुपये या २ बेटांवरील बांधकामासाठी संमत केले. खांदेरी बेटावर तटबंदीच्या कामासाठी ४०० कामगारांची नियुक्ती केली. थळपासून खांदेरीपर्यंत बांधकाम साहित्य आणि माणसांची ये-जा करण्यासाठी नौकांची सोय केली. उंदेरी बेटावर पाण्याची सोय नव्हती. त्यामुळे तिथे बांधकाम चालू केले नाही.

थळच्या किनार्‍यावरून लांब पल्ल्याच्या तोफांचा मारा उंदेरी बेटावर सहज करता येत होता. खांदेरी बेट हे उंदेरी बेटापेक्षा अधिक उंच. खांदेरीवरून उंदेरीवर तोफांचा मारा करता येत होता. त्यामुळे खांदेरी बेट हे उंदेरी बेटाच्या तुलनेत अधिक महत्त्वाचे होते.

७. खांदेरी बेटावरील बांधकामाला इंग्रजांनी विरोध करणे

छत्रपती शिवरायांनी खांदेरी बेटावर बांधकाम केल्याची वार्ता मुंबईतील इंग्रजांपर्यंत पोचली. इंग्रज सरकारला जाग आली. इंग्रज सरकारने सूरतमधील आरमार प्रमुखाला २७ ऑगस्ट १६७९ या दिवशी पत्र पाठवून कळवले, ‘‘मुंबई बंदराच्या तोंडाशी असलेल्या आपल्या मालकीच्या हेनरी-केनरी (उंदेरी-खांदेरी) या बेटांवर शिवाजीराजा दुर्गांचे बांधकाम करत आहे. त्याला विरोध केला नाही, तर आपलीच हानी होईल. हे बेट त्याने काबीज केले, तर मुंबई बेटाचे आणि जवळपासच्या मुलखाचे दळणवळण मराठे भविष्यात बंद पाडू शकतील; म्हणून तातडीने त्या विरोधात हालचाल करणे क्रमप्राप्त आहे.’’

आपला सागरी शत्रू आपल्याला जलदुर्ग बांधणीच्या कामात अडचणी निर्माण करून अपशकून करणार, याची अटकळ छत्रपती शिवरायांनी बांधली होती. छत्रपती शिवरायांनी महानायक भंडारी यांना खांदेरीच्या रक्षणासाठी १५० लढाऊ गलबते आणि ४ तोफा देऊन आधीच पाठवले होते. इंग्रजांनी एक तुकडी कॅप्टन मिचिन याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या जलदुर्गाचे काम थांबवण्यासाठी पाठवली. मिचिन याने महानायक भंडारी यांना ताकीद दिली, ‘‘हे बेट इंग्रजांच्या मालकीचे आहे. तुम्ही तात्काळ हे बेट सोडून जा.’’ महानायक भंडारी यांनी निडरपणे उत्तर दिले, ‘‘आम्ही तुमची सूचना किंवा आज्ञा पाळणार नाही. आम्ही केवळ छत्रपती शिवरायांची आज्ञा पाळतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृती करतो. त्यामुळे तुमची आज्ञा आम्ही कदापि पाळणार नाही.’’

८. खांदेरीवरील बांधकाम रोखण्यासाठी इंग्रजांनी सैन्य पाठवणे

ब्रिटिशांनी मुंबई बेट युद्धात विजयाद्वारे मिळवलेले नव्हते, तर इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यात तह झाला होता. पोर्तुगिजांची राजकन्या आणि इंग्लंडचा राजकुमार चार्ल्स यांचा विवाह झाला. या विवाहाच्या निमित्ताने पोर्तुगीजांनी मुंबई बेट इंग्रजांना आंदण म्हणून दिले. तो दिवस होता २३ जून १६६१. (वास्तविक मुंबई बेटही पोर्तुगिजांचे नव्हते.) मुंबईचा वैधानिकदृष्ट्या ताबा वर्ष १६६४ मध्ये इंग्रजांनी घेतला.

समुद्रावर आपली सत्ता आहे, याचा इंग्रजांना प्रचंड गर्व होता. ‘आपल्या आरमाराच्या समोर मराठ्यांच्या आरमाराचा निभाव लागणार नाही’, असे इंग्रजांना वाटत होते. मराठ्यांचे संपूर्ण आरमार दल नष्ट करण्यासाठी आपल्याला आपले एकच गलबत पुरेसे आहे; अशी इंग्रजांची धारणा होती. खांदेरीवरील मराठ्यांचे बांधकाम थांबवण्याच्या हेतूने इंग्रजांनी कॅप्टन एन्साइन ह्यूजेस याला ३ शिवाडे आणि सैन्य देऊन पाठवले. त्या वेळी त्याला पुढील सूचना देण्यात आल्या.

अ. मराठ्यांच्या दळणवळणाला प्रतिबंध करावा.
आ. मराठ्यांना खांदेरी बेट सोडून जाण्यास भाग पाडावे.
इ. मराठी शस्त्राचा वार करत नाहीत, तोपर्यंत जबरदस्ती करू नये.
ई. मराठ्यांच्या सामर्थ्याविषयी अहवाल पाठवावा.

९. इंग्रजांनी खांदेरी बेटावर केलेल्या आक्रमणाला मराठ्यांनी सडेतोड प्रत्युत्तर देणे

४ सप्टेंबर १६७९ या दिवशी सकाळी ८ वाजता कॅप्टन एन्साइन ह्यूजेस खांदेरी जवळ आला. त्याला खांदेरी बेटावर सोडून जाण्याच्या सर्व जागांवर ३ फूट उंचीची भिंत उभी असलेली दिसली. मोक्याच्या जागांवर ४ – ६ तोफा सज्ज असलेल्या दिसल्या. बेटावर तटबंदीचे काम युद्धपातळीवर चालू असल्याचे आढळून आले. कॅप्टन ह्यूजेसच्या डोळ्यादेखत मराठ्यांच्या होड्या माणसे आणि सामान घेऊन खांदेरीकडे निघाल्या. त्याने त्या होड्या रोखल्या. नंतरचे २ दिवस खांदेरी बेटाकडे एकही होडी गेलेली त्याला दिसली नाही. इंग्रजांचे आरमार खांदेरी बेटाभोवती असलेल्या उघड्या समुद्रात होते. किनारपट्टीवर जाण्याची सोय नव्हती. तो भाग छत्रपती शिवरायांच्या कह्यात होता. इंग्रजांना मुंबईवरूनच रसद येत होती. पाणीसुद्धा तिथूनच आणावे लागत होते. दिवसांमागून दिवस जात होते. ११ सप्टेंबर या दिवशी दौलतखान मराठ्यांच्या आरमारासह खांदेरीच्या साहाय्यार्थ आला.

अखेरीस खांदेरीवरील बांधकाम थांबवण्यासाठी इंग्रजांनी मोठे पाऊल उचलण्याचे ठरवले. कॅप्टन मिचिन ‘रिव्हेंज’ ही युद्धनौका घेऊन १३ सप्टेंबर १६७९ या दिवशी संध्याकाळी खांदेरीच्या समुद्रात आला. ‘हंटर’ आणि ‘रिव्हेंज’ या युद्धनौका इंग्रजांच्या आरमारमधील प्रमुख युद्धनौका होत्या. त्याच दिवशी जोरदार पाऊस आणि वादळ चालू झाले. फ्रान्सिस थॉर्पे हा रसद घेऊन मुंबईहून निघाला. इंग्रजांचे सैन्य मात्र या वायूमानामुळे जेरीस आले. अनेक सैनिक रुग्णाईत झाले. १९ सप्टेंबरला इंग्रजांनी त्यांच्या शिवाडांवरून खांदेरीवर तोफा डागल्या. दोन्ही आरमाराची सागरात लढाई जुंपली. इंग्रजांना बेटावर चढायचे होते. मराठ्यांच्या तोफांचा भडिमार एवढा प्रचंड होता की, त्यांना खांदेरी बेटावर चढून जाण्याचे धैर्य झाले नाही. या धुमश्चक्रीत कॅप्टन थॉर्पे मारला गेला. इंग्रजांचे २-४ अधिकारी मारले गेले.

‘ब्रिटिशांनी कितीही आणि कशाही प्रकारे खांदेरी वरच्या बांधकामाला अपशकून करण्याचा प्रयत्न केला, तरीही तेथील बांधकाम चालू ठेवायचे’, असा दृढनिश्चय मराठ्यांनी केला. त्यामुळे खांदेरीवर रसद आणि सामान पोचवण्याचे काम अखंड चालू होते. इंग्रजांच्या चिथावणीला मराठे बधले नाहीत. जेव्हा बांधकामात मोठा अडसर निर्माण करण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला, तेव्हाच मराठ्यांनी कडवी झुंज दिली.

इंग्रजांची गलबते आणि होड्या खांदेरीच्या भोवती, तसेच नागावच्या खाडीच्या तोंडाशी होत्या. खांदेरीवरून होणारा तोफांचा मारा इंग्रजांना खांदेरीवर प्रत्यक्ष आक्रमण करू देत नव्हता. इंग्रजांची मोठी गलबते आणि होड्या नागावची खाडी उथळ असल्यामुळे अन् दलदलीचा भाग असल्यामुळे पुढे येऊ शकत नव्हत्या. त्यामुळे अंधाराचा आणि ओहोटीचा लाभ घेऊन मराठ्यांच्या छोट्या नौका सामान घेऊन इंग्रजांच्या डोळ्यात धूळ फेकून खांदेरीपर्यंत पोचत होत्या. इंग्रजांची गलबते शिडावर चालणारी होती. त्यामुळे इंग्रजांच्या गलबताच्या हालचाली वार्‍यावर अवलंबून होत्या. मराठ्यांच्या छोट्या नौका वल्ह्याने चालवल्या जात होत्या. त्यामुळे त्या स्वतंत्रपणे चालवता येत होत्या.

१०. मराठ्यांनी जोरदार आक्रमण करत इंग्रजांच्या गलबतांची पांगापांग करणे

१८ ऑक्टोबर १६७९ या दिवशी इंग्रज आणि मराठे यांच्यात मोठे आरमारी युद्ध झाले. इंग्रज नागावच्या खाडीच्या तोंडाशी पहारा देत होते. काही गलबते थळलाही उभी होती. त्याच दिवशी पहाटेच्या सुमारास मराठ्यांच्या ४०-५० गुराबा (नौकांचा एक प्रकार) मोठ्या वेगाने नागावच्या खाडीतून गोळीबार करत बाहेर आल्या. मराठ्यांची काही जहाजे चौलच्या बाजूने रात्री थळपाशी येऊन थांबली होती. एकाच वेळी इंग्रजांच्या नागाव खाडीच्या तोंडाशी असलेल्या आणि थळजवळ असलेल्या आरमारावर मराठ्यांनी जोरदार चढाई केली. अचानक झालेल्या या जोरदार आक्रमणामुळे इंग्रजांच्या गलबतांची पांगापांग झाली. इंग्रजांच्या ‘रिव्हेंज’ या महत्त्वाच्या आणि मोठ्या युद्धनौकेला बुडवण्याचा प्रयत्न मराठ्यांच्या आरमाराने केला. तथापि मराठ्यांना त्यात यश आले नाही.

११. छत्रपती शिवरायांनी मुंबईवर आक्रमण करण्याचा विचार करणे; पण प्रत्यक्षात तसे करता न येणे

मुंबई हे इंग्रजांचे मूळ. तेच नष्ट करण्याचा विचार छत्रपती शिवरायांनी केला. मुंबईवर थेट आक्रमण करण्याचे ठरवले. तशी योजनाही आखली; पण ते प्रत्यक्ष कृतीत आणता आली नाही; कारण मुंबईवर आक्रमण करण्यासाठी मराठ्यांचे आरमार जात असतांना मार्गात पोर्तुगिजांचा मुलुख लागतो. त्या मार्गातून जाण्याची अनुमती पोर्तुगिजांकडे मागण्यात आली; पण पोर्तुगीज कॅप्टन जनरलने ती अनुमती नाकारली.

१२. खांदेरीच्या या युद्धात इंग्रजांच्या आरमाराला यश येत नव्हते. ‘मराठे शरण येतील, तहासाठी संदेश पाठवतील’, या स्वप्नात इंग्रज रंगून गेले. ‘पोर्तुगीज अथवा सिद्दी इंग्रजांच्या या दोन मित्रांपैकी कुणीही एक मित्र आपल्याला साहाय्य करण्यासाठी पुढे आला की, त्याला पुढे करून आपण काढता पाय घ्यायचा’, असा विचार इंग्रज करू लागले.

१३. मराठ्यांनी पांढरे निशाण फडकावण्याच्या माध्यमातून इंग्रज आणि सिद्दी यांना नाकीनऊ आणणे

१७ नोव्हेंबर १६७९ सिद्दी गलबते घेऊन आला. त्याने खांदेरीच्या भोवती फेरी मारली आणि पहाणी केली. खांदेरीवर त्याने गोळीबारही केला. इंग्रज आणि सिद्दी दोघेही मराठ्यांच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र आले. तथापि युद्धाच्या पद्धतीवरून त्यांच्यात मतभेद झाले. ‘सिद्दीच्या सहकार्यामुळे या युद्धात जर विजय मिळाला, तर तो विजय मोगलांचा असेल’, असे सिद्दीने इंग्रजांना सांगितले. यामागचे कारण सांगताना सिद्धी म्हणाला की, तो मोगलांचा सरदार आहे. त्यामुळे या युद्धात विजय झाला, तर खांदेरी मोगलांकडे जाणार.

आपल्यावर इंग्रजांनी आक्रमण केले म्हणून शिवाजीराजे इंग्रजांवर संतापणार. ‘मराठ्यांचे आरमार प्रबळ नसल्यामुळे मराठी तहाची बोलणी करण्यासाठी इंग्रजांकडे येतील. इंग्रज मराठ्यांना कोणत्याही प्रकारची भरपाई न देता तह करण्याचा प्रयत्न करणार. असा तह झाला की, खांदेरी आपल्या ताब्यात येईल’, असे स्वप्न इंग्रज पहात होते. मराठ्यांनी तह करावा; म्हणून इंग्रज प्रतीक्षा करू लागले.

२१ नोव्हेंबर १६७९ सकाळी ६ वाजता खांदेरीवर मराठ्यांनी पांढरे निशाण लावले. ते पाहून सिद्धीला अत्यानंद झाला. सिद्दीने आपल्या २ – ४ जणांना मराठ्यांशी बोलणी करण्यासाठी खांदेरीवर पाठवले. सिद्दीची माणसे खांदेरीवर गेली आणि ‘तहाची बोलणी करण्यासाठी आलो आहोत’, असे त्यांनी सांगितले. मराठ्यांनी त्यांना शिव्या घालून पाठवून दिले. नंतर इंग्रज सभ्यपणे बोलणी करण्यासाठी पुढे सरसावले. मराठ्यांनी शरणागतीचा शब्दही उच्चारला नाही. अखेरीस न राहून इंग्रजांनी विचारले, ‘‘तुम्हाला तह करायचा नाही, तर मग खांदेरीवर पांढरे निशाण का लावले ?’’ मराठ्यांनी शांतपणे उत्तर दिले, ‘‘किनार्‍यावरच्या आमच्या माणसांना विशिष्ट संकेत देण्यासाठी हा बावटा (झेंडा) लावला आहे. खांदेरी किंवा उंदेरी यांपैकी एकही बेट कुणाच्याही कह्यात देण्याचा विचार आम्ही स्वप्नातही करू शकत नाही. तुमच्या गव्हर्नरकडून महानायक भंडारी यांच्या नावाने कुणी समझोता करण्यासाठी आला, तर आम्ही विचार करू.’’

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना पत्र लिहून कळवले, ‘‘खांदेरी बेट सोडण्याचा आमचा विचार नाही. आम्ही तटबंदीचे काम चालूच ठेवू. अखेरपर्यंत खांदेरी बेटावर इंग्रजांचे निशाण आम्ही फडकू देणार नाही.’’ स्वतःला समुद्रावरचा अनभिषिक्त सम्राट म्हणून घेणार्‍या इंग्रजांना छत्रपती शिवरायांच्या आरमाराने नाकी दम आणला.

१४. कॅप्टन केज्विन याने इंग्रज सरकारला कळवलेली हतबलता

इंग्रजांचा कॅप्टन केज्विन याने इंग्रज सरकारला कळवले, ‘‘मराठ्यांच्या लहान नौका आम्हाला गुंगारा देऊन खांदेरीवर सहज पोचतात. या नौका दिसायला छोट्या असल्या तरी त्यांचा वेग अफाट आहे. मराठ्यांप्रमाणे छोट्या चलाख, चपळ नौका आपल्याजवळ नाहीत. त्यामुळे मराठ्यांच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करणे, त्यांना खांदेरी बेटावरून घालवून देणे अशक्य आहे. आपल्या जवळच्या प्रचंड मोठ्या युद्धनौका आणि गलबते मराठ्यांच्या छोट्या नौकांना प्रतिबंध करण्यास असमर्थ ठरली आहेत.’’

१५. सूरतकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याविषयी इंग्रजांना कळवणे

इकडे सूरतकरांचे धाबे दणाणून गेले. त्यांना अशी वार्ता कळली की, छत्रपती शिवाजी महाराजांचे ४ सहस्र मावळे मुंबईवर चाल करून येत आहेत. त्यांनी मुंबईला पत्राने कळवले, ‘‘शिवाजीचे सैनिक बेटावर कुमक पाठवतात. तटबंदी उभारतात. तरीसुद्धा तुम्ही त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण करून त्यांना अडवू शकत नाही. म्हणून तुम्ही शिवाजी बरोबर तडजोड करावी. बेटावर आक्रमण करण्यासाठी २ गलबते दिली आहेत. तुम्ही प्रयत्न करून पहा; पण ध्यानात ठेवा की, तुम्ही अपयशी ठरला, तर शिवाजी तुमच्याशी कोणतीही बोलणी करणार नाही. तुम्ही बोलणी करायला गेला, तर तो तुम्हाला उडवून लावेल. तसे झाले, तर मुंबईचे रक्षण करण्यास तुम्ही समर्थ आहात का ? याचा आम्हाला विचार करावा लागेल.’’

या पत्राद्वारे छत्रपती शिवरायांच्या आरमाराचा इंग्रजांच्या आरमाराने केवढा धसका घेतला होता, याची प्रचीती देते.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (८.३.२०२३)