मराठी भाषिकांवर अत्याचार होऊ नये, ही ठाम भूमिका केंद्रीय गृहमंत्र्यांपुढे मांडली ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागांतील प्रश्नाविषयी केंद्रीय गृहमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत सीमा भागांतील मराठी भाषिकांवर अत्याचार होऊ नये, ही ठाम भूमिका केंद्रीय गृहमंत्र्यांपुढे मांडली, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘काँग्रेसची केंद्रात आणि राज्यात सत्ता असतांना कधीही केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमा भागाचा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ दिला नव्हता. हा प्रश्न न्यायप्रविष्ट असतांनाही केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमा भागाच्या प्रश्नासाठी स्वत:हून वेळ दिला. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील प्रत्येकी ३ प्रतिनिधी असतील. मोठा वाद असल्यास दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच केंद्रीय गृहमंत्री हस्तक्षेप करतील. आम्हाला यामध्ये राजकारण करायचे नाही, तर तोडगा काढायचा आहे.’’