राज्य सरकारकडून दहीहंडीसाठी अनुमती नाही !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – राज्य सरकारने मुंबईसह महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्यासाठी अनुमती नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातील गोविंदा पथकांचे प्रतिनिधी यांसह घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. दहीहंडी साजरी केल्याने अधिक प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, असे ‘टास्क फोर्स’ने सांगितले असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, एकदा अनुमती दिली आणि कोरोनाचा संसर्ग वाढला, तर उत्सव आणि संस्कृती यांना गालबोट लागेल. आम्ही गोविंदा पथकांवर कसे लक्ष ठेवणार ? यंत्रणांवरील ताण पहाता दहीहंडीला अनुमती देऊ शकत नाही. ‘अनुमती नसल्याने आम्ही दहीहंडीचे आयोजन करणार नाही’, असा निर्णय समन्वय समितीने घोषित केला आहे.

याविषयी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ‘दहिहंडीसाठी अनुमती न दिल्यास आंदोलन करू’, असे सांगितले.