Kolhapur Fight For Chhatrapati Shivaji Maharaj University : ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झालाच पाहिजे !

कोल्हापुरात १० सहस्रांहून अधिक हिंदूंची मोर्चाद्वारे ललकारी !

कोल्हापूर : येथील ‘शिवाजी विद्यापिठा’चा ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा नामविस्तार करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १७ मार्च या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीच्या दिवशी आयोजित या मोर्चाद्वारे १० सहस्रांहून अधिक हिंदूंनी एकमुखाने ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झालाच पाहिजे’, अशी जोरदार मागणी केली.

मोर्चाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहरातील दसरा चौकातून चालू झालेला हा मोर्चा लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर मार्गे ‘बी न्यूज’च्या कार्यालयावरून जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाप्त झाला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आल्यावर जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे या वेळी क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण तात्काळ थांबवण्यासाठी कबरीला दिला जाणारा निधी बंद करावा, तसेच औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात यावी, या मागणीचेही निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्यासाठी आयोजित ऐतिहासिक मोर्चाची छायाचित्रे !

मोर्चात विविध आध्यात्मिक संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, राजकीय पक्ष, तरुण मंडळे, विविध सामाजिक संघटना, तसेच व्यापारी संघटना यांचा प्रमुख सहभाग होता. अनेक दुकानदार २ घंट्यांसाठी दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चात सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती होती. मोर्चाच्या अंती तेलंगाणा येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट, ‘छत्रपती ग्रुप’चे संस्थापक श्री. प्रमोददादा पाटील यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी असलेल्या मावळ्यांचे वंशज यांनी मनोगत व्यक्त केले. यात प्रामुख्याने वीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद, सरदार मालुसरे यांचे वंशज श्री. कुणाल मालुसरे आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज यांनीही मनोगत व्यक्त केले.

विरोध करणार्‍या पुरोगाम्यांना हिंदूंच्या संघटितपणाची शक्ती प्रत्युत्तर देईल ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगाणा

टी. राजासिंह

छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे केवळ विद्यापीठ नसून तो आमचा स्वाभिमान आहे. इतकी वर्षे ‘छत्रपती’ ही पदवी लागू नये, यांसाठी प्रयत्न करणारे पुरोगामी आणि सेक्युलरवादी यांना जाहीर आव्हान देण्यासाठीच मी आलो आहे अन् हिंदूंच्या संघटितपणाची ही शक्ती येथे पाय रोवून उभी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर आजही अनेक अतिक्रमणे शेष असून ही अतिक्रमणे शासनाने तात्काळ हटवली पाहिजेत, अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना ती हटवण्याची मोहीम हातात घ्यावी लागेल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराला देण्यासाठी प्रशासनाकडे निधी नाही. तेच पुरातत्व खाते औरंगजेबाच्या कबरीवर मात्र लाखो रुपये खर्च करत आहे. हे आम्ही सहन करणार नाही, तरी कबरीच्या देखभालीसाठी खर्च केला जाणारा निधी तात्काळ सरकारने बंद करावा, तसेच ही कबरही काढून टाकण्यात यावी.

‘शिवाजी कोण होता ?’, या कॉ. पानसरे लिखित पुस्तकावर बंदी घाला ! – हिंदु राष्ट्र समन्वय समिती

हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. सुनील घनवट म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदराने उल्लेख करण्याऐवजी ‘शिवाजी कोण होता ?’, असे पुस्तक लिहिणारे कॉ. पानसरे कोण आहेत ? शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख हा हिंदूंच्या अस्मितेवर आघात असून या पुस्तकावर शासनाने बंदीच घालणे अपेक्षित आहे. २६/११ चे आक्रमण आतंकवादी कसाबने केले, हे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केलेले असतांना भारतीय गुप्तचर यंत्रणांवर संशय घेतला गेला. एस्.एम्. मुश्रीफ यांनी लिहिलेल्या ‘हू किल्ड करकरे ?’ या पुस्तकाचे समर्थन करणार्‍या कोल्हापुरातील पुरोगाम्यांचा चेहरा नामविस्ताराच्या निमित्ताने आता उघड होत आहे.

शिवप्रेमींच्या ‘न भूतो न भविष्यति’ मोर्चाने कोल्हापूर दणाणले !

अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत नाव न पालटल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडणार ! – सुनील घनवट, हिंदु राष्ट्र समन्वय समिती

सुनील घनवट

शिवजयंतीच्या दिवशीच ‘छत्रपती शिवाजी महाराज’ अशी उपाधी देण्याची मागणी करावी लागते, हे दुर्दैवी आहे. हा विरोध केवळ ‘छत्रपती’ या शब्दाला नसून ‘छत्रपती शिवाजी महाराजांना’च आहे. यांना नेहरूंना जर ‘पंडित’ ही उपाधी चालते, गांधीजींना ‘महात्मा’ ही उपाधी चालते, तर शिवाजी महाराज यांची ‘छत्रपती’ ही पदवी का चालत नाही ? पुरोगाम्यांना ‘छत्रपती’ म्हणण्यास लाज का वाटते ?’, फेब्रुवारी २०११ मध्ये काढलेल्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशात म्हटले आहे की, ‘राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा अवमान होता कामा नये !’ हे पुरोगामी स्वतःला शिवप्रेमी समजतात; मात्र हे ‘तथाकथित शिवप्रेमी’ आहेत. त्यांचे ‘सिलेक्टेड’ (निवडक) शिवप्रेम आहे; कारण हे लोक औरंगजेबाच्या थडग्याचे (कबरीचे) समर्थन करणारे, तसेच औरंगजेबाचे स्टेटस ठेवणारे (स्टेटस म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी सामािजक माध्यमांवरील स्वतःच्या खात्यावर प्रसारित केलेले चित्र किंवा लिखाण.) यांच्याविषयी चकार शब्द उच्चारत नाहीत.

कोणत्याही परिस्थितीत शिवाजी विद्यापिठाला ‘जे.एन्.यू.’ होऊ देणार नाही !

महाराष्ट्रात ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ‘, ‘पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर विद्यापीठ’, ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय’ अशी पूर्ण नावे दिली, तर ते चालते; मात्र ‘शिवाजी विद्यापिठाचे नाव पालटून ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करा’, असे म्हटले की, आडकाठीची भूमिका घेतली जाते. आज जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (‘जे.एन्.यू.’मध्ये) ‘भारत तेरे तुकडे होंगे’च्या घोषणा दिल्या जातात. स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली, दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी भारतीय सैनिकांची हत्या केल्यावर विद्यापिठात मिठाई वाटण्यात आली. तोच प्रकार आपल्याला कोल्हापूर येथे होऊ द्यायचा नसून कोणत्याही परिस्थितीत शिवाजी विद्यापिठाला ‘जे.एन्.यू.’ होऊ देणार नाही. कोल्हापूर हे कधीही सहन करणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नाव  विद्यापिठाला दिले पाहिजे. अन्यथा राज्यभर याविषयी आंदोलन छेडून लढा चालूच ठेवण्यात येईल.

जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे यांना निवेदन देतांना शिष्टमंडळ

विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवरायांचा खरा विचार रुजेपर्यंत लढा चालूच राहील ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

अभय वर्तक

जे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचा नेहमी एकेरी उल्लेख करतात, त्या विचारसरणीतील लोकांनाच विद्यापिठाचा नामविस्तार सहन होत नाही. या नामविस्ताराला मुख्यत्वेकरून पुरोगामी, डावे आणि हिंदुविरोधी यांचाच विरोध असून ‘लघुरूपा’ची खोटी कथानके रचली जात आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘सेक्युलर’ बनवण्याचे षड्यंत्र आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. छत्रपतींचे राज्य हे ‘हिंदवी स्वराज्य’ म्हणून ओळखले जाते, त्या छत्रपतींच्या विद्यापिठातील पुतळ्यासमोर भगवा ध्वज नसावा, हे किती दुर्दैवी आहे ! त्यामुळे आपला यापुढील लढा केवळ नामविस्तारापुरता मर्यादित नसून जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवरायांचा खरा विचार रुजत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच राहील !

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख निंदनीय ! – कुणाल मालुसरे, नरवीर तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज

नरवीर तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज कुणाल मालुसरे

विद्यापिठाचा उल्लेख ‘शिवाजी विद्यापीठ’ असा एकेरी होत आहे, ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरील निष्ठेपायी स्वत:चा देह ठेवला. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रात एकेरी उल्लेख होत आहे, ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे.

शासनाने लवकरात लवकर हे नाव पालटून ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार करावा. अन्यथा महाराजांच्या मावळ्यांचे वंशज या एकेरी उल्लेखाला विरोध करण्यासाठी सर्वप्रथम आडवे जातील, याची शासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर विद्यापिठाचा नामविस्तावर व्हावा.

हिंदुत्वाच्या कार्याला विरोध करणार्‍या मानसिकतेचा विरोध केला पाहिजे !  – रूपाराणी निकम, भाजप महिला आघाडी

भाजप महिला आघाडी रूपाराणी निकम

छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी देशासाठी बलीदान देऊनही त्यांच्या नामविस्ताराच्या मागणीसाठी हिंदूंना आंदोलन करावे लागते, ही खंत आहे. एका शाळेत छत्रपती संभाजी महाराजांचा ‘बलीदान मास’ पाळल्याविषयी मुलांना शिक्षा केली, तसेच काही ठिकाणी इमारतींतून गणेशोत्सवासारखे उत्सव साजरे करू दिले जात नाहीत. या मानसिकतेला विरोध केलाच पाहिजे. यासाठी आम्ही सदैव तुमच्यासमवेत आहोत.

आजचे युवक धर्मविरोधकांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज ! – प्रमोद पाटील, छत्रपती ग्रुप, संस्थापक

‘छत्रपती ग्रुप’चे श्री. प्रमोद पाटील म्हणाले, ‘‘व्यासपिठावर मावळ्यांचे वंशज उपस्थित आहेत. त्यांच्याकडून राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम शिकण्यासारखे आहे. आज औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण केले जात आहे. हिंदूंना जाती-जातींत विभागण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सर्व आपल्याला थांबवावे लागेल. आज युवक जागृत होत असून ते धर्मविरोधकांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी सिद्ध आहेत.’’

हिंदुत्वनिष्ठ आमदारांमुळे नामांतर हवे  – जयसिंगराव शिंदेसरकार, भाजप, किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य व्हावे, रयतेचे राज्य व्हावे, सर्वसामान्यांचे राज्य व्हावे; म्हणून हे राज्य निर्माण केले. असे असतांना शिवाजी विद्यापिठाला छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव का दिले जात नाही ? प्रतिगामी आणि पुरोगामी हे सोडून द्यावे; कारण आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अखंड हिंदु राष्ट्र व्हावे, ही भाजपची भूमिका आहे, तसेच आपल्याकडे आमदारांचे अधिक बहुमत असल्याने शिवाजी विद्यापिठाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामांतर विलंब न करता केले पाहिजे. हे नामांतर झाल्याविना आम्ही थांबणार नाही. वरील दोन्ही मंत्र्यांना मी शिवाजी विद्यापिठाचे नामांतर करण्याची माहिती देतो.

अर्थसंकल्पीय अधिवेशनातच छत्रपती शिवाजी महाराज नामांतर करावे ! – सत्यजित कदम, शिवसेना

जे संस्कृती जपण्याचे कार्य जे करतात, त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा असतो. हिंदुत्वनिष्ठ आमदारांची संख्या अधिक असल्याने आता सरकारला चेतावणी देण्याची आवश्यकता नाही. ज्या पुरोगाम्यांनी जनतेला फसवले, त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत हिंदुत्व काय असते ? हे लोकांनी दाखवून दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठ आमदार निवडून आल्याने त्यांचे दायित्व आहे की, त्यांनी शिवाजी विद्यापिठाचे नामांतर करावे. अधिवेशन चालू आहे, त्यात छत्रपती शिवाजी महाराज हे नाव झाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे.


सहभागी संघटना आणि संप्रदाय

‘श्री’ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, स्वामी समर्थ संप्रदाय, इस्कॉन, मंदिर सेवेकरी, गजानन महाराज भक्त मंडळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु एकता आंदोलन, हिंदु महासभा, ‘छत्रपती ग्रुप’, महाराष्ट्र मंदिर महासंघ, ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’, ‘अखिल भारतीय रेशनिंग महासंघ’, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, शिवसेना, भाजप, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, विविध तरुण मंडळे आणि तालमी.

मोर्चात टाळ-मृदुंगाच्या गजरात सहभागी झालेले वारकरी पथक

उपस्थित मान्यवर

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे आणि करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे श्री. आनंदराव पवळ, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील, ह.भ.प. महादेव महाराज यादव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

क्षणचित्रे 

१. मोर्चात ‘शिवशाही प्रतिष्ठान’चे श्री. सुनील सामंत यांनी धर्मवीर आंनद दिघे यांची वेशभूषा केली होती.

२. मोर्चात ठिकठिकाणी चौकाचौकांतून युवक आणि महिला सहभागी होत होत्या.

मोर्चात मोठ्या संख्येने उत्साहात सहभागी झालेल्या श्री संप्रदायाच्या साधिका

विशेष !

  • अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध झालेल्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले. मोर्चासाठी सातारा, सांगली, बेळगाव यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून भगवे ध्वज घेऊन आणि गटा-गटाने युवक उत्स्फूर्तपणे ‘जयघोष’ करत सहभागी झाले होते.
  • मोर्चासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील सरदार-मावळे यांचे वंशज उपस्थित होते.
मोर्चामध्ये सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी हाती घेतलेले विविध फलक
  • या मोर्चात अनेक पथकांचा सहभाग होता. ढोल-ताशा पथक, मर्दानी खेळ, शिवकालीन युद्धपथक, टाळ-मृदंग यांचे पथक, विविध संप्रदायांचे भक्त, मावळ्यांची वेशभूषा यांसह पारंपरिक वेशभूषा केलेली पथके, महिलांचे रणरागिणी पथक सहभागी झाले होते.
  • सहस्रोंच्या संख्येत एकवटलेला हिंदु समुदाय ही भावी हिंदु राष्ट्राची शक्तीच होय !