‘भगवा आतंकवादा’चे शस्त्र काँग्रेसवरच उलटले !

मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी काँग्रेसकडून ‘भगवा आतंकवाद’ शब्दाचा वापर

वास्तविक माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या वक्तव्याच्या मागे एका कथित अहवालाचा संदर्भ दिला होता. ते म्हणाले होते, ‘‘आम्हाला अहवाल मिळाला. त्यानुसार भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची प्रशिक्षण शिबिरे हिंदु आतंकवाद वाढवण्याचे काम पहात आहेत. समझोता एक्सप्रेसमधील स्फोट असो, मक्का-मदिना मशीद स्फोट असो किंवा मालेगाव स्फोट असो, तेथे जाऊन हिंदु आतंकवाद्यांनी स्फोट केले आणि ‘ते अल्पसंख्यांकांनी केले आहेत’, असे सांगितले. अशा प्रयत्नांपासून देशाने सावध रहायला हवे.’’ या वक्तव्याविषयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी शिंदे यांचे अभिनंदन केले होते. त्यापूर्वी गृहमंत्री असतांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम् यांनी वर्ष २०१० मध्ये प्रथम ‘भगवा आतंकवाद’ हा शब्दप्रयोग केला होता.

केंद्रीय गृहमंत्री या नात्याने २५ ऑगस्ट २०१० या दिवशी पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक यांच्या वार्षिक परिषदेला संबोधित करतांना चिदंबरम् म्हणाले होते, ‘‘मी तुम्हाला सावध करू इच्छितो की, भारतातील तरुण पुरुष आणि महिला यांना कट्टरतावादी बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये कोणतीही न्यूनता आलेली नाही. याखेरीज अलीकडेच ‘भगवा आतंकवाद’ समोर आला आहे, जो यापूर्वी झालेल्या अनेक बाँबस्फोटांमध्ये सापडला आहे.’’ (साभार : ‘आय वॉच’चे संकेतस्थळ)

१. ‘भगवा आतंकवाद’ शब्दामुळे भारतीय राजकारणाची दिशा पालटली !

‘काँग्रेसने एक कथानक (नॅरेटिव्ह) रचले होते. यामध्ये काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि त्यांचे सल्लागार यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे म्हटले जाते. जेव्हा की, हळूहळू हे कथानक उद्ध्वस्त झाले आणि त्याचा फटका काँग्रेसला सहन करावा लागला. ‘भगवा आतंकवाद’ हा शब्द काँग्रेसच्या शवपेटीतील बळकट खिळा ठरला. त्यानंतर ‘देशातील संसाधनांवर पहिला हक्क मुसलमानांचा’ आणि वादग्रस्त ‘सांप्रदायिक विधेयक’ यांसारख्या कृतींनी काँग्रेसला गर्तेत पोचवले. ‘भगवा आतंकवाद’ हा असा शब्द होता, ज्याने भारतीय राजकारणाची दिशाच पालटली. बलीदान, त्याग आणि भारतीय परंपरा यांच्याशी निगडीत भगव्या रंगाची मानहानी केल्यामुळे काँग्रेस नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर पोचली. राजकारणात या शब्दाच्या वापराचा परिणाम असा झाला की, गेली १० वर्षे काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यासाठी धडपडत आहे; परंतु भविष्यात तरी तशी शक्यता दिसत नाही.

सुशीलकुमार शिंदे

२. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उपरती !

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’च्या दुसर्‍यांदा स्थापन झालेल्या सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्री राहिलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी ‘भगवा आतंकवाद’ हा शब्द वापरायला नको होता’, असे मान्य केले आहे. ‘हा शब्द त्यांना काँग्रेस पक्षाने वापरण्यास सांगितले होते’, असेही त्यांनी मान्य केले. ते म्हणाले, ‘आतंकवाद हा भगवा, लाल किंवा पांढरा नसतो. आतंकवाद हा आतंकवाद असतो. त्या वेळी ‘रेकॉर्ड’वर जे आले होते, तेच सांगितले होते. त्यांच्या काँग्रेस पक्षाने ‘भगवा आतंकवाद’ होत असल्याचे सांगितले होते.’ त्यांनी म्हटले, ‘त्या वेळी त्यांना विचारले असता त्यांनी ‘भगवा आतंकवाद’ सांगितले.’ वास्तविक शिंदे यांच्या पूर्वीचे  गृहमंत्री आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम् यांनी ‘भगवा आतंकवाद’ हा शब्दप्रयोग केला होता.

राजकारणातून संन्यास घेतलेले सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘‘मी आतंकवाद हा शब्द वापरला; पण खरे बोलायचे, तर आतंकवाद हा शब्द का वापरला, हे मलाच कळत नाही. तो वापरायला नको होता. ‘भगवा आतंकवाद’ म्हणणे चुकीचे होते. ती त्या पक्षाची विचारसरणी असते. ती भगवी असेल, लाल असेल किंवा पांढरी असेल; असा काही आतंकवाद नसतो.’’ भारताचे गृहमंत्री असतांना सुशीलकुमार शिंदे यांनी २० जानेवारी २०१३ या दिवशी जयपूरमधील काँग्रेसच्या चिंतन शिबिरात म्हटले होते, ‘भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या शिबिरांमध्ये हिंदु आतंकवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते.’ त्यावर टीका झाली. त्यानंतर शिंदे म्हणाले होते, ‘हे सर्व वृत्तपत्रांमध्ये अनेकदा आले आहे. मी आज सांगितले ती काही नवीन गोष्ट नाही. मी केवळ भगव्या आतंकवादावरच बोललो आहे.’

३. पत्रकार प्रवीण स्वामी यांच्या अहवालात सर्वप्रथम ‘भगवा आतंकवाद’ शब्दाचा वापर

‘भगवा आतंकवाद’ या शब्दाचा सर्वप्रथम वापर काँग्रेसविषयी सहानुभूती असलेले इंग्रजी माध्यमाचे पत्रकार प्रवीण स्वामी यांनी केला. वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीचे वार्तांकन करतांना प्रवीण स्वामी यांनी ‘भगवा आतंकवाद’ या मथळ्यासह एक अहवाल केला होता. त्यात त्यांनी हिंदूंनी मुसलमानांवर अत्याचार केल्याचे दर्शवले होते. स्वामींनी अहवालात लिहिले होते, ‘२८ फेब्रुवारी २००२ या दिवशी शालेय शिक्षक नजीर खान पठाण सकाळी ९ वाजता नरोरा येथील राज्य परिवहन कार्यशाळेमागील त्यांच्या घरातून फिरायला निघाले होते.’ पठाण यांच्या म्हणण्यानुसार ‘नटराज हॉटेलसमोरील मुख्य चौकात आधीपासूनच गर्दी जमलेली होती. त्या सगळ्यांनी खाकी हाफपँट घातल्या होत्या. त्यांच्या गळ्यात भगवे दुपट्टे आणि बहुतेकांच्या हाती तलवारी होत्या.’ त्यांनी पुढे लिहिले, ‘तेथे पोलिसांच्या २ जीप आणि लाल दिवा लावलेल्या २ पांढर्‍या अँबेसेडर चारचाकी गाड्या होत्या. मी तेथून सुमारे १०० मीटर लांब होतो. तेथे उभ्या असलेल्या लोकांपैकी एक विश्व हिंदु परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया होते. काही वेळानंतर ते निघून गेले. त्यानंतर जमावाने शिवीगाळ करणार्‍या घोषणा चालू केल्या. आक्रमणकर्त्यांनी  आमच्यावर दगडफेक केली. त्याला आम्हीही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले.’ त्यांच्या अहवालात पुढे म्हटले आहे, ‘गोळीबारात ४ मुसलमान मारले गेले, ज्यामुळे शेजारच्याचे रक्षण करणार्‍यांना माघार घ्यावी लागली. स्थानिक नुरानी मशिदीला आग लावण्यात आली आणि तिच्या घुमटावर भगवा ध्वज फडकवण्यात आला. शेकडो लोकांमध्ये फातिमा बी. होती, तिने राज्य परिवहन कर्मचारी वसाहतीत लपण्याचा प्रयत्न केला हाेता.’

नरेंद्र मोदी यांना अडकवण्याचा प्रयत्न

४. गुजरात दंगलीच्या निमित्ताने काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडकवण्याचा प्रयत्न

गुजरात दंगलीवरून काँग्रेस पक्ष हा भाजप, रा.स्व. संघ आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्रमक टीका करत आला आहे. त्यांना गोवण्याचे विविध प्रयत्न झाले; पण शेवटी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली. या दंगलीत तत्कालीन गुजरात सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची कोणतीही भूमिका नसल्याचे सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केले. असे असतांनाही काँग्रेसने त्यांचा विविध प्रकारे छळ चालूच ठेवल्याचे भाजप नेत्याने सांगितले.

५. हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी सोनिया गांधी आणि त्यांचे सल्लागार यांचे प्रयत्न

काँग्रेसने मुसलमानांची मतपेढी मिळवण्यासाठी ‘भगवा आतंकवाद’ हा शब्द स्वीकारला आणि त्याचा जोरदार प्रचार केला. परिणामी काँग्रेसच्या विरोधातील रोष वाढत गेला. त्याचा पी. चिदंबरम् यांनी मोठा गाजावाजा केला. त्या वेळचे पंतप्रधान मनमोहन सिंह आणि ‘संयुक्त पुरोगामी’च्या अध्यक्षा सोनिया गांधी होत्या. ‘सोनिया गांधी याच अप्रत्यक्षपणे सत्ता चालवत होत्या’, असे त्या वेळेच्या सत्तेच्या वर्तुळामध्ये बोलले जात होते. त्या वेळी जनार्दन द्विवेदी, सी.पी. जोशी, मणीशंकर अय्यर, अहमद पटेल यांसारखे नेते काँग्रेसमधील सोनिया गांधींच्या निकटवर्तीय नेत्यांमध्ये होते. या नेत्यांशी सल्लामसलत केल्याविना सोनिया गांधी यांनी कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे म्हटले जाते. ज्या वेळी काँग्रेसने ‘भगवा आतंकवाद’ या शब्दाला राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केले, त्या वेळी आर्.के. सिंह हे केंद्रीय गृहमंत्री होते.

‘भगवा आतंकवाद’ हा शब्द बळकट करण्यासाठी या नेत्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. समझौता एक्सप्रेस स्फोट, मक्का मशीद स्फोट, मालेगाव स्फोट अशा अनेक आतंकवादी आक्रमणांमध्ये हिंदूंची नावे पुढे करण्यात आली. वर्ष २००८ मध्ये मालेगाव बाँबस्फोट झाला; पण त्यापूर्वीच काँग्रेस सरकारने देशातील बहुसंख्य जनतेला ‘खलनायक’ ठरवण्याचे काम चालू केले होते. २९ सप्टेंबर २००८ या दिवशी महाराष्ट्रातील मालेगाव येथे मोटारसायकलचा स्फोट होऊन ६ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर काँग्रेसने हिंदु आतंकवादाचा सिद्धांत पुढे ढकलणे चालू केले. या प्रकरणात हिंदु संघटनांशी संबंधित असलेल्या अनेकांना अटक करण्यात आली होती. असे अनेक साक्षीदार आणण्यात आले होते, ज्यांना बलपूर्वक जबानी द्यायला लावली.

मालेगाव स्फोटात साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह अनेक निरपराध  हिंदुत्वनिष्ठांचा छळ

६. हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी निरपराध हिंदुत्वनिष्ठांचा छळ

या प्रकरणात रा.स्व. संघ आणि विश्व हिंदु परिषद यांच्या नेत्यांना गोवण्याचा कटही रचण्यात आला होता. त्यानंतर ते काम महाराष्ट्राचे तत्कालीन आतंकवादविरोधी पथक करत होते. मालेगाव स्फोटात साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित, स्वामी असीमानंद यांच्यासह अनेक हिंदूंना आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणात कर्नल पुरोहित यांच्यावर ‘स्फोटके’ दिल्याचा आरोप असल्याचे सांगण्यात आले. साध्वी प्रज्ञा यांच्यावर स्फोटासाठी दुचाकी दिल्याचा आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी बनवण्यात आलेल्या अनेक आरोपींना समझोता एक्सप्रेस आणि मक्का मशीद बाँबस्फोट प्रकरणातही आरोपी बनवण्यात आले होते. त्यानंतर देशात ‘हिंदु आतंकवाद आहे’, असे खोटे कथानक बनवण्यात येऊ लागले. या प्रकरणांतील लोकांकडून इच्छित विधान मिळवण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड अत्याचार करण्यात आले.

कर्नल पुरोहित यांना विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आणि त्यांचा पाय मोडला. त्यांना मालेगाव प्रकरणात तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ, रा.स्व. संघ आणि विश्व हिंदु परिषद या नेत्यांची नावे सांगावीत अन् त्यांनीच हा स्फोट घडवून आणला, हे मान्य करण्यास सांगितले होते. याखेरीज साध्वी प्रज्ञा यांना एवढी मारहाण झाली की, त्यांना मणक्याचा त्रास झाला आणि त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर (कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे) भरती करावे लागले. त्यांना अश्लील चित्रफीत दाखवण्यात आली. एवढेच नाही, तर वर्ष २०१३ मध्ये भगवा आतंकवाद प्रस्थापित केल्याप्रकरणी १० हिंदुत्वनिष्ठांची नावे घोषित करण्यात आली होती.

७. हिंदुत्वनिष्ठांची निर्दाेष सुटका

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने घोषित केलेल्या सूचित संघ किंवा अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांशी संबंधित असलेल्यांची नावे होती. ते सर्वजण समझोता एक्सप्रेस स्फोट, मक्का मशीद स्फोट, अजमेर स्फोटात ‘वाँटेड’ होते. त्यानंतर न्यायालयाने स्वामी असीमानंद यांची निर्दोष मुक्तता केली. कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंह यांना जामीन देण्यात आला. याखेरीज बहुतांश आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यांमध्ये साक्षीदार बनवण्यात आलेल्या १७ जणांनी त्यांचे म्हणणे मागे घेतले आणि त्यांना साक्ष देण्यास भाग पाडल्याचे सांगितले.

८. हिंदूंची मानहानी केल्यामुळे काँग्रेसचे राजकारण संपुष्टात

अशा प्रकारे काँग्रेसने विणलेले खोटे कथानक उद्ध्वस्त झाले आणि त्याचा फटका काँग्रेसला सहन करावा लागला. त्याचाच परिणाम असा झाला की, वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला मोठा विजय मिळाला आणि ते पंतप्रधान झाले. त्यानंतर वर्ष २०१९ आणि २०२४ मध्येही भाजपने सातत्याने विजयाची पुनरावृत्ती करत इतिहास रचला. काँग्रेसला हे कळेपर्यंत त्यांची नौका बुडाली होती. अशा प्रकारे काँग्रेसने स्वत:चे अस्तित्व पुसण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले. अखेर हे पाऊल किती जीवघेणे ठरले, हे सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावरून सिद्ध झाले आहे. ‘काँग्रेसने ‘भगवा आतंकवाद’ हा शब्द वापरायला नको होता’, अशी स्पष्ट वेदना त्यांच्या आवाजात आहे. भगवा हा केवळ शब्द नसून तो भारतीय संस्कृतीचा रंग आहे. तो बलीदान आणि अभिमान यांचे प्रतीक आहे.

काँग्रेसी नेत्यांनी भारतीय संस्कृतीला कलंकित करून हिंदूंची मानहानी करण्याचा जो खेळ खेळला, त्यात सोनिया गांधींसारख्या नेत्या फसल्या आणि १४० वर्षे जुन्या पक्षाला अशा अवस्थेवर आणून सोडले, जेथे त्यांना आता अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या संमतीने ‘भगवा आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी काँग्रेसने हिंदूंना दिलेल्या जखमा भरून निघतील का ?’

(साभार : ‘आय वॉच’चे संकेतस्थळ)

संपादकीय भूमिका

काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना ‘भगवा आतंकवाद’ या शब्दाचा वापर कुणी करायला सांगितला, हे जनतेसमोर उघड व्हायला हवे !