जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे !

रामभक्त हनुमान

‘राम आणि त्याचे नाम हे एकरूप आहे, ते जो घेईल त्याच्यामागे राम येईल, नव्हे रामाला यावेच लागेल. ‘श्रीराम जय राम जय जय राम’, हे नाम भक्तशिरोमणी हनुमंतरायांनी सतत घेतले आणि राम त्यांच्या हृदयात विराजमान झाला. हेच नाम समर्थ रामदासस्वामींनी घेतले आणि रामाने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. या नामाच्या जपाने वाल्या कोळीचा महर्षि वाल्मीकि झाला. तेच नाम संत तुलसीदास, ब्रह्मचैतन्य महाराज, ब्रह्मानंद महाराज, प्रल्हाद महाराज यांनी अहोरात्र घेतले आणि ते नाममय झाले. त्यामुळे राम त्यांचे जीवनाच्या अविभाज्य भाग झाला. ‘रामा तुझे कोमल नाम घेता, संतोष वाटे बहु फार चित्ता’, अशी त्यांची अवस्था झाली.

पू. (प्रा.) के.वि. बेलसरे

‘नाम घ्यावे, गावे भावे, जनासी सांगावे, हाचि सुबोध गुरूंचा, नामापरते सत्य न मानावे’, असे हे अमृतासारखे गोड नाम आपण गुरुकृपेने घेतले, तर राम आपल्याही मागे येईल. यांचे प्रमाण समर्थांनी दिले आहे. ‘जप संख्या होता १३ कोटी, प्रत्यक्ष भेटतील राम जगजेठी’, त्यासाठी सद्गुरु कृपेची आस आणि नामसाधनेची कास भक्तीने धरावयास हवी. जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की, परमेश्वर सुटला.’

– पू. (प्रा.) के.वि. बेलसरे

(‘पू. (प्रा.) के.वि. बेलसरे यांचे आध्यात्मिक सामर्थ्य’ या फेसबुकवरून साभार)