पुणे येथे धर्माभिमानी हिंदूंच्या उपस्थितीत ‘अक्षय्य हिंदु’ पुरस्कार वितरण सोहळा साजरा !

काशी-अयोध्या-मथुरा यांसाठी न्यायालयीन लढाई लढणारे प्रसिद्ध अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची सोहळ्याला सन्माननीय उपस्थिती !

पुणे, २० मे (वार्ता.) – हिंदु हितासाठी कार्य करणार्‍या देशभरातील कार्यकर्त्यांना ‘अक्षय्य हिंदु पुरस्कार समिती’च्या वतीने ‘अक्षय्य हिंदु’ पुरस्काराने गौरवण्यात आले. स.प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे १९ मे या दिवशी हा कार्यक्रम झाला. या वेळी कै. शरद मोहोळ यांना मरणोत्तर विशेष ‘अक्षय्य हिंदु’ पुरस्कार देण्यात आला. शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुख्य पुरस्कार ऋषिकेश सकनूर यांना हिंदु एकतेच्या कार्यासाठी, प्रभाकर सूर्यवंशी यांना व्याख्याते म्हणून, तर गुड्डी शिलू यांना जनजाती कल्याण कार्यासाठी आणि आचार्य के.आर्. मनोज यांना धर्म जागरणासाठी देण्यात आला. अनंत करमुसे यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी माजी खासदार प्रदीप रावत, समितीचे तुषार दामगुडे, शेफाली वैद्य, सौरभ वीरकर, स्नेहल कुलकर्णी, ऋषभ परदेशी, नीलेश भिसे आदी मान्यवर उपस्थित होते. काशी-अयोध्या-मथुरा यांसाठी न्यायालयीन लढाई लढणारे सुप्रसिद्ध अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तसेच सुप्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनी एका चर्चासत्राद्वारे ‘सर्वांचे कार्य, तसेच त्यांना येणार्‍या अडचणी यांवर त्यांनी कशी मात केली ?’ याविषयी उपस्थितांना अवगत केले.

ज्या ज्या ठिकाणी मंदिर तोडून मशिदी बांधल्या आहेत, त्या प्रत्येक ठिकाणांना मुक्त करण्याचा संकल्प करूया ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

रामभक्त, तसेच निष्पाप कारसेवकांवर केलेला गोळीबार, मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना दिलेला त्रास, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या आदींमुळे हिंदूंना असंख्य यातना कष्ट भोगावे लागले आहेत. हिंदुत्वाचे काम करण्यासाठी हिंदूंना आतापर्यंत कायम प्रतारणा आणि अवहेलनाच मिळाली आहे, हे लक्षात घेता हिंदुत्वाच्या कामासाठी पुरस्कार मिळणे, हे खरोखरीच कौतुकास्पद आहे. २२ जानेवारी २०२४ या दिवशी ज्यासाठी असंख्य हिंदूंनी आपल्या प्राणांचे बलीदान दिले तो प्रभु श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस आपल्या सर्व सनातनी हिंदूंसाठी अभूतपूर्व असा गौरवाचा क्षण होता; म्हणूनच आस्थेच्या आधारावर हिंदूंना श्रीराममंदिर मिळाले नसून ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने हिंदूंना श्रीराममंदिर दिले आहे, हे हिंदूंनी छातीठोकपणे सांगण्याची आवश्यकता आहे. ज्या वेळी मंदिरात देवतेची प्रतिष्ठापना होते त्या क्षणापासून त्या मंदिरात त्या देवतेचे अस्तित्व असते. मंदिर उद्ध्वस्त केल्यामुळे देवतेचे अस्तित्व संपुष्टात येत नाही. अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी त्या त्या देवतेचे अस्तित्व असतेच, असे हिंदु धर्म शास्त्र सांगते. ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रभु श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, त्याचप्रमाणे आपल्या अप्रत्यक्ष देवतेला प्रत्यक्षरित्या स्थापित करणे, हे आता प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. चर्च आणि मशीद स्थलांतरित होऊ शकते; पण मंदिर स्थलांतरित होऊ शकत नाही; कारण त्या ठिकाणी देवतेची प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे त्या त्या देवतेचे अस्तित्व असते. त्यामुळे ‘मंदिर वही बनाऐंगे’ अशी शपथ हिंदु घेत होते. त्याचप्रमाणे मथुरा, ज्ञानवापी आणि ज्या ज्या ठिकाणी मंदिरे तोडून मशिदी बांधल्या आहेत, त्या प्रत्येक ठिकाणांना मुक्त करण्याचा संकल्प करूया. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या आयुष्यात काशी आणि मथुरा मुक्त करायची होती, ती त्यांची शेवटची इच्छा होती, ‘त्याविना मी मोक्षाला कसा जाऊ शकतो’, असे त्यांनी म्हटले होते. काशी विश्वनाथ, मथुरेची श्रीकृष्णभूमी लवकरच इस्लामिक अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त होईल. त्यासाठी आमचा लढा चालू आहे. हिंदू संघटित झाले, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

इस्लामी अतिक्रमणातून फक्त मंदिरांना मुक्त करायचे नसून धर्मांतरित झालेल्यांनाही स्वधर्मात आणायचे आहे ! – आचार्य के.आर्. मनोज

आचार्य के.आर्. मनोज यांनी सांगितले की, इस्लामी अतिक्रमणातून फक्त मंदिरांना परत मिळवायचे नसून जे इस्लाम, ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतरित झाले आहेत, त्यांनाही आपल्याला स्वधर्मात परत आणायचे आहे. आपल्याला संपूर्ण विश्वात सनातन धर्माची स्थापना करायची आहे. शंकराचार्यांच्या भूमीत म्हणजेच केरळमधून सर्वांत अधिक जण इसिसमध्ये भरती होत आहेत याविषयीही त्यांनी खेद व्यक्त केला; पण सध्या ही स्थिती केवळ केरळमध्येच नाही तर संपूर्ण देश, संपूर्ण जगामध्ये आहे. सनातन धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी ‘आर्षविद्या समाजा’ची स्थापना केली.

कोदंडधारी श्रीरामाची मूर्ती, १० सहस्र रुपये रोख आणि पुस्तकांचा संच असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा दुसरे वर्ष आहे. गडचिरोली भागात वनवासी जनजातींसाठी कार्य करत असलेले सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिर्के यांना ‘सांगाती ट्रस्ट’च्या वतीने डॉ. सुजित निलेगावकर यांनी एक रुग्णवाहिका या वेळी प्रदान केली. प्रभाकर सूर्यवंशी, गुड्डी शिलू, तसेच अनंत करमुसे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

हिंदुहितासाठी कार्य करणारे श्री. प्रभाकर सूर्यवंशी !

श्री. प्रभाकर सूर्यवंशी

फक्त हिंदुहितासाठी कार्य करणारे एक मुख्य नाव म्हणजे सुप्रसिद्ध यू ट्यूबर, ‘डीजी ९’चे संपादक श्री. प्रभाकर सूर्यवंशी ! अशा ‘यू ट्यूबर्स’मुळे ज्वलंत हिंदुत्वाचा बुलंद आवाज पुन्हा घुमू लागला आहे. अतिशय संयमाने ते आपले सूत्र मांडतात. वैयक्तिक आयुष्यातही ते शांतपणे बोलतात. भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी या मंडळींनी हे सिद्ध करून दाखवले आहे की, तुम्ही हिंदू विचार, राष्ट्रीय विचार मांडले, तरी लोक तुम्हाला दूर लोटणार नाहीत, तुम्ही पुरस्कारांपासून वंचित रहाणार नाहीत; उलटपक्षी तुम्हाला वेळोवेळी मंच उपलब्ध करून दिले जातील. तुमचा सन्मान होईल. या मंडळींनी डाव्यांची मक्तेदारी मोडून काढली आहे.

‘अर्जुनाला जागृत करण्यासाठी श्रीकृष्णाला गीता सांगावी लागली, तसेच आज हिंदु निद्रिस्त असल्यामुळे त्यांना जागृत करण्याचे कार्य करावे लागेल’, असे मत सूर्यवंशी यांनी या वेळी व्यक्त केले.

संपादकीय भूमिका

मंदिरे तोडून मशिदी बांधलेल्या प्रत्येक ठिकाणांना मुक्त करण्याचा संकल्प करून हिंदूंनी धर्मकर्तव्य पार पाडावे !

शरद मोहोळ यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारतांना शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ
हिंदु धर्मात परत आलेल्या तरुणी आणि महिल यांसह अन्य मान्यवर
मार्गदर्शन करतांना अधिवक्ता विष्णु शंकर जैन