सरकार टिकल्यास मंत्रालयसुद्धा गुजरातमध्ये नेतील ! – आदित्य ठाकरे, आमदार

आदित्य ठाकरे, आमदार

कोल्हापूर – प्रश्न केवळ आमचा नसून राज्यघटना टिकणार कि नाही ? अशी स्थिती आहे. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांचे नाव खराब करून घेणार नाहीत. सरकार टिकल्यास मंत्रालयसुद्धा गुजरात येथे नेतील, अशी स्थिती आहे. जर राज्यघटनेच्या चौकटीत न्याय झाला, तर शिवसेना सोडून गेलेले ४० जण अपात्र ठरतील. निकालाच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी सभापतींना भेटणे म्हणजे न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेले, असे म्हणावे लागेल, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. ते कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते. आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून त्यांच्या २ सभा होणार आहेत.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘उद्याचा निर्णय घटनेनुसार असेल अशी आशा आहे आणि आम्ही सत्याच्या बाजूने असल्याने विजय आमचाच होणार आहे. आता ‘ईडी’, ‘सीबीआय’ यांची भीती वाटत नाही; मात्र सत्तेच्या विरोधात असणार्‍यांवर दबाव टाकला जात आहे.’’