Viksit Bharat Sankalp Yatra:ग्रामीण भागांत ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून लोककल्याणकारी योजनांचा जागर

विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी – शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांसाठी पात्रता असूनही, ज्या लोकांना विकासाच्या प्रवाहात येता आले नाही, त्यांना शासकीय योजनांचा विविध लाभ मिळावा, या उद्देशाने हाती घेतलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्ह्यातील ग्रामीण भागांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक योजनांची माहिती लोकांपर्यंत व्यवस्थित न पोचल्याने त्यांच्या मनात अनेक योजनांविषयी संभ्रम असतो. तो संभ्रम दूर व्हावा, त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे आणि योजनांच्या पात्रतेविषयी आवश्यक असणार्‍या कागदपत्रांची पूर्तता करता यावी, हा उद्देश घेऊन योजनांची प्रचार, प्रसिद्धी व्हावी या दृष्टीने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेत आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, पी.एम्. गरीब कल्याण अन्न योजना, पी.एम्. विश्वकर्मा, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पी.एम्. पोषण अभियान, दीनदयाल अंत्योदय योजना आदींचा समावेश आहे. तसेच आदिवासी विभागासाठी विशेष योजना, स्कॉलरशिप योजना, मातृत्व वंदना योजना, उज्ज्वला योजना अशा विविध विभागांच्या योजनांचा यात समावेश असणार आहे.

गणेशगुळे येथे कृषी विभागामार्फत विविध मार्गदर्शन

तालुक्यातील ग्रामपंचायत गणेशगुळे येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंतर्गत कृषी विभागाकडून पी.एम्. प्रणाम-रासायनिक खताला पर्यायी खतांचा वापर आणि व्यवस्थापन, माती परीक्षण आणि सेंद्रिय शेती याविषयी मार्गदर्शन केले. त्याचसमवेत ‘ड्रोन’द्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

या योजनांची माहिती देणारी ‘व्हॅन’  इथे असणार

विकसित भारत संकल्प यात्रा ‘व्हॅन’

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेंतर्गत लांजा तालुक्यातील कोंड्ये अन् कुरंग, रत्नागिरीमधील कुरतडे अन् पोमेंडी बु., संगमेश्वरमधील किरदुवे अन् कोंडकादामराव, गुहागरमधील कुडाली, चिपळूणमधील नारदखेरकी अन् देवखेरकी, खेडमधील भडगाव अन् चाकाळे, मंडणगडमधील देव्हारे अन् सावरी या गावांत १३ डिसेंबर या दिवशी विविध योजनांची माहिती देणारी ‘व्हॅन’ फिरणार आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.