महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषदेतील मान्‍यवरांचे मौलिक विचार !

महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषदेला शंखनादाने प्रारंभ झाला. त्‍यानंतर श्री गणेशवंदन झाले. जळगावचे ग्रामदैवत श्रीराम आणि सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या चरणी वंदन करण्‍यात आले. दीपप्रज्‍वलन आणि वेदमंत्रपठण झाले. या वेळी वेदमूर्ती श्रीराम जोशी, संतगण, तसेच व्‍यासपिठावरील मान्‍यवर यांचा सन्‍मान करण्‍यात आला. जळगाव समन्‍वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या शुभसंदेशाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रियंका लोणे आणि श्री. बळवंत पाठक यांनी केले.

‘मंदिर प्रतिनिधींच्‍या एकत्रिकरणाची आवश्‍यकता’, महाराष्‍ट्र मंदिर न्‍यास परिषदेची भूमिका, पुजार्‍यांच्‍या अडचणी आणि उपाय, मंदिरांच्‍या माध्‍यमातून हिंदूंचे संघटन, मंदिरांचे व्‍यवस्‍थापन, प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, स्‍वच्‍छता, आर्थिक अडचणी अशा विविध विषयांवर या परिषदेत ऊहापोह होणार आहे.

मंदिरांतील पूजाविधींचा अभ्‍यासक्रम सिद्ध करणे आवश्‍यक ! – आचार्य महामंडलेश्‍वर महंत श्री सुधीरदासजी महाराज, काळाराम मंदिर

आचार्य महामंडलेश्‍वर महंत श्री सुधीरदासजी महाराज

हिंदु धर्मानुसार ६४ कलांमधून पूजाविधीची निर्मिती झाली आहे. पूजापद्धतीमधून देवतांच्‍या चैतन्‍याचे आवाहन केले जाते. पुरुषसूक्‍तामध्‍ये देवतांना आवाहन करण्‍याचे सामर्थ्‍य आहे. सध्‍या याविषयी अभ्‍यास नसलेल्‍या पुजार्‍यांची नियुक्‍ती मंदिरांमध्‍ये केली जाते. शास्‍त्रयुक्‍त पूजाविधीच्‍या अभावामुळे मंदिरातील पावित्र्य नष्‍ट होत आहे. पावित्र्य टिकवून ठेवण्‍यासाठी मंदिरांतील पूजाविधींचा अभ्‍यासक्रम सिद्ध करणे आवश्‍यक आहे. मंदिरातील परंपरागत विविध पूजाविधी पुन्‍हा चालू होणे आवश्‍यक आहे. मंदिरातील देवतेच्‍या तत्त्वामुळे मंदिरात येणार्‍या भाविकांच्‍या मनोकामना पूर्ण होतात. अयोग्‍य पूजाविधीने मंदिरातील पावित्र्य नष्‍ट होऊन भाविकांना देवतेच्‍या तत्त्वाची प्रचीती येत नाही. ‘त्‍यामुळे मंदिरांमध्‍ये शास्‍त्रोक्‍त पूजाविधी होईल’, याची काळजी घ्‍यायला हवी. या परिषदेच्‍या माध्‍यमातून समुद्रमंथनरूपी विचारमंथन होऊन मंदिराना गतवैभव प्राप्‍त होईल.

काशी विश्‍वनाथ मंदिरासाठीचा लढा हा हिंदु संस्‍कृतीरक्षणाचा लढा ! – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन

काशी विश्‍वेश्‍वर मंदिर ३ वेळा तोडण्‍यात आल्‍याचे वर्ष १९९७ मध्‍ये एका खटल्‍यात सर्वोच्‍च न्‍यायालयाने मान्‍य केले आहे. त्‍यामुळे या ठिकाणी मंदिर होते, हे आम्‍हाला न्‍यायालयात सिद्ध करण्‍याची आवश्‍यकता नाही. औरंगजेबाने काशी विश्‍वेश्‍वराचे मंदिर तोडण्‍यासाठी काढलेले ‘फर्मान’ (आदेश) आम्‍ही सर्वोच्‍च न्‍यायालयात सादर केले आहे. वर्ष १९३६ मध्‍ये ब्रिटीश सरकारनेही काशी विश्‍वेश्‍वर मंदिर हे वक्‍फ मंडळाची भूमी नसून हिंदूंचे श्रद्धास्‍थान असल्‍याचे प्रतिज्ञापत्रात म्‍हटले आहे. काशी विश्‍वेश्‍वराचे मंदिर ३ वेळा पाडण्‍यात आले; परंतु ‘सर तन से जुदा’ (शिरच्‍छेद) म्‍हणत हिंदू रस्‍त्‍यावर उतरले नाहीत. ‘काशी विश्‍वेश्‍वराचे मंदिर मुक्‍त करावे’, ही छत्रपती शिवाजी महाराज यांची शेवटची इच्‍छा होती. मंदिरे ही सनातन संस्‍कृतीमधील अविभाज्‍य भाग आहेत. त्‍यामुळे आक्रमकांनी कह्यात घेतलेली सर्व मंदिरे हिदूंनी मुक्‍त करायला हवीत. काशी विश्‍वनाथ मंदिरासाठीचा लढा हा हिंदूंच्‍या संस्‍कृतीरक्षणाचा लढा आहे.

मंदिर परिषदेचे आयोजन म्‍हणजे हिंदूंसाठी शुभकल्‍याणकारी घटना ! – सद़्‍गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्‍था

सद़्‍गुरु नंदकुमार जाधव

अध्‍यात्‍माच्‍या दृष्‍टीने देवालय म्‍हणजे भगवंताचा साक्षात वास असणारे पवित्र स्‍थान ! अलीकडेच पुणे येथे ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञ पू. (डॉ.) रघुनाथ शुक्‍ल यांनी केलेल्‍या संशोधनाचा निष्‍कर्ष आहे की, मंत्र आणि मंदिरे ही विकार (आजार) बरे करणारे ऊर्जास्रोत आहेत. आजच्‍या धकाधकीच्‍या जीवनात हिंदूंना विनामूल्‍य मनःशांती देणारे आणि आनंदप्राप्‍तीच्‍या आंतरिक ओढीपोटी ईश्‍वराशी अनुसंधान साधण्‍याचे एकमेव ठिकाण म्‍हणजे मंदिरे आहेत. वैयक्‍तिक जीवनासह सामाजिक जीवनातही मंदिराचे स्‍थान अनन्‍यसाधारण आहे. मंदिरांतूनच हिंदूंची संस्‍कृती आणि परंपरा यांचे जतन अन् संवर्धन होत असते. अशा मंदिरांच्‍या हितांसाठी परिषद होत आहे, ही हिंदु समाजासाठी शुभकल्‍याणकारी घटना आहे.

परिषदेच्‍या माध्‍यमातून मंदिरांच्‍या संरक्षणार्थ अनेक उपक्रम उभे रहातील ! – अनुप जैस्‍वाल, सचिव, देवस्‍थान सेवा समिती (विदर्भ)

अनुप जैस्‍वाल

मंदिरे आणि धर्मपरंपरा यांच्‍या रक्षणार्थ मंदिर परिषदेचा विषय आतापर्यंत कुणीही हाती घेतला नव्‍हता. हा महत्त्वपूर्ण विषय सर्वांसमोर येण्‍यासाठी हिंदु जनजागृती समितीने राज्‍यस्‍तरीय परिषदेचे आयोजन केले आहे, ते अत्‍यंत कौतुकास्‍पद आहे. या परिषदेच्‍या माध्‍यमातून जिल्‍हास्‍तरीय मंदिर परिषद घेऊन मंदिरांच्‍या रक्षणासाठी, तेथील मालमत्तेच्‍या रक्षणासाठी आवश्‍यक ती पावले उचलण्‍यात येतील. मंदिर परिषदेच्‍या माध्‍यमातून मंदिरांच्‍या संरक्षणार्थ अनेक उपक्रम उभे रहातील, याची मला निश्‍चिती आहे.

महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषदेचे आयोजन स्‍वागतार्ह ! – गणेश लंके, अध्‍यक्ष, श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर संरक्षण कृती समिती, पंढरपूर

गणेश लंके

मंदिरांच्‍या रक्षणासाठी हिंदु जनजागृती समितीने महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषदेचे केलेले आयोजन स्‍वागतार्ह आहे. सरकारीकरण झालेली मंदिरे पुन्‍हा हिंदूंच्‍या कह्यात यावीत, तसेच हिंदूंच्‍या मंदिरांना मिळणारे दान हिंदु धर्मासाठी वापरले जावे, तसेच सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांमध्‍ये होणारा भ्रष्‍टाचार रोखला जावा, यासाठी जागृत हिंदूंचे संघटन आवश्‍यक आहे. याच पार्श्‍वभूमीवर ही मंदिर परिषद आवश्‍यक आहे. या परिषदेला मी स्‍वत: उपस्‍थित रहाणार आहे.

सरकारी उद्योगांचे खासगीकरण, तर मग हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण का ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते हिंदु जनजागृती समिती.

सनातन धर्माच्या विरोधात पूर्वीपासून चालू असलेल्या आघातांचे सत्र अद्यापही चालूच आहे. मंदिर केवळ देवालयच नाही, तर ते विद्यालय आहे, न्यायालय आहे, तसेच आरोग्यालयही आहे. पूर्वीच्या काळी मंदिरांच्या द्वारे विश्वविद्यालये चालवली जात असत. त्यातून हिंदूंना विद्या प्रदान केली जात होती. मोगल आक्रमकांनी मंदिरांचा विध्वंस करून तेथील धन लुटले, तर मंदिरे सधन असल्याने तेथील ज्ञानसंपदा चालूच राहील आणि मिशनर्‍यांच्या कॉन्व्हेंट चालणार नाहीत, हिंदूंना धर्मांतरीत करता येणार नाही, या उद्देशाने ब्रिटिशांनी मंदिरांतील धनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मंदिरांच्या सरकारीकरणाला प्रारंभ केला.

वर्ष १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला; मात्र मंदिरे स्वतंत्र झालीच नाहीत. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन आज सेक्युलर सरकारने ४ लाख मंदिरे स्वतःच्या नियंत्रणाखाली घेतली आहेत. एकीकडे सरकारी उद्योगांचे खासगीकरण केले जात आहे, तर मग हिंदु मंदिरांचे सरकारीकरण का ? सरकारीकरण झालेल्या शिर्डी देवस्थान, श्री तुळजाभवानी देवस्थान, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती या आणि अशा विविध मंदिरांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे मंदिरांवर सरकारचे नियंत्रण येऊ नये, यासाठी प्रत्येक मंदिर सदस्याचा प्रयत्न असायला हवा.

देवस्थानचे कार्य सुरळीत चालण्यासाठी नियम पुस्तिका असणे आवश्यक ! – विजयसिंह राजे जाधव, बालाजी देवस्थान, देऊळगावराजा

श्री. विजयसिंह राजे जाधव

मागील ३३० वर्षांची परंपरा असलेला बालाजी महाराजांचा महोत्सव आणि पालखी मिरवणूक प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते. या उत्सवात १८ पगड जातीच्या बांधवांना दायित्व दिलेले असते. त्यामुळे या उत्सवाच्या माध्यमातून संघटन टिकून रहाण्यास साहाय्य झाले आहे. मंदिरांच्या माध्यमातून हिंदूंचे संघटन होणे आवश्यक आहे. देवस्थानचे कार्य सुरळीत चालण्यासाठी नियम पुस्तिका असणेही आवश्यक आहे.

या परिषदेला भाजपचे स्थानिक आमदार श्री. सुरेश भोळे हेही उपस्थित होते. या वेळी मत व्यक्त करतांना आमदार श्री. भोळे म्हणाले, ‘‘न्यायालयात भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेण्यास सांगितले जाते; मात्र शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये भगवद्गीता शिकवली जात नाही. ही स्थिती पालटणे आवश्यक आहे.’’

परिषदेला उपस्थित संत आणि मान्यवर

जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहूचे विश्वस्त ह.भ.प. माणिक महाराज गोविंद मोरे, ह.भ.प. संजय महाराज मोरे, महावीर मिशन ट्रस्टचे भाग्यनगरचे संस्थापक अध्यक्ष जैनमुनी निलेशचंद्रविजयजी महाराज, सनातनचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव, नाशिकचे आनंद आखाड्याचे सचिव महंत गणेशानंद सरस्वती,  हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता पू. सुरेश कुलकर्णी, जळगाव येथील स्वामी नारायण मंदिराचे व्यवस्थापक श्री नयन स्वामीजी, जळगाव येथील ह.भ.प. श्रीराम मंदिर पुजारी धर्मा महाराज पाटील, सोलापूर येथील अखिल भारत पद्मशाली हिरालाल पुरोहित संघमचे राष्ट्रीय अध्यक्ष, पं. वेणुगोपाल श्रीनिवास जिल्ला (पंतूलू), पू. सुरेश महाराज पुराणिक, मठाधिपती श्री. बाळासाहेब जाधव, महंत रजनीशजी, संभाजीनगर येथील श्री संत जनार्दन स्वामी संस्कार संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य रामानंद महाराज, संभाजीनगर येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रवक्ता अविमुक्तेश्वर महाराज

परिषदेच्या ठिकाणी असलेल्या ‘सेल्फी पॉईंट’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

जळगाव येथे आयोजित महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेच्या निमित्ताने राज्यातील अनेक मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित, मंदिराशी संबंधित कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते, अधिवक्ते आणि लेखापरीक्षक एकत्र आले होते. या वेळी अनेकांनी प्रवेशद्वाराजवळ लावलेल्या ‘सेल्फी पॉईंट’ला उभे राहून आपापले छायाचित्रे काढत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आम्ही मंदिर रक्षणासाठी लढणारे योद्धा आहोत, हे सर्वांनी दाखवून दिले.


‘मंदिर योद्ध्यां’चे मंदिरांच्या क्षेत्रातील भरीव कार्य !

मागील काही वर्षांत मंदिर क्षेत्रात अनेक ‘मंदिर योद्ध्यां’नी मंदिरे सरकारच्या कह्यात जाण्यापासून रोखली, तर काहींनी मंदिरांच्या संरक्षणार्थ न्यायालयीन लढा दिला, अशा मंदिरांच्या क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या ‘मंदिर योद्ध्यांं’चा ‘श्री गणपति मंदिर देवस्थान’चे विश्वस्त श्री. अशोक जैन आणि डॉ. पांडुरंग पिंगळे यांनी सन्मान केला.


मंदिरांच्या क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या १० ‘मंदिर योद्ध्यां’चा सन्मान !

संभाजीनगर उच्च न्यायालयाचे अधिवक्ता पू. सुरेश कुलकर्णी यांचा सन्मान करतांना डॉ. पांडुरंग पिंगळे
‘अखिल भारतीय सरयूपारीण महासभे’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. रामनारायण मिश्र यांचा सन्मान करतांना श्री. राजेश तिवारी
‘श्री तुळजाभवानी मंदिर पुजारी मंडळा’चे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे यांचा सन्मान करतांना श्री. गणेश वैद्य
नांदेड येथील अन्नपूर्णा मंदिराच्या अध्यक्षा सौ. सुषमा गहेरवार यांचा सन्मान करतांना श्री. गणेश वैद्य, पद्मालय
हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांचा सन्मान करतांना डॉ. पांडुरंग पिंगळे
अमरावती येथील ‘देवस्थान सेवा समिती’चे सचिव श्री. अनुप जयस्वाल यांचा सन्मान करतांना श्री. भीका पाटील
‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती’चे श्री. गणेश लंके यांचा सन्मान करतांना श्री. अमृत कोळी
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा सन्मान करतांना श्री. अशोक जैन
सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचा सन्मान करतांना श्री. अशोक जैन
काशी मथुराच्या मुक्तीसाठी अखंडपणे न्यायालयीन लढा देणारे सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा सन्मान करतांना श्री. अशोक जैन