वारीकाळात महिला वारकऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षा यांविषयी नवीन निर्देश लागू !

महाराष्ट्र सरकारच्या महिला आयोगाचा उपक्रम !

महाराष्ट्र राज्य महिला आयोग

मुंबई – महाराष्ट्र सरकारच्या महिला आयोगाने आषाढी आणि कार्तिकी वारी या कालावधीत महिला वारकऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षा यांच्याविषयी नवीन निर्देश जारी केले आहेत. या निर्देशांनुसार वारी काळात दर १० ते २० कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय अन् न्हाणीघर यांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येथे ‘सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग’ आणि ‘सॅनिटरी नॅपकिन बर्निंग’ यंत्रे उपलब्ध असावीत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या पत्रकामध्ये या संदर्भातील निर्देश वारी मार्गक्रमण करणार असलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. (असे निर्देश का द्यावे लागतात ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ? – संपादक)

अन्य मागण्या 

१. स्त्रीरोगतज्ञांची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.

२. महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला ‘हेल्पलाईन’ क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परिसरातील दर्शनी भागात लावावेत.