श्रीरामाचा अपमान !

बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने एका सरकारी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आमंत्रित केले होते. मान्यवरांच्या भाषणांमध्ये त्यांना भाषण करण्यासाठी सूत्रसंचालकाने त्यांच्या नावाची घोषणा केल्यावर त्या बोलण्यापूर्वी उपस्थित श्रोत्यांमधून जय श्रीराम आणि भारतमाता की जय या दोन घोषणा देण्यात आल्या. या दोन घोषणा ऐकल्यावर अगदी अंगावर उकळते पाणी पडल्याप्रमाणे ममतादीदी ओरडल्या, येथे कुणाला आमंत्रित केल्यानंतर त्याला अपमानित करणे योग्य नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळेच उलट हा देश ज्यांची तपस्या, चैतन्य यांवर चालला आहे ते अयोध्यापती श्रीराम आणि समस्त हिंदु जनता हेच अपमानित झाले आहेत. कुठे काय बोलावे, कुठे काय करावे याचे भान असते त्याला सज्जन गृहस्थ म्हणतात. ममतादीदी तर एका राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. देव आणि देश भक्तीपर घोषणा दिल्यामुळे त्यांना अपमानित झाल्यासारखे वाटत असेल, तर त्या भारतीय आहेत ना ? याविषयी शंका आल्याविना रहात नाही.

अहंकारी ममताबानो !

श्रीराम भारताचा आत्मा आहे, देशाचा गौरव आहे. भारतमाता ही देशाची ओळख आहे. कुणाही भारतियासाठी या घोषणांनी छाती फुलून येते, शरिरातील पेशीपेशी रोमांचित होते, धर्म आणि राष्ट्र कार्य करण्याची प्रेरणा जागृत होते, कठिणातील कठीण काम नक्की सुटेल असा आत्मविश्‍वास येतो. असे असतांना ममतादीदी यांना मात्र भयंकर क्रोध आला, हे अनाकलनीय आहे. रामायणाच्या काळी रावण, कंस आणि अन्य राक्षस यांना श्रीरामाचे नाव घेतल्यावर पुष्कळ राग यायचा. त्यांच्या राज्यात श्रीरामाचे नाव जरी कोणी उच्चारले, तरी त्यांना शिक्षा मिळत होती. रावणाचा भाऊ बिभीषण याने रामाचे गुणवर्णन करण्यास प्रारंभ केल्यावर रावणाच्या अंगाची लाही लाही व्हायची. श्रीरामाचा पराक्रम सांगून सीतेला सोडण्याची विनंती करण्यासाठी हनुमान, अंगद लंकेत जाऊनही रावण स्वत:च सर्वश्रेष्ठ आहे अशा गुर्मीत होता. त्यामुळे त्याचा अंत झाला. त्याचे राज्य भस्मसात झाले, रावणाची कोट्यवधी सेना, सेनापती आणि मुले यांचा नाश झाला. रावणाची गुर्मी आजही अनेकांमध्ये विविध प्रसंगांमध्ये जाणवते. अहंकार, क्रोध, स्वतःला श्रेष्ठ समजणे, हुकूमशाही वृत्ती आदी दोष रावणामध्ये होते. या दोषांनी त्याचा घात केला. हेच दोष ममता(बानो) यांच्यासारख्या राजकारण्यांमध्ये जाणवतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या  वाहनांचा ताफा बंगालमधील एका गावातून जात असतांना स्थानिकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. तेव्हाही अंगावर वीज पडल्याप्रमाणे त्या गाडीबाहेर आल्या आणि त्यांनी घोषणा दिल्या म्हणून आकांडतांडव केला, तसेच नंतर संबंधितांवर कारवाईसुद्धा करण्यात आली. ममताबानोंचे असे विक्षिप्त वागणे हा काही नवीन विषय नाही; मात्र विशिष्ट वेळीच त्यांचे असे होते म्हणून त्या जाणीवपूर्वक असे करून त्यांची निष्ठा या देशाशी नाहीच हे सिद्ध करत आहेत.

अल्पसंख्यांकांवर ममता !

बंगालमध्ये कोट्यवधी बांगलादेशींनी घुसखोरी केली, त्यानंतर रोहिंग्यांनी केली. तसेच आता परिस्थिती अशी आहे की, तेथील काही भागांमध्ये धर्मांध बांगलादेशी घुसखोरांचे प्राबल्य आहे आणि ते त्यांचा उमेदवारही ठरवू शकतात. ममताबानोंच्या पाठिंब्यामुळे त्यांना शिधापत्रिका, निवडणूक ओळखपत्र, रहिवासी दाखला सहज मिळून जातो आणि ते येथलेच आहेत, असे रहातात. या बांगलादेशींना देशाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तर त्याला कडवा विरोध केला जातो. केंद्र सरकारने कोणतीही योजना आणावी अथवा विधेयक आणावे, बंगालमधून ममताबानो यांचा विरोध ठरलेलाच. वर्ष २०१९ मध्ये आणि वर्ष २०२० च्या प्रारंभी बंगालमध्ये प्रतिदिन हिंसाचाराच्या घटना घडत होत्या. विशेष म्हणजे या घटना तेथील वृत्तपत्रे अथवा अन्य माध्यमे यांतून देशाला कळायच्याच नाहीत, तर सामाजिक माध्यमांद्वारे तेथील भीषण परिस्थितीची जाणीव व्हायची. हिंदु वस्त्या, मंदिरे, हिंदु जनता यांवर होणार्‍या या आक्रमणांमध्ये हिंदूंची अपरिमित हानी झाली. तत्कालीन राज्यपालांनी ही परिस्थिती पाहून राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असे सांगितले. अगदी कालपरवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या वाहनांच्या ताफ्यावर एका गावात प्रचंड दगडफेक होऊन काही गाड्यांची पुष्कळ हानी झाली. वर्ष २०१९ च्या निवडणुकांच्या वेळी तत्कालीन भाजपचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काढलेल्या मोर्च्याच्या वेळी जाळपोळ झाली होती. तेव्हा केंद्रीय सुरक्षा दलाच्या पोलिसांनी परिस्थिती हाताळली होती. स्वत: अमित शहा यांनी हे पोलीस होते म्हणून आज माझे प्राण वाचले, असे उद्गार काढले. देशाच्या गृहमंत्र्यांवर एका राज्यात अशी परिस्थिती येत असेल, तर तेथील सामान्य हिंदूंची काय अवस्था असेल, याची कल्पना करू शकत नाही. भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांचे काही दिवसांनी मृतदेह कधी झाडावर, कधी मैदानात, तर कधी पाणवठ्याजवळ आढळतात. एवढेच नव्हे, तर भाजपच्या आमदाराचा मृतदेह भर बाजारातील झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. एवढी दारूण स्थिती एखाद्या राज्यात असेल, तर केंद्र सरकारने सैन्य घुसवून तेथील गुंडगिरीचा बीमोड एव्हाना करणे आवश्यक होते; मात्र ते न झाल्याने तेथील हिंदुत्वनिष्ठ दहशतीखाली आहेत कि पुढील क्रमांक कुणाचा लागेल ! ही सर्व रावणराज्याचीच उदाहरणे म्हणता येतील.

आताही अनेक जण आहेत ज्यांना रामसेतू, राममंदिर, रामायण या शब्दांची अ‍ॅलर्जी वाटते. श्रीराम म्हणजे कम्युनल वाटते, तर रावण दलितांचा राजा वाटतो. रामायण कम्युनल, तर अन्य पंथियांचे धर्मग्रंथ सेक्युलर वाटतात. ममताबानो अशा गटांच्या प्रतिनिधी वाटतात. त्या ज्या राज्याच्या प्रमुख असतील, त्या राज्यात अशांती, अस्थिरता आणि अस्वस्थताच असणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिराचे भूमीपूजन केले. कधीकाळी क्रांतीकारक आणि संत यांची भूमी असलेला बंगाल आज देशविरोधकांचा गड बनला आहे. पंतप्रधान मोदी यांनी हा गड सर करून रावणराज्य संपवावे अशी सर्व देशवासियांची इच्छा आहे. ती इच्छा पंतप्रधान मोदी श्रीरामाच्या साक्षीने पूर्ण करतील, याची निश्‍चिती आहे.