‘मर्चंट नेव्ही’ अर्थात् व्यापारी जहाजांचे सध्याच्या काळात असलेले महत्त्व हे वादातीत आहे. अनेक देशातील खलाशी या क्षेत्रामध्येच यशस्वी करिअर घडवतात. देशालाही यातून लाभच होत असतो; मात्र या खलाशांच्या जीवनावर मात्र कायमच धोक्याचे सावट असते. त्यात अनेकदा अडचणीमध्ये सापडल्यावर आस्थापनेही या खलाशांना वार्यावर सोडून देतात. त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होते. आजकाल या घटनांच्या वारंवारतेत वाढ झाली आहे. त्यामुळे खलाशांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिक कडक नियम आणि त्याच्या पालनाची आवश्यकता आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. त्याविषयीचा ऊहापोह या लेखाद्वारे करत आहे.

१. व्यापारी जहाजांवरील खलाशांची भयावह स्थिती
जगाचा ८५ टक्के व्यापार हा समुद्रात ‘मर्चंट नेव्ही’ किंवा व्यापारी जहाजांच्या साहाय्याने होतो. संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था यावर अवलंबून असते; मात्र अनेकांना हे ठाऊक नाही की, ‘मर्चंट नेव्ही’ किंवा व्यापारी जहाजे अनेक वेळा आपल्या खलाशांना वार्यावर सोडून देतात. ही समस्या अनेक वर्षांपासून चालू असूनही यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

ज्या वेळेला एखादे जहाज आस्थापन २ मास तिच्या खलाशांना वेतन देत नाही, पुरेशा सुविधा पुरवत नाही किंवा त्यांना समुद्रात सोडून देते, तेव्हा या प्रकाराला ‘समुद्रात सोडून दिले जाणे’ (abandoned at sea), असे म्हटले जाते.
‘इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन’च्या (‘आंतरराष्ट्रीय कामगार संघटने’च्या) आकडेवारीप्रमाणे वर्ष २०२२ मध्ये वेगवेगळ्या १०३ घटनांमध्ये १ सहस्र खलाशांना अशा प्रकारे वार्यावर सोडून देण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तर कहरच झाला. वर्ष २०२४ मध्ये ३ सहस्र १३३ खलाशांना असेच सोडून देण्यात आले. यात ८९९ भारतीय खलाशी असून या प्रकारामु़ळे या खलाशांना आर्थिक संकट आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला होता.
२. अडीच ते तीन लाख भारतीय खलाशी आंतरराष्ट्रीय जहाजांवर
आज जगातील खलाशांमध्ये भारतीय खलाशांची संख्या १३ ते १५ टक्के एवढी आहे. अडीच ते तीन लाख भारतीय खलाशी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय आस्थापने आणि जहाज यांवर काम करत आहेत. त्यांच्या सुरक्षा आव्हानांवर जहाज मंत्रालयाचे लक्ष असणे आवश्यक आहे. मोठ्या संख्येने देशाला परदेशीय चलन मिळवून देणार्या या नाविकांच्या सुरक्षेवर आपण लक्ष ठेवले पाहिजे.
जहाज मालकांना वाटते की, त्यांनी जहाज आणि खलाशी जरी सोडून दिले, तरीही आस्थापन अथवा मालक यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे सोपे नाही; म्हणून ते अशा प्रकारचे कृत्य अनेक वेळा करतात. अनेक खलाशी आणि जहाज यांना समुद्रामध्ये किंवा कोणत्या तरी एखाद्या बंदरामध्ये सोडून दिले जाते. त्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई करायची, हे त्या त्या देशांवर अवलंबून असते.
वेगवेगळ्या देशांतील ‘मर्चंट नेव्ही कंपनी’ याकरता उत्तरदायी आहेत. समुद्रामध्ये खलाशांना का सोडून दिले जाते ? या संकटापासून वाचवण्याकरता जागतिक पातळीवर काय उपाययोजना करायला पाहिजे ? ‘इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशन’चे (‘आंतरराष्ट्रीय सागरी संघटने’चे) काय दायित्व आहे ? भारताने राष्ट्रीय स्तरावर कोणती पावले उचलली पाहिजेत ? या सगळ्या विषयांवर विचार केला जावा. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक आहे.
३. समुद्रामध्ये खलाशांना सोडून देण्याविषयीची विविध कारणे
३ अ. आर्थिक कारण : आर्थिक अडचणीत आल्यास किंवा जहाज जुने झाल्यास जहाज मालक हे जहाज आणि खलाशी यांना सोडून देतात. खलाशांचे वेतन देण्याचे टाळण्यासाठी किंवा इतर व्यय न्यून करण्यासाठी असे केले जाते.
३ आ. कायदेशीर कारणे : काही वेळा जहाज मालक बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील असतात. त्यामुळे ते पकडले जाण्याच्या भीतीनेही खलाशांना सोडून देतात. विविध देशांच्या अनेक बंदरात त्यांनी पैसे न भरल्यामुळे किंवा इतर आर्थिक कारणांमुळे ही जहाजे अडकली जातात. आंतरराष्ट्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यामध्ये पुष्कळ पैसे व्यय होऊ शकतात; म्हणून सर्वांत सोपे असते ते पकडले गेलेले जहाज आणि त्यातील खलाशी यांना सोडून द्यावे अन् या सगळ्यांतून स्वतःचे अंग काढून घेऊन स्वतःला सुरक्षित ठेवावे.
३ इ. सुरक्षिततेची कारणे : समुद्री चाचेगिरी किंवा इतर धोके यांमुळे काही जहाज मालक खलाशांना सोडून देतात. युद्धजन्य परिस्थितीत किंवा अपघात झाल्यावर हानीभरपाई टाळण्याकरता असे केले जाते. आज अनेक खलाशी सोमाली चाचांच्या कह्यात आहेत. यामुळे ते सोमाली चाचे मोठी खंडणी मागत आहेत, जी देण्याकरता जहाज मालक सिद्ध नसतात आणि ते त्यांचे जहाज आणि खलाशी यांना सोमाली चाचांच्या तावडीत सोडून देतात. अनेक खलाशी आजसुद्धा सोमाली चाचांच्या कैदेत आहेत आणि त्यांना सोडवणे अत्यंत आवश्यक आहे.
४. खलाशांना मिळणारी वागणूक
अन्न, पाणी आणि इतर सुविधा यांची कमतरता असल्यामुळे खलाशांची प्रकृती खराब होते आणि याखेरीज त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिघडते. बहुतेक खलाशांनी ‘मर्चंट नेव्ही’मध्ये सामील होण्याकरता मोठे कर्ज घेऊन आंतरराष्ट्रीय जहाज आस्थापनांमध्ये प्रवेश केलेला असतो आणि त्यांना वेतनच मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबाची आर्थिक अवस्था गंभीर होते. या संकटापासून वाचण्याकरता जागतिक पातळीवर विविध देशांनी एकत्र येऊन खलाशांच्या सुरक्षेसाठी नियम आणि धोरणे सिद्ध करणे आवश्यक आहे.
५. आंतरराष्ट्रीय कायद्यांची कार्यवाही
खलाशांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्यांची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक आहे. गुन्हा करणार्या जहाज मालकांवर कठोर कारवाई करणेही आवश्यक आहे. अनेक जहाजे पैसे वाचवण्याकरता ‘फ्लॅग ऑफ कन्व्हेनिअन्स’, म्हणजे लहान बेट राष्ट्रांमध्ये नोंदणी करतात. (‘फ्लॅग ऑफ कन्व्हेनिअन्स’ म्हणजे एखादे जहाज मूळ देशापेक्षा वेगळ्या देशाच्या कायद्यांनुसार चालवले जाते किंवा त्यावर कर आकारला जातो. यामुळे जहाज मालक पैसे वाचवतात.) इथे त्यांच्या विरुद्ध कारवाई करणे अत्यंत कठीण असते. अशा देशांच्या विरोधातही कारवाई करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
६. आंतरराष्ट्रीय सहकार्य
समुद्रामध्ये खलाशांना सोडून देण्याच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य वाढवणे आवश्यक आहे. माहितीची देवाणघेवाण आणि संयुक्त कारवाई करणे आवश्यक आहे. जहाज किंवा खलाशी समुद्रामध्ये सोडून दिल्याची बातमी लवकरात लवकर त्या संबंधित देशांकडे आणि खलाशांच्या कुटुंबाकडे पोचली पाहिजे. ज्यामुळे त्यांना सोडवण्याकरता होणारी कायदेशीर कारवाई वेगाने करता येईल.
७. खलाशांना साहाय्य
खलाशांना कायदेशीर आणि आर्थिक साहाय्य देण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांनी पुढे यायला हवे. खलाशांना सुरक्षित ठिकाणी पोचवण्यासाठीही साहाय्य आवश्यक आहे. सुटका होईपर्यंत अशा जहाजातील खलाशांना आर्थिक आणि इतर साहाय्य करण्याचे उत्तरदायित्व ‘आंतरराष्ट्रीय सागरी संघटने’कडे असावे.या संघटनेने बेकायदेशीर नोंदणी करणार्या राष्ट्रांविरुद्धही कारवाई करणे आवश्यक आहे. व्यापाराकरता समुद्रात जाणार्या जहाजांचा दर्जा आणि त्यांची क्षमता ही वेळोवेळी पडताळली जावी, ज्यामुळे धोकादायक जहाजांमधून प्रवास केला जाणार नाही. जहाजांची नियमित पडताळणी करणे आणि सुरक्षिततेच्या मानकांचे पालन करणे आवश्यक आहे. जुनी आणि धोकादायक जहाजे समुद्रात जाण्यापासून रोखणेही महत्त्वाचे आहे.
८. ‘आंतरराष्ट्रीय सागरी संघटने’ची कर्तव्ये काय आहेत ?
‘आंतरराष्ट्रीय सागरी संघटना’ ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे, जी आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी आणि सुरक्षेसाठी काम करते. तिचे मुख्य कार्य आंतरराष्ट्रीय सागरी कायदे, मानके सिद्ध करणे आणि त्यांची कार्यवाही करणे, हे आहे. ही संघटना खलाशांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांची सुरक्षितता यांसाठी काम करते. समुद्री व्यापाराच्या कार्यक्षमतेच्या वृद्धीसाठी उपाययोजना करणे, खलाशांच्या सुरक्षेसाठी मानकांची कार्यवाही करणे, समुद्राशी संबंधित संशोधनाला प्रोत्साहन देणे, खलाशांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार्या सगळ्या जहाजांचा आणि त्यांच्या खलाशांचा एक ‘डेटाबेस’ (माहितीसंचय) बनवणे, ज्यामुळे कुणी गैरकृत्य केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करता येणे सोपे जाईल.
९. भारताने राष्ट्रीय स्तरावर कोणती पावले उचलली पाहिजेत ?
अ. खलाशांना कायदेशीर आणि आर्थिक साहाय्य देण्यासाठी भारत सरकारने विशेष योजना चालू करणे, तसेच खलाशांचे हक्क आणि सुरक्षितता यांविषयी जनजागृती करणेही आवश्यक आहे. खलाशांना त्यांच्या हक्कांविषयी साक्षर करणेही महत्त्वाचे आहे.
आ. इतर देशांच्या नौदलांच्या साहाय्याने ‘गल्फ ऑफ एडन’ आणि ‘सोमालियाची किनारपट्टी’ येथे कारवाई करण्याची अनुमती देण्यात यावी.
इ. जे जहाज मालक वेगवेगळ्या कारणांमुळे गैरकृत्य करतात, त्यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई केली पाहिजे. यामुळे त्यांना अशा प्रकारच्या कृती पुन्हा करता येणार नाहीत.
१०. निष्कर्ष
समुद्रातील खलाशांची सुरक्षा आणि अधिकार यांचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी जागतिक स्तरावर सहकार्य, प्रभावी कायदे आणि जागरूकता वाढवणे आवश्यक आहे. ‘आंतरराष्ट्रीय सागरी संघटने’ने ‘सागरी कामगार करार, २००६’ या कायद्याची काटेकोरपणे कार्यवाही करावी आणि दोषी जहाज मालकांना काळ्या सूचीत टाकावे. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी आणि आर्थिक दंड आकारावा. भारतानेही या प्रश्नांवर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून खलाशांची सुरक्षा सुनिश्चित करता येईल.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)