भारताने बांगलादेशाच्या विरोधात आर्थिक शस्त्र वापरण्याची वेळ आली आहे !

बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये इंटरनेट सेवेविषयी महत्त्वपूर्ण करार करण्यात आला होता. बांगलादेशातील आताच्या महंमद युनूस सरकारने भारत आणि बांगलादेशातील महत्त्वपूर्ण ‘इंटरनेट करार’ रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचा परिणाम भारतातील ईशान्येकडील राज्यांवर होणार आहे.  

१. बांगलादेश सीमेवरून इंटरनेट पुरवल्याने भारताच्या ईशान्येकडील राज्यांना लाभ 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

‘बांगलादेश दूरसंचार नियामक आयोगा’ने वर्ष २०२३ मध्ये भारताच्या ईशान्येला इंटरनेट पुरवण्यासाठी त्यांच्या दूरसंचार मंत्रालयाकडून अधिकृतता मागितली. सिंगापूरपासून ‘बँडविड्थ’ वापरून भारत बांगलादेशाच्या अखौरा सीमेवरून ही सेवा पुरवली जाणार होती. ‘समिट कम्युनिकेशन्स’ आणि ‘फायबर होम कंपन्या’ या प्रदेशात इंटरनेट पुरवण्यासाठी ‘भारती एअरटेल’चा वापर करणार होत्या. ‘समिट कम्युनिकेशन्स’ आणि ‘फायबर होम कंपन्या’ ही दोन्ही आस्थापने हसीना सरकारकडून मोठे करार अन् परवाने (अनुज्ञप्ती) मिळवणार होत्या.

‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखली जाणारी भारतातील ईशान्येकडील राज्ये सध्या चेन्नईमधील ‘सबमरीन केबल्स’द्वारे (समुद्राच्या खालून घेतलेल्या वाहिन्या) सिंगापूरशी जोडलेली आहेत; परंतु चेन्नई आणि ईशान्येकडील अंतर सुमारे ५ सहस्र ५०० किलोमीटर असल्यामुळे इंटरनेटचा वेग अल्प होतो. प्रदेशाच्या भौगोलिक स्थानामुळे बांगलादेश सीमेवरून इंटरनेट सेवा पुरवल्याने भारताच्या ईशान्येकडील राज्यांना मोठा लाभ झाला असता.

२. बांगलादेश सरकारने करार रहित का केला ? 

युनूस यांच्या सरकारच्या नेतृत्वाखालील नियामकाने आता हा निर्णय रहित केला आहे. या व्यवस्थेमुळे भारत सुरक्षित आणि प्रबळ ‘इंटरनेट हब’ (मायाजालाचे केंद्र) झाले असते अन् बांगलादेश भविष्यात असे करू शकते, याची शक्यता कमी झाली असती. तसेच यामुळे ‘मेटा’, ‘गूगल’, ‘अकामाई’ आणि ‘ॲमेझॉन’ यांसारख्या ‘कंटेट डिलिव्हरी नेटवर्क’ (सी.डी.एन्.- माहितीची अदानप्रदान करणारी संकेतस्थळे) प्रदात्यांसाठी ढाका हा ‘पॉईंट ऑफ प्रेझेन्स (पीओपी)’ होण्याची शक्यताही कमी होईल. शेवटी भारतातील ‘बँडविड्थ’ भारतातच संपेल. बांगलादेश केवळ ‘ट्रान्झिट पॉईंट’ म्हणून काम करील, ज्याचा अधिक लाभ भारताला आणि बांगलादेशाला न्यून लाभ होईल म्हणून करार रहित केला गेला.

३. भारताची होणार आर्थिक हानी 

भारताच्या नकाशाकडे बघितले, तर बांगलादेशामधून प्रवेश करून जर इंटरनेट केबल टाकता आल्या किंवा ईशान्य भारताच्या वेगवेगळ्या राज्यांकडे बांगलादेशातून भूप्रवास किंवा नद्यातून प्रवास करता आला, तर याचा भारताला प्रचंड लाभ होतो; कारण अंतर फारच अल्प होते. यामुळे विकासालासुद्धा मोठी चालना मिळते आणि विकासाचा खर्चसुद्धा अत्यंत अल्प होतो. म्हणूनच भारत चितगावसारखे बंदर वापरून ईशान्य भारताचा बाकीच्या भारताशी व्यापार करत आहे; पण आता बांगलादेश सरकारने अशा प्रकारची वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भारताची आर्थिक हानी होणार आहे.

४. भारत-बांगलादेश यांचे एकमेकांशी व्यापार महत्त्व

बांगलादेशाला ‘इंडिया लॉक्ड’ देश म्हणतात; कारण या देशाची ९४ टक्के सीमा भारताला लागून आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात ४ सहस्र ३६७ किलोमीटर लांबीची सीमारेषा आहे आणि ती त्याच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या ९४ टक्के आहे. अशा परिस्थितीत सुरक्षा आणि व्यापार यांच्याविषयी बांगलादेश भारतावर अवलंबून आहे. त्याच वेळी बांगलादेश भारताला ईशान्येकडील राज्यांशी सहज आणि सुलभतेने व्यवहार करण्यासाठी साहाय्य करतो. भारताचा उर्वरित भाग ईशान्येकडील राज्यांशी जोडण्यात बांगलादेशाची भूमिका महत्त्वाची आहे. दोन्ही देशांच्या भौगोलिक स्थानामुळे बांगलादेश तांदूळ, गहू, कांदा, लसूण, साखर, कापूस, धान्य, शुद्ध पेट्रोलियम, इलेक्ट्रिक उपकरणे, प्लास्टिक आणि स्टील या सगळ्यांसाठी भारतावर अवलंबून आहे. बांगलादेशातला वस्त्रोद्योग हा भारतातून मिळणार्‍या कच्च्या मालावर अवलंबून आहे. बांगलादेशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये वस्त्रोद्योगाचे योगदान ११ टक्के आहे.

५. भारताने बांगलादेशातील सर्व प्रकल्प थांबवावेत ! 

भारत हा बांगलादेशाचा आशियातील दुसरा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. आशिया खंडात बांगलादेश भारताला सर्वाधिक निर्यात करतो. भारतातील वस्तू ज्या किमतीत बांगलादेशात पोचतात, त्या किमतीत इतर कोणताही देश बांगलादेशाला वस्तू देऊ शकत नाही. भारतातून बांगलादेशात मालाच्या वाहतुकीचा व्यय अल्प आहे. चीनमधून किंवा इतर देशांतून येणारा तोच माल अधिक महाग होईल. गेल्या १० वर्षांत भारताने बांगलादेशाला विविध विकास प्रकल्पांसाठी अब्जावधी डॉलर्सचे साहाय्य केले आहे. यामध्ये रस्ते, रेल्वे, जहाज बांधणी, बंदरे यांचा समावेश आहे. हे प्रकल्प आता थांबवले पाहिजेत.

६. आर्थिक शस्त्राचा वापर करणे आवश्यक !

भारताला बांगलादेशाची अनेक आघाड्यांवर हानी करता येऊ शकते. बांगलादेशाचे भारताशी असलेले संबंध आणखी बिघडले, तर त्याच्या निर्यातीवर परिणाम होईल. याचा परिणाम तेथे महागाईसह बेरोजगारीही वाढेल. भारतासमवेतच्या बिघडलेल्या संबंधांची किंमत चुकवणे बांगलादेशाला सोपे जाणार नाही. भारताने आर्थिक शस्त्राचा वापर करून बांगलादेशाला हिंदूंविरुद्धचा हिंसाचार आणि भारतविरोधी कारवाया थांबवण्यास भाग पाडले पाहिजे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.