रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

  • प्रसिद्ध श्री कनकादित्य मंदिर, श्री महाकाली मंदिर यांसह अनेक मंदिरांचा समावेश

  • महाराष्ट्रात आजपर्यंत २३२ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू !

पत्रकार परिषदेत बोलतांना १. श्री. सुनील घनवट, २. सद्गुरु सत्यवान कदम आणि जिल्ह्यातील विविध मंदिरांचे विश्‍वस्त

रत्नागिरी – महाराष्ट्र शासनाने वर्ष २०२० मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत वस्त्रसंहिता लागू केली आहे. इतकेच नव्हे, तर देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खासगी आस्थापने, शाळा -महाविद्यालये, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. त्याच धर्तीवर मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार आणि संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यात ११ ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ मंदिरांच्या विश्‍वस्तांनी त्या त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिली. ते येथील ‘हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह’च्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले की,

१. मंदिराचे पावित्र्यरक्षण आणि भारतीय संस्कृती यांचे पालन व्हावे, या उद्देशांनी मंदिरामध्ये भाविकांनी येतांना अंगप्रदर्शन करणारे उत्तेजक, तथा तोकडे कपडे घालून येऊ नये, तसेच भारतीय संस्कृतीचे पालन करून मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, अशा आशयाचे फलक जिल्ह्यातील २० मंदिरांच्या दर्शनी भागांत लावण्यात आले आहेत. राजापूर तालुक्यातील कशेळी येथील श्री कनकादित्य मंदिर, आडिवरे येथील श्री महाकाली मंदिर, राजापूर येथील श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर, रत्नागिरीतील स्वयंभू श्री काशी विश्‍वेश्‍वर देवस्थान, नाचणे येथील ग्रामदैवत श्री नवलाईदेवी मंदिर, पावस येथील श्रीराममंदिर, चिपळूणचे प्रसिद्ध ग्रामदैवत श्री जुना कालभैरव मंदिर, श्री विंध्यवासीनी मंदिर, मजरे-दादर (दसपटी) येथील श्री रामवरदायिनी मंदिर आदींसह जिल्ह्यातील ४७ मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

२. यापूर्वी जळगाव येथे ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ मध्ये मंदिरे अन् धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ झालेल्या राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’त उपरोक्त ठराव संमत करण्यात आला होता. त्याची कार्यवाही राज्यातील मंदिरांमध्ये करण्यात येत आहे.

३. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्‍वर मंदिर, महाराष्ट्रातील श्री घृष्णेश्‍वर मंदिर, वाराणसीचे श्री काशी-विश्‍वेश्‍वर मंदिर, आंध्रप्रदेशचे श्री तिरुपती बालाजी मंदिर, केरळचे विख्यात श्री पद्मानाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे श्री माता मंदिर, अशा काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून भाविकांसाठी सात्त्विक वस्त्रसंहिता लागू आहे. गोव्यातील बहुतांश मंदिरांसह बेसिलिका ऑफ बॉर्न जीझ्स आणि सी कैथ्रेडल या मोठ्या चर्चमध्येही वस्त्रसंहिता लागू आहे. महाराष्ट्र शासनाने ‘शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना ‘जीन्स पँट’, ‘टी-शर्ट’, भडक रंगांचे किंवा नक्षीकाम असलेले वस्त्र, तसेच ‘स्लीपर’ वापरण्यावर बंदी घातली आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही ‘तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे’, हे मान्य करून १ जानेवारी २०१६ पासून राज्यात वस्त्रसंहिता लागू केली. तसेच मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे, हे ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ असू शकत नाही. प्रत्येकाला ‘आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत ?’, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिकस्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. तेथे व्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

४. भारतीय वस्त्र पाश्‍चात्त्यांच्या तुलनेत अधिक सात्त्विक आणि सभ्यतापूर्ण आहेत. भारतीय वस्त्र परिधान केल्याने आपल्या संस्कृतीचा प्रचार-प्रसार होण्यासह तिच्याविषयी युवा पिढीमध्ये स्वाभिमानही जागृत होईल. पाश्‍चात्त्यांच्या तुलनेत पारंपरिक वस्त्र निर्मिती करणार्‍या उद्योगाला चालना मिळेल. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. मंदिरातील सात्त्विकता अधिक प्रमाणात ग्रहण करायची असेल, तर आपले आचरण आणि वेशभूषा सात्त्विक असायला हवी.