‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ – डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आदी नास्तिकतावाद्यांच्या हत्यांमागील बाहेर न आलेले सत्य उघड करणारे पुस्तक !

हे पुस्तक म्हणजे नास्तिकतावादी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम्.एम्. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांसंबंधी प्रकाशित माहिती अन् न्यायालयाचा आदेश यांविषयी एक विस्तृत संशोधन आहे. या पुस्तकातून वरील हत्यांच्या अन्वेषणातील  अनेक अज्ञात तथ्ये उघड केली आहेत. त्यामधून न्यायदानाचा अभाव आणि अन्वेषण यंत्रणांचे पूर्ण अपयश दिसून येते. या हत्यांच्या अन्वेषणात यंत्रणांवर राजकीय, तसेच बळाचा वापर जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे हे पुस्तक निर्देशित करते. अन्वेषण यंत्रणांनी राजकीय प्रभावाखाली काम करून या हत्यांचे अन्वेषण कशा प्रकारे भरकटवले, याविषयी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अधिकृत कागदपत्रांच्या आधारे अभ्यासपूर्ण विवेचन या पुस्तकात मांडण्यात आले आहे. या पुस्तकातील प्रकरणांची माहिती पुढे देत आहे.

‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ    

प्रकरण १

हे प्रकरण डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्याशी संबंधित आहे. यात सनातन संस्थेच्या कार्याचे विहंगावलोकन आहे, तसेच संस्थेच्या कार्यकर्त्यांवरील न्यायालयीन खटले आणि या प्रकरणातील वाद यांची सखोल माहिती देण्यात आली आहे.

डॉ. अमित थडानी

प्रकरण २

यात डॉ. दाभोलकर यांची हत्या, जादूटोणाविरोधी कायदा, पुणे पोलीस आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांनी केलेले अन्वेषण, कॉ. गोविंद पानसरे अन् एम्.एम्. कलबुर्गी यांची हत्या आणि त्यांच्या हत्यांचे अन्वेषण यांची माहिती देण्यात आली आहे.

प्रकरण ३

यात गौरी लंकेश यांची हत्या, तसेच वरील सर्व हत्यांच्या अन्वेषणाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

प्रकरण ४

शेवटचा भाग बचाव पक्षाचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने केलेल्या अटकेशी संबंधित आहे. यात हत्या आणि शस्त्रास्त्रे यांच्याविषयी गंभीर सूत्रांची खोलवर माहिती आहे. या सर्व हत्यांमध्ये आरोप असलेल्या हिंदुत्वनिष्ठांची अटक आणि अन्वेषण यांविषयी माहिती देण्यात आली आहे.

या पुस्तकातील सूत्रे पोलिसांचे अन्वेषण आणि न्यायालयीन यंत्रणा यांतील आवश्यक सुधारणांसाठी प्रभावी ठरतील. राजकारणी आणि शक्तीशाली संघटना यांच्या हस्तक्षेपाविना अन्वेषण तातडीने पूर्ण करून ‘पिंजर्‍यातील बंद पोपट’ या म्हणीप्रमाणे अवस्था झालेले हे खटले लवकरात लवकर सोडवणे आवश्यक आहे. कोणत्याही दबावाविना या हत्यांचे अन्वेषण आणि खटल्यांची सुनावणी पूर्ण व्हावी, जेणेकरून दोषींना शिक्षा अन् निरपराध्यांना संरक्षण मिळू शकेल.

– डॉ. अमित थडानी, मुंबई

‘अ‍ॅमेझॉन’च्या पुढील लिंकवरून पुस्तक खरेदी करा !

www.amazon.in/dp/817062357X?ref=myi_title_dp