काळगती ओळखून दूरदृष्टीने दिशादर्शन करणारे नित्यनूतन दैनिक ‘सनातन प्रभात’ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळे गेली २३ वर्षे दैनिक ‘सनातन प्रभात’ने त्याच्या उद्देशानुसार राष्ट्र अन् धर्म या विषयांना लक्ष्य ठेवूनच अत्यंत ध्येयनिष्ठ पत्रकारिता केली ! ‘भक्कम आर्थिक पाठबळाशिवाय वृत्तपत्र चालवणे’ ही अशक्य गोष्ट असतांना दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू असणे हा केवळ ईश्वरी चमत्कार आहे. ज्या वेळी हिंदूंवरील अत्याचारांविषयी बोलणेही पुष्कळ धाडसाची गोष्ट होती, त्या वेळेपासूनच हिंदूंवरील आक्रमणांविषयी अत्यंत निर्भिडपणे आणि स्पष्टतेने पुराव्यांसहित लिखाण करणारे एकमेव दैनिक ‘सनातन प्रभात’ होते ! ‘सनातन प्रभात’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केलेले हे विषय नंतरच्या काळात अन्य माध्यमांनी उचलून धरले ! यावरून ‘सनातन प्रभात’च्या दूरदृष्टीचा प्रत्यय वेळोवेळी वाचकांना आला !

सौ. रूपाली वर्तक

ज्या वेळी काश्मिरींवरील अन्यायाला वाचा फोडणारी वृत्ते किंवा भारतासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी होणार्‍या दंगलीची वृत्ते कुणीही देत नव्हते, तेव्हा दैनिक ‘सनातन प्रभात’मधून ती शक्य तेवढ्या विस्ताराने आणि सत्यनिष्ठतेने दिली गेली. ज्या वेळी ‘लव्ह जिहाद’ शब्दही कुणी उच्चारू धजत नव्हते, तेव्हापासून म्हणजे जवळजवळ गेल्या १२ वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ‘लव्ह जिहाद’च्या घटनांमुळे होणार्‍या हिंदूंच्या वंशविच्छेदाचे गांभीर्य लक्षात घेऊन अद्यापही सातत्याने जनजागृती करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ हे एकमेव दैनिक आहे ! ‘हलाल जिहाद’च्या संकटाची भयावहता जनमानसापर्यंत सर्वप्रथम पोचवून समांतर आर्थिक महासत्तेचा धोका दाखवून देणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ सर्वप्रथम आहे. २३ वर्षांपूर्वीपासून देवतांच्या विडंबनाविषयी समाजाला सांगून सातत्याने अशा घटना रोखण्यासाठी समाजाला प्रवृत्त करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’सारखे दुसरे कुठलेही वृत्तपत्र नाही ! मंदिरांच्या सरकारीकरणामुळे आतापर्यंत झालेली हानी अत्यंत सविस्तरपणे सांगून मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्याचा उद्घोष करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ एकमात्र आहे ! ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द उच्चारणेही दुरापास्त होते, त्या काळापासून ‘हिंदु राष्ट्राची संकल्पना’ मांडून त्याच्या स्थापनेच्या ध्येयाने कार्यरत असणारे एकमेवाद्वितीय दैनिक ‘सनातन प्रभात’ आहे ! नैसर्गिक संकटे आणि युद्ध यांनी युक्त असलेल्या आपत्काळाविषयी केवळ माहिती देऊन नव्हे, तर त्यासाठी करावयाच्या अनेकविध उपाययोजनांसहित समाजाला साहाय्य करणारे हे एकमेव दैनिक आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’ने गेल्या काही मासांत गड-दुर्गांवरील आक्रमण, खासगी बसगाड्यांकडून आकारली जाणारे अवैध तिकीटदर याविषयी वृत्तमालिका प्रसिद्ध करून जनजागृती केली. येत्या आपत्काळातही दैनिक ‘सनातन प्रभात’ अशाच प्रकारे समाजसाहाय्याचे व्रत चालू ठेवेल.

– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.४.२०२३)