साधना आणि भक्तीच येणाऱ्या भीषण तिसऱ्या महायुद्धापासून भक्ताचे रक्षण करील !

तिसरे महायुद्ध अतीभीषण असल्यामुळे आपण कितीही प्रयत्न केले तरी त्याला सामोरे जाता येणे अशक्य आहे. त्यामुळे याविषयी शारीरिक आणि मानसिक उपाययोजनांच्या जोडीला आध्यात्मिक स्वरूपाच्या उपाययोजनाही कराव्या लागतील.

१. आध्यात्मिक उपाययोजना म्हणजे साधनेचे प्रयत्न वाढवणे होय. साधना म्हणजे प्रतिदिन ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणे.

२. यामध्ये नामजप, सत्संग, सत्साठी त्याग करणे, भावजागृतीचे प्रयत्न आणि स्वभावदोष अन् अहं निर्मूलनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

३. धर्म आणि अधर्म यांच्या युद्धात जो देवाची भक्ती करतो, धर्माच्या बाजूने उभा रहातो, त्याचे देव रक्षण करतो. या नियमाप्रमाणे आपण भगवंताचे नाम मनापासून आणि भावपूर्ण घेऊन त्याची भक्ती करणे आवश्यक आहे. भगवंताला भक्ताचे रक्षण करावेच लागते. त्यासाठी आपण त्याचे भक्त बनणे आवश्यक आहे.

४. भक्त बनण्यासाठी भगवंताप्रतीची उत्कट भक्ती वाढवणे, प्रतिदिन तळमळीने साधनेचे प्रयत्न करणे, धर्माचरणाचे प्रयत्न वाढवणे आवश्यक आहे.

५. संकटकाळात केवळ भगवंताला शरण जाणेच आपल्या हातात असते. यासाठी ईश्वराचे सगुण रूप असलेले संत सुदैवाने पृथ्वीवर आहेत. या गुरुरूपी संतांना शरण जाऊन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करायला हवी.

६. गुरुरूपी संतांच्या कृपेचे कवच किंवा साधनेचे आध्यात्मिक बळ हेच वाईट काळात आपल्याला तारणार आहे, याविषयी श्रद्धा बाळगून भक्त बनण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

हिंदूंनो, भगवंताचे भक्त बना आणि येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्याचे बळ मिळवा !