आपत्काळाविषयी साधकांना पडलेले प्रश्‍न आणि त्यांवरील योग्य दृष्टीकोनांविषयी एका साधकाचे झालेले चिंतन !

येणार्‍या भीषण आपत्काळाविषयी साधकांना पडलेले प्रश्‍न आणि त्यांवर साधकांनी ठेवावयाच्या योग्य दृष्टीकोनांविषयी बेळगाव येथील श्री. मंदार विजय जोशी यांचे झालेले चिंतन !

१३ डिसेंबर २०२० या दिवशी प्रसिद्ध केलेल्या पहिल्या भागात भगवंताशी एकरूप होण्यासाठी गुर्वाज्ञेचे पालन करणे, शहर सोडून गावाकडे जाण्याने होणारे विविध लाभ लक्षात घेणे आवश्यक यांविषयी वाचले. या लेखाच्या पुढचा भाग येथे देत आहोत.

(भाग २)

भाग १. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/430723.html

परात्पर गुरु डॉ. आठवले

४. साधकांना साहाय्य करणार्‍या गावातील लोकांकडे भगवंत आपल्याला निश्‍चितच घेऊन जाईल !

श्री. मंदार जोशी

प्रश्‍न : पाच मासांत रहाते घर विकून गावाकडे नवे घर बांधणे शक्य आहे का ?

दृष्टीकोन : परात्पर गुरु डॉक्टर गेल्या काही वर्षांपासून ‘गावांकडे अधिक प्रसार करा’, असे सांगत होते. यावरून त्यांचे द्रष्टेपण लक्षात येते; परंतु आपण त्याकडे लक्ष दिले नाही. गावाकडे प्रसार झाला असता, तर तेथे असलेल्या साधकांचे आता साहाय्य झाले असते. आजही असे साधक गावात असतील. आपण भगवंताला शरण जाऊन प्रयत्न करूया. भगवंत आपल्याला त्यांच्यापर्यंत निश्‍चितच घेऊन जाईल. तशा अनुभूती काही साधक घेत आहेत.

५. आर्थिक स्थिती चांगली असलेल्या साधकांनी ४० ते ५० साधक एकत्र रहातील, अशा छोट्या आश्रमांची उभारणी केल्यास धन अल्प असलेल्या साधकांची तेथे व्यवस्था होऊ शकणे

प्रश्‍न : सर्वांचीच आर्थिक स्थिती चांगली नसते. मग ज्यांच्याकडे धन नाही, त्यांनी काय करायचे ?

दृष्टीकोन : सध्या काही साधकांची आर्थिक स्थिती चांगली आहे, ते गावाकडे घर बांधत आहेत. अशा साधकांनी स्वतःची घरे बांधून पुन्हा मायेत अडकण्यापेक्षा जर त्या सर्वांनी एकत्र येऊन न्यूनतम ४० ते ५० साधक एकत्र रहातील, अशी व्यवस्था एकाच छत्राखाली केली, म्हणजेच आपण आश्रम उभे केले, तर ज्यांच्याकडे धन अल्प आहे, असे साधक निःसंकोचपणे तेथे राहू शकतात. गावोगावी रहाणार्‍या साधकांनी एकत्र येऊन सांगितलेल्या आवश्यक त्या सुविधा असलेले छोटे-छोटे आश्रम उभे केले, तर कर्तेपणा आणि आसक्ती रहाणार नाही. (‘आपत्काळानंतर काय करायचे ?’, हा विचार नसेल.) भारतभर भगवंताचे अनेक आश्रम उभे होतील, जेथून चैतन्याचे प्रक्षेपण सर्वत्र होत राहील.

६. ‘आपत्काळानंतरची स्थिती कशी असणार आहे ?’, याची आता बुद्धीने कल्पना करणे अशक्य असल्याने वर्तमानात राहून गुर्वाज्ञापालन करणे आवश्यक असणे

प्रश्‍न : जर शहरातील रहाते घर न विकता तसेच ठेवले आणि आपत्काळानंतर पुन्हा काही वर्षांनी परत आल्यावर तेथे राहिले. असे करता येईल ना ?

दृष्टीकोन : अनेक शहरे आपत्काळात नष्ट होणार आहेत. ‘पहिली दोन्ही महायुद्धे लहान मुलांच्या खेळण्यासारखी वाटतील’, इतका भयानक विनाश होणार आहे. पृथ्वीवरील ६० टक्के लोकसंख्या नष्ट होणार आहे. या सर्व स्थितीत ‘आपले घर सुरक्षित राहील’, याची शाश्‍वती आपणांस आहे का ? ‘आपत्काळानंतरची स्थिती कशी असणार आहे ?’, याची आता बुद्धीने कल्पना करणे अशक्य आहे. त्यामुळे आपण ‘वर्तमानकाळात राहून आता भगवंत काय सांगत आहे ?’, त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करूया.

७. कालमाहात्म्यानुसार वर्ष १९९९ पासून सूक्ष्मातून आपत्काळाला आरंभ झाला असणे आणि साधकांचे सर्व त्रास परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःवर घेतलेले असणे

​साधकांनो, कालमाहात्म्यानुसार वर्ष १९९९ मध्येच सूक्ष्मातील वाईट शक्तींनी साधकांवर आक्रमणे केली. तेव्हाच आपत्काळाला (महायुद्धाला) आरंभ झाला आहे. तेव्हापासून आजपर्यंत त्या महायुद्धाची अल्पशी झळसुद्धा आपल्याला लागलेली नाही. ‘ती सर्व आक्रमणे आपल्या रक्षणासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतःवर घेतली आणि गेली कित्येक वर्षे ते शारीरिक यातना भोगत आहेत’, याची आपणा सर्वांना कल्पना आहे.

८. साधकांना आपत्काळाच्या तीव्रतेची जाणीव सतत करवून देऊनसुद्धा त्यांच्या मनात ‘भगवंत आणि माया यांतील काय निवडायचे ?’, याविषयी द्वंद्व माजलेले असणे

​साधकांनो, परात्पर गुरु डॉक्टरांनी गेली कित्येक वर्षे आपल्याला ‘साधना कशी करायची ?’, हे शिकवले आहे. येणार्‍या आपत्काळाविषयी सतत सांगितले आहे. तसे काही प्रसंग आपण आज अनुभवतसुद्धा आहोत. आपत्काळाच्या तीव्रतेची जाणीव सतत करवून देऊनसुद्धा आजही आपल्या मनात ‘भगवंत आणि माया यांतील काय निवडायचे ?’, याविषयी द्वंद्व माजले आहे; म्हणूनच कि काय, परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले होते, ‘‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो !’’

​साधकांनो, जीवनमुक्तीच्या मार्गावर गेली काही वर्षे आपण साधनेचा अभ्यास केला. आता प्रवेश परीक्षा आहे. पुढील ३ – ४ वर्षे प्रत्यक्ष परीक्षा आणि नंतर निकाल आहे, जो भगवंताने (परात्पर गुरु डॉक्टरांनी) आताच सांगून आपल्या सर्वांना आश्‍वस्त केले आहे. मग आपण मागे का रहायचे ?

‘हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य कालमाहात्म्यानुसार होणारच आहे; पण या कार्यात जे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले, दैनिक ‘सनातन प्रभात’, २४.९.२०२०)​

‘सर्व साधकांच्या मनातील विविध प्रश्‍नांचे काहूर, तसेच मन आणि बुद्धी यांवर आलेले आवरण दूर करून सर्वांना जीवनमुक्त होण्यासाठीचा निर्णय घेण्याची सद्बुद्धी द्या’, हीच विनम्र प्रार्थना !

(क्रमशः पुढच्या रविवारी)

॥ श्रीगुरुचरणार्पणमस्तु ॥’

– श्री. मंदार विजय जोशी, बेळगाव, कर्नाटक. (२५.९.२०२०)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

भाग ३ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/435149.html