ओबीसींच्या आरक्षणाला हात लावाल, तर खबरदार ! – फडणवीस यांची चेतावणी

मुंबई – ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावाल, तर खबरदार, आम्ही रस्त्यावर उतरू, अशी चेतावणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिली आहे. भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असा ठराव मंत्रीमंडळात करा. ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी स्वीकारला जाणार नाही, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिले, त्याच वेळी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला संरक्षण देण्याचे कलमही आम्ही या कायद्यात घातले आहे.

‘ओबीसी महामंडळाच्या खात्यात २०० कोटी रुपये आहेत; पण राज्य सरकारने या महामंडळातील सगळ्या योजना बंद केल्या आहेत’, असा आरोपही फडणवीस यांनी या वेळी केला.