
मुंबई, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – महाराष्ट्रातील सागरांमध्ये होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र अमंलबजावणी कक्ष स्थापन केला आहे. मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी मंत्रालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन याविषयीची अधिकृत घोषणा केली. कसाबसह मुंबईमध्ये आलेले आतंकवाद्यांनी सागरी मार्गानेच मुंबईमध्ये प्रवेश केला. त्यामुळे देशासाठी घातक आसलेली सागरी किनार्यावरील अवैध बांधकामेही हटवण्यात येतील. याविषयी अधिकार्यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे, अशी माहिती नितेश राणे यांनी या वेळी दिली.
ते म्हणाले, ‘‘अवैध मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारीला धोका निर्माण झाला आहे. कोकणातील मासेमार अवैध मासेमारी रोखण्यासाठी कायदेशीर लढा देत आहेत. महाराष्ट्रात होणारी अवैध मासेमारी रोखण्याविषयी सागरी किनारा असलेल्या कोकणातील ७ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मत्स्य अधिकारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत असणार आहेत. अन्य राज्यांतून ‘ट्रोलर’द्वारे, तसेच ‘एल्.ए.डी. लाईट्स’द्वारे होणारी अवैध मासेमारी यापुढे रोखण्यात येईल.’’
नोव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत एकूण ९७७ अनधिकृत नौकांवर कारवाई करण्यात आली. या नौकांपासून ५ कोटी ८७ लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती मत्स्योद़्योग आणि बंदरे विकास विभागाकडून देण्यात आली.
देवगड येथे मत्स्य व्यवसाय महाविद्यालय होणार !
कोकणात मत्स्यव्यवसाय महाविद्यालयाची स्थापना केली जाणार असून देवगडमध्ये वाघोटन येथे त्याची जागा निश्चित केली आहे. जून २०२५ पासून महाविद्यालय कार्यरत असेल. यासाठी अर्थसंकल्पामध्ये १०० कोटी रुपये निधी संमत करण्यात येणार आहे. हे महाविद्यालय दापोली कृषी विद्यापिठाशी संलग्न असेल. याविषयी कृषीमंत्र्यांसमवेत चर्चाही झाली आहे, असेही ते म्हणाले.