‘मॉलीवूड’नंतर (मल्याळम् चित्रपटसृष्टीनंतर) आता केरळच्या राजकारणातही ‘मी टू’ असल्याचे उघड !

(टीप : ‘मी टू’ म्हणजे लैंगिक शोषणाला वाचा फोडण्यासाठी जगभरात चालू असलेली मोहीम !)

केरळमधील काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सिमी रोझबेल जॉन

केरळमधील ‘मॉलीवूड’ या चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्रींविषयी घडलेली ‘मी टू’विषयीच्या अनेक प्रकरणानंतर केरळच्या राजकारणातही अशी प्रकरणे दिसून आली आहेत. केरळमधील काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सिमी रोझबेल जॉन यांनी आरोप केला, ‘त्यांनी व्ही.डी. सथीसन यांनी केलेली मागणी मान्य न केल्याने तिचे पक्षातील प्राथमिक सदस्यत्व रहित करण्यात आले.’ त्यांनी व्ही.डी.सथीसन यांच्यावर ‘कास्टिंग काऊच’चा (लैंगिक सुखाची मागणी करून त्या बदल्यात एखादे पद देणे) आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, ‘मी त्यांच्या ‘गुड बुक’मध्ये (मर्जीमध्ये) जाऊ शकले नाही आणि त्यांना खुश करू शकले नाही. केरळ काँग्रेसमध्ये ‘कास्टिंग काऊच’चा प्रकार चालू असून पक्षातील नेते यात सहभागी आहेत’, असा आरोप त्यांनी केला आहे. ‘काँग्रेस पक्षातील अनेक महिलांना चित्रपट उद्योगातील ‘कास्टिंग काऊच’प्रमाणे शोषणाचा सामना करावा लागत आहे’, असे त्यांचे म्हणणे आहे.

१. ‘काँग्रेस’ आणि ‘मार्क्सवादी साम्यवादी पक्ष’ यांमध्ये झालेले लैंगिक शोषणाचे अपप्रकार

सिमी जॉन यांनी पक्षातील काही महिला नेत्यांची नावे उघड घेतली आहेत, ज्यामध्ये पद्मजा वेणुगोपाळ यांचेही नाव आहे. ‘पद्मजा वेणुगोपाळ या काँग्रेस पक्षातील ‘मी टू’ (कास्टिंग काऊच) मध्ये फसल्या आहेत’, असा दावा सिमी यांनी केला आहे. केरळमध्ये पहिल्यांदाच ‘मी टू’ची प्रकरणे उघड झाल्याने केरळमधील काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. सौरऊर्जा घोटाळा प्रकरणातील आरोपी सरिता नायर यांनी ‘काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाळ आणि हैबी एडन यांनी माझा छळ केला’, असा आरोप केला आहे. वेणुगोपाळ यांच्याविषयी नायर यांनी अत्यंत कठोर शब्दांत टीका केली असून एडन यांचा उल्लेख ‘चॉकलेट हिरो’ (तरुणींचे आवडते नेते) असा केला आहे, तसेच २ वेळा काँग्रेस पक्षाच्या आमदार असलेल्या शोभना जॉर्ज यांना त्यांच्या नेत्यांनी सोडचिठ्ठी दिल्याने त्यांना ‘मार्क्सवादी साम्यवादी पक्षा’मध्ये जावे लागले.

‘मार्क्सवादी साम्यवादी पक्षामध्ये अनेक अनैतिक संबंध राखणारी सर्वाधिक नावे आहेत’, असे विधान या पक्षाच्या ‘सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन’च्या सचिव व्ही.बी. चेरियन यांनी केले आहे. या पक्षातील शोरनूर येथील माजी आमदार पी.के. ससी यांना ‘आधुनिक दिवसांतील रोमिओ’, अशी प्रसिद्धी मिळाली होती आणि ते आपल्या पलायनवादासाठी प्रसिद्ध होते. या आमदाराचे नाव कायम लैंगिक अत्याचाराच्या विषयात पुढे आल्याने या पक्षातील अनेकांनी ‘ससी यांची केरळ राज्य पर्यटन विकास खात्यातील पदावरून हकालपट्टी करण्यात यावी’, अशी मागणी केली होती. ‘सरिता नायर विरुद्ध इझहवा यांच्यामधील संघर्षाचा तो परिणाम असावा’, असे ससी यांच्याशी संबंधित स्रोतांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री व्ही.एस्. अच्युतानंद यांच्या सचिव म्हणून काम केलेल्या के.एम्. शाजहान यांनी ‘द पायोनियर’ या वृत्तपत्राला सांगितले की, ‘मुकेश’ या चित्रपट अभिनेत्यावर एका अभिनेत्रीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करून खटला प्रविष्ट (दाखल) केला होता आणि तो खटला पुष्कळ कुप्रसिद्ध आहे. दक्षिण भारतातील प्रमुख अभिनेत्री असलेली मुकेश याची पत्नी सरिता हिने ‘दूरदर्शन’वर एका मुलाखतीत ‘ती गरोदर असतांना मुकेश तिला प्रतिदिन लाथा मारत होता’, असे सांगितले. मुकेशची पत्नी म्हणून तिचा हा अनुभव सांगताना तिला पुष्कळ रडू येत होते. सरिता हिला मुकेशने घराबाहेर काढले. त्यामुळे ‘निवडणूक लढवण्यासाठी मार्क्सवादी साम्यवादी पक्षाला चांगला उमदेवार मिळाला नाही, याविषयी मला त्यांची दया येते’, असे शाजहान यांनी म्हटले आहे.

२. राजकारण आणि चित्रपटसृष्टी या दोन्ही क्षेत्रांमध्ये लैगिंक शोषणामुळे होत आहे हानी !

श्री. कुमार चेल्लप्पन

सिमी जॉन यांनी केलेल्या विधानानंतर सथीसन यांचे वर्ष २०२६ मध्ये राज्याचा भावी मुख्यमंत्री बनण्याची संधी अंधुक होत आहे. त्यांना निवडणुकीमध्ये रमेश चैन्नीथला, शशी थरूर, के. मुरलीधरन, वेणुगोपाळ आणि के. सुधाकरन हे बलवान स्पर्धक आहेत. वर्ष २००१ ते २००६ ए.के. अँथनी आणि ओमेनन चंडी यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीची पुष्कळ हानी झाली. याला कारण म्हणजे उद्योगमंत्री आणि ‘मुस्लीम लीग’चे नेते पी.के. कुन्हालीकुंटी यांच्यावर कोझिकोडे येथील एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप होऊन पुष्कळ प्रमाणात टीका झाली. तरुण आणि मध्यमवयीन महिलांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपांपासून राज्यातील भाजपचे नेतेही सुटलेले नाहीत. राजकारण आणि चित्रपटसृष्टी या दोन्ही क्षेत्रांमध्ये शय्यासोबत मागणारी अशा प्रकारची विचित्र माणसे आहेत. भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी लिहिलेल्या ‘द इनसाईडर’ या कादंबरीमध्ये त्यांनी याविषयी दृष्टीकोन दिला असून त्यांनी त्यांच्या जीवनातील प्रत्यक्ष प्रसंग सांगितले आहेत.

– श्री. कुमार चेल्लप्पन, ज्येष्ठ पत्रकार, कोची, केरळ.