डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संस्कृतप्रेम !

‘भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती ।’, असा संस्कृत भाषेचा लौकिक आहे. हा लौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवरही मान्यता पावलेला आहे. जागतिक कीर्तीचे भाषातज्ञ सर विल्यम जोन्स यांनी २४० वर्षांपूर्वी कोलकात्यामध्ये एक युगप्रवर्तक भाषण केले. या भाषणात त्यांनी म्हटले, ‘संस्कृत भाषेची प्राचीनता काय असायची असेल ती असो, ती भाषा आश्चर्यकारक आहे. ग्रीक भाषेहून बांधेसूद, लॅटिनहून समृद्ध आणि या दोहोंहून प्रौढ अन् परिष़्कृत, तरीही क्रियापदांचे धातू अन् व्याकरणाची रूपे पहातांना योगायोगाने संभवणार नाही, इतकी संस्कृत भाषेशी जवळीक दिसते. ही इतकी दृढ आहे की, या तीनही भाषांचे परीक्षण करतांना भाषाशास्त्रज्ञांना या भाषा कोणत्या तरी एकाच भाषा कुळातून आल्या आहेत, असे मानण्यावाचून गत्यंतरच रहात नाही.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संस्कृतप्रेम हे काहीसे दुर्लक्षितच राहिले आहे, असे वाटते. त्यांनी संस्कृत भाषेसाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या संस्कृत कार्याचा आढावा घेणारा हा लेख येथे देत आहे…

१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘संस्कृत ही राष्ट्रभाषा असावी’, अशी केली होती मागणी !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तीमत्त्वाविषयी फारसा प्रकाशात न आलेला एक भाग, म्हणजे त्यांचे संस्कृत भाषेवरील प्रेम आणि श्रद्धा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संस्कृतचे अभ्यासक होते आणि त्यांनी ‘संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी’, म्हणून प्रयत्नही केलेले होते, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. ‘संस्कृत ही राष्ट्रभाषा असावी’, अशी मागणी करणार्‍यांमध्ये श्रीप्रकाश, डॉ. सी.व्ही. रमण, डॉ. बाळकृष्ण केसरकर, कृष्णम्माचारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘अनुच्छेद ३१०’ (पुनर्मांडणीनुसार ‘अनुच्छेद ३४३’) यामध्ये ‘एक संघराज्याची शासकीय भाषा संस्कृत असावी’, अशी मागणी केलेली होती. संस्कृत भाषेविषयी बाबासाहेबांना प्रेम होते, हे त्यांच्या साहित्यावरून आणि ‘संविधान सभे’त केलेल्या भाषणांवरून दिसते. थोर विचारवंत दत्तोपंत ठेंगडी यांच्या ‘सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि बाबासाहेब’, या पुस्तकात ‘बाबासाहेबांचे संस्कृतचे ज्ञान अन् तत्कालीन संदर्भ’, यांविषयी लिहिले आहे.

२. ‘संस्कृत राष्ट्रभाषा व्हावी’, अशी मागणी करणार्‍यांमध्ये हिंदीभाषिक नसलेल्या राज्यांचा समावेश ! 

संस्कृत भाषेकडे बघण्याचा बर्‍याच जणांचा दृष्टीकोन वेगळा असतो. संस्कृत ही कठीण भाषा आहे किंवा काही समाजापुरतीच ती मर्यादित आहे, त्याच्यापलीकडे जाऊन संस्कृत शिकून काय मिळणार ?, अशी (नकारात्मक) दृष्टी आपल्याला दिसते; पण, ‘संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी’, या प्रस्तावास पाठिंबा देणार्‍या व्यक्ती जर पाहिल्या, तर हे सर्व अपसमज दूर होतील. तत्कालीन परराष्ट्रमंत्री डॉ. बी.व्ही. केसकर, जी.एस्. गुहा (त्रिपुरा-मणीपूर), सी.एम्. पूनाचा (कर्नाटक), व्ही. रामैया (पुदुकोट्टै, तमिळनाडू), चेन्नई येथील टी.टी. कृष्णम्माचारी, व्ही.आय. मुनिस्वामी पिल्लई, कल्लूर सुब्बा राव, व्ही.सी. केशव राव, डी. गोविंद दास, पी. सुब्बारायन, डॉ. व्ही. सुब्रमण्यम आणि दाक्षायनी वेलायुधन यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. ही सगळी नावे पाहिली, तर ती मुख्यतः हिंदीभाषिक नसलेल्या राज्यांतील आणि आजच्या तमिळनाडूतील आहेत. आजही हिंदी ही राष्ट्रभाषा मानावी का ? याविषयी वाद आहे; पण हा वाद संस्कृतविषयी नाही. तेलुगु, कन्नड, तमिळ आणि मल्याळम् या द्रविडी भाषा बोलणार्‍यांचा हिंदीला विरोध असतो; पण संस्कृतला नाही. ‘संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी’, हा प्रस्ताव त्या वेळीच संमत झाला असता, तर संस्कृतमधील ज्ञानाचे भांडार देशाला खुले तर झाले असतेच; पण भाषेच्या नावावर पुढे उसळलेला आगडोंबही रोखता आला असता. दुर्दैवाने तत्कालीन राजकारणात संस्कृतचा पराभव झाला.

३. डॉ. आंबेडकर यांनी संस्कृत राष्ट्रभाषेच्या प्रस्तावाचे समर्थन करण्यामागील कारणमीमांसा

वास्तविक बाबासाहेब विद्यार्थी असतांना त्यांना संस्कृत शिकण्याची इच्छा होती; मात्र तत्कालीन शिक्षकांनी त्यांना संस्कृत शिकवण्यास नकार दिला होता. या संदर्भात आचार्य अत्रे यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एकदा म्हटले होते, ‘मला संस्कृत शिकण्याची इच्छा होती; पण शिक्षकांनी नकार दिल्यामुळे मला पर्शियन शिकावी लागली. पुढे जर्मनीला बॉन विद्यापिठात गेल्यानंतर त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले.’

अशा स्थितीत बाबासाहेब संस्कृतचा आग्रह का धरत होते ? हे पहाणे महत्त्वाचे आहे. भारताला भाषिक अस्मितेच्या लढायांपासून मुक्त करणे, हा त्यांचा उद्देश होता. ‘भाषा आधारित राज्यांमुळे नवीन राष्ट्रीयता निर्माण होण्याचा धोका आहे,’ अशी सावधानतेची चेतावणी त्यांनी ‘थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स’ या पुस्तकात दिलेला होता, तसेच ‘संस्कृतसारखी प्राचीन भाषा ही ज्ञानाचे समृद्ध भांडार आहे’, हेही त्यांना ठाऊक होते. हिंदूंप्रमाणेच बौद्ध आणि जैन पंथांतील बहुतांश प्राचीन ज्ञान हे संस्कृतमध्येच आहे. ‘आर्य आणि अनार्य’, ‘उच्च आणि कनिष्ठ जाती’, या संबंधातील युरोपियन विद्वानांच्या प्रतिपादनाचा खरेपणा शोधण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत शिकायचे होते. पुढे त्यांनी संस्कृत शिकून हे सिद्धांत नाकारले.

डॉ. आंबेडकर यांच्यासारख्यांनी संस्कृत राष्ट्रभाषेच्या प्रस्तावाचे समर्थन केले. तेव्हा त्यामागे आणखी एक तर्क होता. तो म्हणजे अनेक भाषा असलेल्या देशात एकच एक भाषा संपूर्ण देशाची भाषा व्हायची असेल, तर ती निष्पक्ष असणे आवश्यक आहे. देशातील राज्यांची स्थापनाही भाषेच्या आधारावर झालेली, म्हणजेच प्रत्येक प्रांताची स्वतःची एक मातृभाषा असणार. याचाच अर्थ असा की, कोणतीही एक भाषा राष्ट्रभाषा झाली, तर तिचा मातृभाषा असलेल्या नागरिकांना स्वाभाविक लाभ होणार आणि दुसर्‍या भाषिकांना त्रास. हिंदीविषयी नेमके हेच घडले. या परिस्थितीत संस्कृत ही एकमेव अशी भाषा होती की, तिला स्वतःचा कोणताही प्रादेशिक प्रांत नव्हता. ती कुणाचीही मातृभाषा नव्हती आणि सर्वांसाठी सारखीच होती. संस्कृत ही केवळ एका समाजाची भाषा मानण्यात आली, तरी ती त्यांच्यासाठी धार्मिक कार्यापुरतीच मर्यादित होती, व्यवहारात तिचा वापर नव्हताच. १०० टक्के ब्राह्मण संस्कृत जाणणारे तेव्हाही नव्हते आणि आताही नाहीत. म्हणूनच बाबासाहेबांनी संस्कृतला मनःपूर्वक पाठिंबा दिला होता. इतकेच नाही, तर ‘ऑल इंडिया अनुसूचित जाती फेडरेशन’च्या कार्यकारिणीने या संबंधात प्रस्ताव संमत करावा’, अशी सूचनाही त्यांनी केली होती. संस्कृतच्या उत्थानाचा डॉ. बाबासाहेबांनी आटोकाट प्रयत्न केला.

४. डॉ. आंबेडकर यांनी संस्कृत राष्ट्रभाषा होण्यासाठी पाठिंबा दिल्यावर पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी प्रतिप्रश्न करून उत्तर देणे

डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटना सिद्ध करतांना वेगवेगळे ग्रंथ अभ्यासले होते. यामध्ये त्यांनी ‘भरद्वाज’, ‘याज्ञवल्क्य’ आदी स्मृतीग्रंथाचाही अभ्यास केला. बाबासाहेबांची जी प्रतिमा त्यांच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी उभी केली होती वा आहे, त्यात त्यांचे हे संस्कृतप्रेम बसत नव्हते. म्हणूनच त्यांनी ‘संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी’, या ठरावाला पाठिंबा दिला, तेव्हा ‘पीटीआय’च्या (‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’या वृत्तसंस्थेच्या) प्रतिनिधीने त्यांना ‘हे खरे आहे का ?’, असा प्रश्न विचारला होता. त्यावर ‘का नाही ? संस्कृतमध्ये काय दोष आहे ?’, असा प्रतिप्रश्न केला होता.

५. डॉ. आंबेडकर यांचे संस्कृत भाषा ‘राष्ट्रभाषा’ करण्याचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करूया !

आज देशात असणार्‍या अनेक अनुत्तरित प्रश्नांप्रमाणे ‘संस्कृत राष्ट्रभाषा व्हावी’, हा प्रश्न अनुत्तरित आणि दुर्लक्षित आहे. संस्कृत या सर्वांना एकसंध ठेवणार्‍या भाषेला ‘राष्ट्रभाषा’ घोषित केली असती, तर महाराष्ट्र-कर्नाटक भाषिक वाद, दक्षिण भारतातील भाषिक वाद राहिला नसता. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील लेखक आणि प्राध्यापक प्र.शं. जोशी यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी डॉ. आंबेडकर यांच्यावर संस्कृत श्लोकांच्या स्वरूपात ‘भीमायनम’ हे चरित्रकाव्य लिहिले आहे. ‘डॉ. आंबेडकर यांना संस्कृत भाषेविषयी किती आदर होता आणि संस्कृत भारताची राष्ट्रभाषा व्हावी’, यासाठी डॉ. आंबेडकर यांनी कसे प्रयत्न केले, ते यात वाचायला मिळते. या ग्रंथातील डॉ. आंबेडकरांच्या संस्कृत ज्ञानाची माहिती देणारे श्लोक ‘महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळा’च्या इयत्ता १०वीच्या संस्कृत (संपूर्ण) या पाठ्यपुस्तकात देण्यात आले होते. भाषांमध्ये मुख्य असणारी, मधुरा, सर्व ज्ञान सामावून घेतलेली अशी संस्कृत भाषा ही डॉ. आंबेडकरांची प्रियतम भाषा होती. त्यांचे संस्कृत भाषा राष्ट्रभाषा करण्याचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करायचा निर्धार आपण करायला हवा.

– वसुमती करंदीकर (साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  साधला संस्कृतमध्ये संवाद !

तत्कालीन पश्चिम बंगालचे खासदार पंडित लक्ष्मीकांत मैत्र यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी’, या विचाराला पाठिंबा दिला. पंडित मैत्र यांना डॉ. आंबेडकर यांच्या संस्कृत भाषेच्या ज्ञानाविषयी खात्री वाटत नव्हती. म्हणून पंडित मैत्र यांनी त्यांच्या काही शंका संस्कृतमधूनच डॉ. आंबेडकर यांना विचारल्या आणि डॉ. आंबेडकर यांनी संस्कृतमधूनच त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. हा संवाद ऐकून राज्यघटना समितीच्या बैठकीतील सर्व सदस्य आश्चर्यचकित झाले. ही बातमी तेव्हाच्या काही प्रमुख वृत्तपत्रांतही प्रसिद्ध झाली होती.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्कृत अभ्यासाविषयीचे मिळणारे संदर्भ

‘हिंदुस्थान’ वृत्तपत्राच्या १२ सप्टेंबर १९४९ या दिवशीच्या अंकात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संसदेमध्ये संस्कृतमध्ये संवाद साधत असत’, याचा संदर्भ मिळतो. ‘द स्टेट्समन’ या वृत्तपत्रामध्येही ११ सप्टेंबर १९४९ या दिवशीच्या अंकात डॉ. आंबेडकर यांच्या संस्कृत ठरावाचा संदर्भ आहे. दै. ‘आज’ (हिंदी) (१५ सप्टेंबर १९४९), दैनिक ‘द लीडर (इंग्रजी), अलाहाबाद’ (१३ सप्टेंबर १९४९), दैनिक ‘हिंदू’ (११ सप्टेंबर १९४९) यांमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या संस्कृत ठरावाचे वृत्त पहायला मिळते.

– वसुमती करंदीकर

संपादकीय भूमिका 

‘संस्कृत राष्ट्रभाषा व्हावी’, यासाठी पुढाकार घेणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुठे ? आणि कुठे या भाषेला ‘मृत’ म्हणणारे जवाहरलाल नेहरू अन् आजचे कथित पुरोगामी ?