सामाजिक माध्‍यमातून जातीय-धार्मिक तेढ निर्माण केल्‍यास ५ वर्षांचा कारावास

‘व्‍हॉट्‌सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन’ होणार साक्षीदार

सातारा येथील शांतता समितीच्‍या बैठकीमध्‍ये मार्गदर्शन करतांना शाहूपुरी पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे आणि इतर

सातारा, १२ जून (वार्ता.) – सामाजिक माध्‍यमांतून किंवा एखाद्या ठिकाणाहून धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण होईल, असे वक्‍तव्‍य अथवा ‘पोस्‍ट’ प्रसारित करण्‍याचे प्रमाण वाढले आहे. असे जर कुणी करत असेल, तर भारतीय दंड विधान कलम १५३ अ, २९५ अ, ५०५ आणि ५०७ या कलमांतर्गत गुन्‍हा नोंद करण्‍यात येईल. यामुळे संबंधितांना ३ ते ५ वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो. त्‍यामुळे नागरिकांनी विशेषतः युवकांनी अशा गोष्‍टींपासून दूर रहावे, असे आवाहन शाहूपुरी पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी केले आहे. १० जून या दिवशी शाहूपुरी पोलीस ठाण्‍यामध्‍ये शांतता समितीची बैठक घेण्‍यात आली. तेव्‍हा ते बोलत होते. या बैठकीला शहरातील प्रतिष्‍ठित नागरिक, नगरसेवक आणि शांतता समितीचे सदस्‍य उपस्‍थित होते.

या वेळी पोलीस निरीक्षक पतंगे म्‍हणाले की, सामाजिक शांतता आणि सुव्‍यवस्‍था बिघडवण्‍याचा काही अपप्रवृत्तींकडून जाणीवपूर्वक प्रयत्न चालू असल्‍याचे चित्र संपूर्ण महाराष्‍ट्रात आहे. सर्व काही सुरळीत चालू असतांना असा प्रकार होणे सुसंस्‍कृत महाराष्‍ट्राला परवडणार नाही. ज्‍यामुळे नवउद्योजक महाराष्‍ट्रात उद्योग चालू करायला पुढे येणार नाहीत आणि त्‍यातून बेरोजगारी आणखी वाढू शकते, असे तज्ञांचे मत आहे. यासाठी प्रत्‍येकाने स्‍वत:च्‍या कुटुंबाचा आणि भविष्‍याचा विचार करणे आवश्‍यक आहे.

…..तर थेट गुन्‍हा नोंद होईल !

कोणतीही निश्‍चिती न करता सामाजिक माध्‍यमांतून संदेश किंवा ध्‍वनीचित्र संदेश प्रसारित करणार्‍यांवर पोलिसांकडून थेट गुन्‍हा नोंद करण्‍यात येतो. युवकांनी अफवा किंवा जातीय धार्मिक तेढ निर्माण होईल, अशा गोष्‍टी सामाजिक प्रसारमाध्‍यमांतून पुढे पाठवू नयेत.

संपादकीय भूमिका : 

‘सामाजिक अपप्रवृत्ती’ असा उल्लेख करणारे पोलीस प्रशासनही मुसलमानांचा उल्लेख करणे टाळते, हे लक्षात घ्‍या