वारीच्या काळात मुबलक पाणी, तसेच अन्य सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न ! – सुनील वाळुजकर, उपमुख्याधिकारी, नगर परिषद, पंढरपूर

दैनिक ‘सनातन प्रभात’ची कार्तिकी वारी विशेष वृत्त मालिका

भाविकांना चंद्रभागेचे दर्शन घडवणार्‍या विशेष नावा

पंढरपूर – कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपूर नगर परिषदेचे ३५० कर्मचारी आणि अन्य १ सहस्र कर्मचारी असे १ सहस्र ३५० हून अधिक कर्मचारी स्वच्छता, तसेच अन्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नरत आहेत. नगर परिषदेची कायमस्वरूपी ५ सहस्र शौचालये असून वारकर्‍यांना पिण्याचे पाणी देण्यासाठी किमान ५० टँकरची सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली आहे. वारीच्या काळात ४ दिवस चंद्रभागा नदीवर वारकर्‍यांना केवळ भजन, कीर्तन असे आध्यात्मिक कार्यक्रम करण्यासाठी आम्ही अनुमती दिली आहे. या कालावधीत तेथे अन्न शिजवण्याची मात्र अनुमती नाही, अशी माहिती पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुकर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने उभारण्यात आलेले आपत्कालीन मदत आणि प्रतिसाद केंद्र

१. वारीच्या काळात ज्या ज्या मठांकडून, तसेच वारकर्‍यांच्या दिंड्यांकडून पाण्याची मागणी येईल, त्यांना आम्ही पाणी देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर आम्ही २ वेळा पाणी देतो.

२. शहरात १३ ठिकाणी वाहनतळांची सोय करण्यात आली असून नागरिक, भाविक, वारकरी यांनी त्यांची वाहने त्याच ठिकाणी लावावीत, तसेच स्वयंशिस्त पाळावी.

३. मंदिर परिसरात असणारे फेरीवाले, तसेच रस्त्यांवरील अतिक्रमण यांसाठी विशेष पथक नियुक्त केले आहे. हे पथक सतत अतिक्रमणांवर लक्ष ठेवून आहेत.

४. नदीपात्र परिसरात प्रत्येक घाटावर स्वतंत्र दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या वतीने नदीच्या तीरावर करण्यात आलेली सुलभ शौचालय यांची व्यवस्था

भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची २४ घंटे व्यवस्था

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेतील भाविकांसाठी करण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दर्शन घेणार्‍या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून येथे आमचे कर्मचारी दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना २४ घंटे पाणी देतात. याच समवेत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने आपत्कालीन साहाय्य आणि प्रतिसाद केंद्र उभारण्यात आले आहे.

श्री विठ्ठलाप्रतीच्या श्रद्धेमुळेच भाविकांना दर्शन घेण्यासाठी घंटोन्घंटे उभे रहाण्याची शक्ती !

कार्तिकी वारी जशी जवळ येत आहे, तशी वारकर्‍यांची संख्या वाढत असून दर्शनरांगही वाढत आहे. असे असले, तरी रांगेतील वारकरी आनंदात, भजन गुणगुणत, टाळ वाजवत श्री विठ्ठलाचे गुणगाण करत मार्गक्रमण करत असतात. श्री विठ्ठलाप्रती असलेली असीम श्रद्धाच वारकरी आणि भाविक यांना दर्शन घेण्यासाठी घंटोन्घंटे उभे रहाण्याची शक्ती देते.

यंदा वारकर्‍यांची गर्दी सर्व उच्चांक मोडणार !

कोरोनाचा काळ सरल्यानंतर वारकर्‍यांना कार्तिकी वारीची पंढरपुरात खेचून आणत आहे. अवघे पंढरपूर ‘माऊली’मय झाले आहे. यंदा वारकर्‍यांची संख्या ८ ते १० लाखांच्या घरात जाऊन सर्वच उच्चांक मोडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.