पुणे येथील ‘महिला आयोग आपल्या दारी’च्या ‘जनसुनावणी’मध्ये १०४ महिलांच्या तक्रारी !

पुणे – महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाच्या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ‘जनसुनावणी’ कार्यक्रमामध्ये १०४ महिलांनी तक्रारी नोंदवल्या. आयोगाने ४ ठिकाणी तक्रारी ऐकून घेण्याची व्यवस्था केली होती.

या वेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, ‘‘ग्रामीण भागातील महिलांना मुंबईतील कार्यालयामध्ये येऊन तक्रार करणे, सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित रहाणे हे आर्थिकदृष्ट्या, तसेच इतर कारणांनी शक्य होत नाही. त्यांच्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम पुणे जिल्ह्यात १९ ते २१ जुलैपर्र्यंत राबवण्यात आला आहे. या ‘जनसुनावणी’मध्ये नव्या तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे समस्या मांडणार्‍या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम राज्य महिला आयोग करत आहे.’’