श्री गणेशचतुर्थी विशेष : श्री गणेशपूजनातून पुष्कळ चैतन्य निर्माण होऊन पूजक आणि पुरोहितांना झाला आध्यात्मिक स्तरावर लाभ !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘विनाशकारक, तमप्रधान यमलहरी (स्पंदने) पृथ्वीवर आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या १२० दिवसांत जास्त प्रमाणात येतात. या काळात त्यांची तीव्रता जास्त असते. या तीव्रतेच्या काळात, म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत, गणेशलहरी पृथ्वीवर जास्त प्रमाणात येत असल्याने यमलहरींची तीव्रता कमी व्हायला साहाय्य होते. (या लहरींविषयी अधिक ज्ञान सनातनचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’ यात दिले आहे.) श्री गणेशचतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो. श्री गणेशचतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत हे ‘सिद्धीविनायक व्रत’ या नावाने ओळखले जाते. ‘भाद्रपद शुद्ध चतुर्थीस मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची ‘सिद्धीविनायक’ या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे’, असा शास्त्रविधी आहे; पण मनुष्य हा उत्सवप्रिय असल्याने एवढ्याने त्याचे समाधान होईना; म्हणून दीड, पाच, सात किंवा दहा दिवस श्री गणपति ठेवून त्याचा उत्सव करू लागले. बरेच जण (ज्येष्ठा) गौरीसह गणपतीचे विसर्जन करतात.

फोंडा, गोवा येथील श्री. आत्माराम जोशी यांनी त्यांच्या निवासस्थानी श्री गणेशचतुर्थीस ‘सिद्धीविनायक व्रत’ केले. त्यांच्याकडे दीड दिवस गणेशमूर्ती पूजण्यात येते. श्री. सिद्धेश करंदीकर यांनी या पूजाविधीचे पौरोहित्य केले. ‘सिद्धीविनायक व्रत केल्याचा पूजकाला (श्री. आत्माराम जोशी यांना), तसेच त्या व्रताचा पूजाविधी सांगणार्‍या पुरोहिताला (श्री. सिद्धेश करंदीकर यांना) आध्यात्मिक स्तरावर काय लाभ होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी १३ आणि १४ सप्टेंबर २०१८ या दिवशी श्री. आत्माराम जोशी यांच्या निवासस्थानी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणे

या चाचणीत श्री गणेशचतुर्थीला, म्हणजे १३.९.२०१८ या दिवशी श्री गणेशपूजनापूर्वी आणि पूजनानंतर श्री गणेशमूर्ती, पूजक (श्री. आत्माराम जोशी) आणि पूजा सांगणारे पुरोहित (श्री. सिद्धेश करंदीकर) यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. १४.९.२०१८ दिवशी दुपारी उत्तरपूजेपूर्वी आणि उत्तरपूजेनंतर सर्वांची पुन्हा एकदा निरीक्षणे करण्यात आली.

१४.९.२०१८ या दिवशी सायंकाळी श्री गणेशमूर्तीचे नैसर्गिक झरा असलेल्या एका जलाशयात (तलावात) विर्सजन करण्यापूर्वी आणि विसर्जन केल्यानंतर तेथील पाण्याचा नमुना घेऊन त्याचीही निरीक्षणे करण्यात आली. या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

१ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण

१ अ १. श्री गणेशमूर्ती आणि पूजक यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा न आढळणे

अ. भाद्रपद शुक्ल तृतीयेला, म्हणजे १२.९.२०१८ या दिवशी श्री गणेशमूर्तीचे यजमानांच्या घरी आगमन झाले. तेव्हा तिच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

आ. श्री गणेशचतुर्थीला, म्हणजे १३.९.२०१८ या दिवशी श्री गणेशमूर्तीचे यजमानांनी पूजन करण्यापूर्वी आणि पूजन केल्यानंतरही श्री गणेशमूर्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

इ. भाद्रपद शुक्ल पंचमीला, म्हणजे १४.९.२०१८ या दिवशी दुपारी उत्तरपूजेनंतर श्री गणेशमूर्तीचे विर्सजन करण्यात आले. उत्तरपूजेपूर्वी आणि उत्तरपूजेनंतरही श्री गणेशमूर्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

ई. पूजकामध्ये १३.९.२०१८ या दिवशी श्री गणेशपूजनापूर्वी आणि पूजनानंतर, तसेच १४.९.२०१८ या दिवशी उत्तरपूजेपूर्वी आणि उत्तरपूजेनंतरही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

१ अ २. पुरोहितांमध्ये अल्प प्रमाणात असलेली ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा गणेशपूजन झाल्यानंतर पूर्णपणे नाहीशी होणे : श्री गणेशचतुर्थीला, म्हणजे १३.९.२०१८ या दिवशी गणेशपूजन आरंभ होण्यापूर्वी पुरोहितांमध्ये अल्प प्रमाणात ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली. गणेशपूजन झाल्यानंतर त्या पुरोहितांमधील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी झाली. पुरोहितांमध्ये पूजाविधी आरंभ होण्यापूर्वी आणि पूजाविधी झाल्यानंतरही ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
१४.९.२०१८ या दिवशी उत्तरपूजेपूर्वी आणि उत्तरपूजेनंतरही पुरोहितांमध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

१ अ ३. श्री गणेशमूर्तीचे जलाशयात विसर्जन केल्यानंतर त्या जलाशयातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी होणे : चाचणीतील श्री गणेशमूर्तीचे १४.९.२०१८ या दिवशी दुपारी जलाशयात विसर्जन करण्यात आले. विसर्जन करण्यापूर्वी त्या जलाशयातील पाण्याचा नमुना घेऊन त्याची मोजणी केली असता, त्या पाण्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली. तिची प्रभावळ ०.९८ मीटर होती. श्री गणेशमूर्तीचे जलाशयात विसर्जन केल्यानंतर साधारण ३ घंट्यांनी (तासांनी) (टीप) पुन्हा एकदा तेथील पाण्याचा नमुना घेऊन त्याची मोजणी केली असता, त्या पाण्यातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी झालेली आढळली.

जलशयातील पाण्याच्या नमुन्यामध्ये विसर्जनापूर्वी आणि विसर्जनानंतरही ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

टीप – १४.९.२०१८ या दिवशी चाचणीतील श्री गणेशमूर्तीचे ज्या जलशयात विर्सजन करण्यात आले, तेथे अन्य भाविकही दीड दिवस पूजलेल्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आले होते. त्यामुळे त्या भाविकांकडील श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर तेथील पाण्याची मोजणी करण्यात आली.

१ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण

१ आ १. श्री गणेशचतुर्थीला श्री गणेशपूजन झाल्यानंतर, तसेच दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा झाल्यानंतर श्री गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होणे : १२.९.२०१८ या दिवशी श्री गणेशमूर्तीचे यजमानांच्या घरी आगमन झाले. तेव्हा तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा होती आणि तिची प्रभावळ २.२० मीटर होती. त्यानंतर श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी गणेशपूजन आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी विसर्जनाच्या आधीची उत्तरपूजा या दोन्ही वेळी श्री गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेत झालेली वाढ पुढे दिली आहे.

१ आ २. श्री गणेशचतुर्थीला श्री गणेशपूजन झाल्यानंतर, तसेच दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा झाल्यानंतर पूजकाच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होणे

१ आ ३. श्री गणेशचतुर्थीला श्री गणेशपूजन झाल्यानंतर, तसेच दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा झाल्यानंतर पुरोहितांच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होणे

१ आ ४. श्री गणेशमूर्तीचे जलाशयात विसर्जन केल्यानंतर त्या जलाशयाच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होणे : श्री गणेशमूतीचे विसर्जन करण्यापूर्वी जलाशयातील पाण्याचा नमुना घेऊन त्याची मोजणी केली असता त्या पाण्यामध्ये थोडी सकारात्मक ऊर्जा आढळली; पण तिची प्रभावळ नव्हती. तेव्हा ‘ऑरा’ स्कॅनरच्या भुजांनी ९० अंशाचा कोन केला. श्री गणेशमूर्तीचे (टीप) जलाशयात विसर्जन केल्यानंतर साधारण ३ घंट्यांनी पुन्हा एकदा तेथील पाण्याचा नमुना घेऊन त्याची मोजणी केली असता त्या पाण्याच्या सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झालेली आढळली. तेव्हा ‘ऑरा’ स्कॅनरच्या भुजांनी १८० अंशाचा कोन केल्याने तिची प्रभावळही मोजता आली. ती १.६० मीटर होती.

टीप – चाचणीतील श्री गणेशमूर्तीचे ज्या जलशयात विर्सजन करण्यात आले, तेथे अन्य भाविकांनीही दीड दिवस पूजलेल्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले होते.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

२ अ. श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी श्री गणेशमूर्तीवर पूजाविधीद्धारे कोणतेही संस्कार होण्यापूर्वीही त्या गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ होणे : ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हे अध्यात्मातील तत्त्व आहे. यानुसार जेथे श्री गणेशाचे रूप आहे तेथे श्री गणेशाची स्पंदने, म्हणजे गणेशतत्त्व आकृष्ट होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे चाचणीतील श्री गणेशमूर्तीमध्ये १२.९.२०१८ या दिवशी सकारात्मक ऊर्जा आढळली. तिची प्रभावळ २.२० मीटर होती. श्री गणेशमूर्तीवर पूजाविधीद्धारे कोणतेही संस्कार कलेले नसतांनाही त्या गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होऊनती २.७० मीटर झाली. यामागील शास्त्र पुढे दिले आहे.

‘श्री गणेशचतुर्थीला, तसेच गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशलहरी (गणपतीची स्पंदने) पृथ्वीवर जास्त प्रमाणात येतात.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘श्री गणपति – भाग १’) १३.९.२०१८ या दिवशी श्री गणेशचतुर्थी असल्याने गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात कार्यरत झाल्यामुळे त्याच्या आदल्या दिवशीच्या, म्हणजे १२.९.२०१८ च्या तुलनेत १३.९.२०१८ या दिवशी सकाळी श्री गणेशमूर्तीतील सकारात्मक ऊर्जेत पूजाविधीद्धारे संस्कार करण्यापूर्वीही लक्षणीय वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले.

सौ. मधुरा कर्वे

२ आ. श्री गणेशपूजनातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे पूजक आणि पुरोहित यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : श्री गणेशचतुर्थीला गणेशपूजक श्री. आत्माराम जोशी यांनी पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसार श्री गणेशाचे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन केले. पूजाविधीमुळे श्री गणेशमूर्तीमध्ये गणेशतत्त्व आकृष्ट झाले. त्यामुळे श्री गणेशमूर्तीतील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. गणेशमूर्तीमधील गणेशतत्त्व आणि गणेशपूजनाच्या वेळी वातावरणात निर्माण झालेले चैतन्य, यांमुळे पूजक श्री. आत्माराम जोशी अन् पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांना पुढीलप्रमाणे आध्यात्मिक स्तरावर लाभ झाले.

१. श्री. आत्माराम जोशी यांच्यामध्ये पूजनारंभी नकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती, तसेच त्यांच्यामध्ये आधीपासूनच सकारात्मक ऊर्जा होती. श्री गणेशपूजनातून प्रक्षेपित झालेली सकारात्मक स्पंदने (चैतन्य) त्यांनी ग्रहण केली. त्यामुळे त्यांच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

२. पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांच्यामध्ये पूजनाच्या आरंभी थोडी नकारात्मक ऊर्जा आढळली. त्यांच्यामध्ये आधीपासूनच सकारात्मक ऊर्जाही होती. श्री गणेशपूजनातील चैतन्यामुळे त्यांच्यात थोड्या प्रमाणात असलेली नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली आणि त्यांच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

२ इ. श्री गणेशमूर्तीची उत्तरपूजा झाल्यानंतर पूजकातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे : ‘श्री गणेशपूजेमुळे पूजा करणारा पूजक गणेशलहरींनी संपृक्त व्हावा’, हा पूजेचा उद्देश असतो. संपृक्तता वाढविण्यातला शेवटचा टप्पा म्हणजे उत्तरपूजा. उत्तरपूजेच्या वेळी मूर्तीत असलेली सर्व पवित्रके (श्री गणपतीच्या तत्त्वाची स्पंदने) एकदम बाहेर पडतात. उत्तरपूजा झाल्यावर मूर्ती स्थानापासून थोडी हालवतात. त्यामुळे उरलीसुरली पवित्रके मूर्तीपासून दूर जातात; म्हणून ती पूजा करणार्‍याला मिळू शकतात. चाचणीतील श्री गणेशमूर्तीची उत्तरपूजा झाल्यानंतर पूजक श्री. आत्माराम जोशी यांना श्री गणेशमूर्तीतील पवित्रके मिळाल्याने यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झालेली दिसून आली. तसाच परिणाम पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांच्या संदर्भातही दिसून आला.

२ ई. श्री गणेशमूर्तीचे जलाशयात विसर्जन केल्यानंतर त्या जलाशयातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे : श्री गणेशमूर्ती आणि पूजेतील निर्माल्य यांचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यामागील शास्त्र जाणून घेऊया. श्री गणेशमूर्ती पाण्यात विसर्जित केल्यामुळे तिच्यामध्ये असलेले चैतन्य पाण्यात मिसळते. त्यामुळे ते पाणी पवित्र बनते. वहात्या पाण्यासमवेत हे चैतन्य सर्वदूर पोहोचते आणि अनेकांना त्याचा लाभ मिळतो. या पाण्याचे बाष्पीभवनही होत असल्याकारणाने एकंदर वातावरण सात्त्विक होण्यास साहाय्य होते. पूजेतील निर्माल्यामध्येही चैतन्य आलेेले असल्यामुळे निर्माल्य वहात्या जलस्रोतात विसर्जित करावे. पाने-फुले असे नैसर्गिक घटक असलेल्या निर्माल्यामुळे जलप्रदूषण होण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही. याउलट रासायनिक घटक असलेल्या गोष्टींमुळे जलप्रदूषण होते. चाचणीतील श्री गणेशमूर्तीतील चैतन्य जलाशयात मिसळले गेल्याने त्या जलाशयातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

३. उत्तरपूजा केल्यावर त्याच दिवशी किंवा दुसर्‍या दिवशी मूर्तीचे विसर्जन होणे सर्वथैव इष्ट असणे : ‘श्री गणेशविसर्जनाविषयी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत्तिकेच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करून आणलेले देवत्व एक दिवसापेक्षा जास्त दिवस राहूच शकत नाही. याचाच अर्थ गणेशविसर्जन केव्हाही केले, तरी श्री गणेशमूर्तीतील देवत्व दुसर्‍या दिवशी नष्ट झालेले असते; म्हणून कोणत्याही देवाची उत्तरपूजा केल्यावर त्याच दिवशी किंवा दुसर्‍या दिवशी त्या मूर्तीचे विसर्जन होणे, हे सर्वथैव इष्ट आहे. सोयर वा सुतक असले तरी पुरोहिताकडून श्री गणेशव्रत आचरले जाणे इष्ट आहे. त्याचप्रमाणे घरातील प्रसुतीची इत्यादी वाट न पहाता ठरल्याप्रमाणे विसर्जन करणे हे शास्त्राला धरून आहे.

४. मूर्तीत आलेल्या देवत्वाचा परिणाम म्हणून मूर्तीत २१ दिवसांपर्यंत चैतन्य टिकून रहाणे : ‘मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करून आणलेले देवत्व एक दिवसापेक्षा जास्त दिवस राहूच शकत नाही’, असे वर म्हटले आहे. असे असतांना ‘गणेशोत्सवात एक दिवसापेक्षा जास्त काळ पुजल्या जाणार्‍या गणेशमूर्तींच्या उपासनेचा लाभ भाविकांना कसा मिळेल ?’, असा प्रश्‍न कोणालाही पडू शकतो. याचे उत्तर असे आहे – मूर्तीतील देवत्व नष्ट झाले, तरी त्या देवत्वाचा परिणाम म्हणून मूर्तीत २१ दिवसांपर्यंत चैतन्य टिकून रहाते. तसेच गणेशोत्सवाच्या काळात मूर्तीची पूजाअर्चा होत असल्याने पूजकाच्या भक्तीभावाप्रमाणे मूर्तीतील चैतन्यात वाढही होऊ शकते. २१ दिवसांंनंतर मूर्तीतील चैतन्य हळूहळू घटू लागते.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘श्री गणपति – भाग १’)

(येथे दीड दिवसाच्या गणपतीविषयी केलेले संशोधन दिले आहे. तसे ५ दिवसांच्या गणपतीविषयी केलेले संशोधन अन्य लेखात दिले आहे.)

थोडक्यात सांगायचे, तर ‘हिंदु धर्मात सांगितलेल्या सिद्धीविनायक व्रताच्या पूजाविधीतून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा पूजकाला, तसेच पूजाविधी सांगणार्‍या पुरोहितांना आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला’, तसेच ‘श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी आहे’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१८.९.२०१८)

ई-मेल : [email protected]