इशरत जहाँ बनावट चकमकीच्या प्रकरणी ३ पोलीस अधिकार्‍यांची निर्दोष मुक्तता

इशरत जहाँ आतंकवादी नसल्याचे कोणतेही पुरावे नाहीत ! – गुजरात उच्च न्यायालय

ही चकमक खोटी असल्याचे सांगून आतंकवाद्यांचा बचाव करणारे आता बोलतील का ? राष्ट्रप्रेमींनी अशांना वैध मार्गाने जाब विचारायला हवा ! या प्रकरणी निरपराध पोलिसांनी गेल्या १६ वर्षांत जो काही मानसिक त्रास झाला आणि आर्थिक हानी झाली, ती आता आरोप करणारे भरून देणार आहेत का ?

डावीकडून : गिरीश सिंघल , तरुण बारोट

नवी देहली – गुजरातमधील वर्ष २००४ च्या इशरत जहाँ चकमकीच्या प्रकरणात कर्णावती येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या चकमकीच्या प्रकरणात आरोपी असलेले गिरीश सिंघल, तरुण बारोट आणि अनाजू चौधरी या ३ पोलीस अधिकार्‍यांची निर्दोष मुक्तता केली आहे. ‘इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची आतंकवादी होती’, हा गुप्तचर विभागाचा अहवाल फेटाळता येणार नाही. इशरत जहाँ ही आतंकवादी नव्हती, याचे कोणताही पुरावे नाहीत. गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकार्‍यांनी त्यांचे कर्तव्य बजावले आहे. यामुळे तिन्ही अधिकार्‍यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे’, असे न्यायालयाने म्हटले.

पोलीस अधिकारी गिरीश सिंघल आणि निवृत्त पोलीस उपअधीक्षक तरुण बारोट आणि साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनाजू चौधरी यांच्यावर या प्रकरणी कारवाई करण्यात गुजरात सरकारने वर्ष २००४ मध्ये नकार दिला होता.

काय आहे इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरण ?

१५ जून २००४ या दिवशी इशरत जहाँ, जावेद शेख उपाख्य प्राणेश पिल्लई, अमजद अली अकबर अली राणा आणि जिशान जौहर हे कर्णावतीच्या जवळ एका चकमकीत मारले गेले होते. ते तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठी आले होते, असे पोलिसांनी म्हटले होते. इशरत जहाँ हिची आई समीमा कौसर आणि जावेद याचे वडील गोपीनाथ पिल्लई यांनी उच्च न्यायालयात याविरोधात याचिका प्रविष्ट करून या घटनेची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यावर गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या विशेष चौकशी पथकाने ही चकमक बनावट असल्याचे सांगितलं होते आणि चौकशीचे आदेशही दिले होते.