‘आप’ने वीज शुल्कावर चर्चा घडवून कोळसा प्रकरणावरील लक्ष विचलित केले ! – काँग्रेसचा आरोप

पणजी, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यात कोळसा प्रदूषणावरून रेल्वे दुपदरीकरण आणि कोळसा वाहतूक यांना मोठ्या प्रमाणावर विरोध होत असतांनाच ‘आप’ने राज्यातील वीज शुल्कावर चर्चा घडवून कोळसा प्रकरणावरील लक्ष विचलित करून अप्रत्यक्षपणे भाजपला सहकार्य केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. काँग्रेसचे गोव्यातील प्रवक्ता देवसुरभी यादव यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत हा आरोप केला.

देवसुरभी यादव पुढे म्हणाले, ‘‘आप’च्या नेत्याने गोवा भेटीच्या वेळी कोळसा प्रदूषणावर कोणतेच भाष्य न करता राज्यातील वीज शुल्कावर चर्चा केली. वास्तविक राज्यात विविध अशासकीय संघटना आणि विरोधी पक्ष संघटितपणे राज्यातील कोळसा वाहतूक, रेल्वेमार्ग दुपदरीकरण आदी प्रमुख प्रकल्पांना विरोध करत आहेत.’’